You are currently viewing महिलांच्या असण्यानचं घराला घरपण – ॲड. दिलीप नार्वेकर

महिलांच्या असण्यानचं घराला घरपण – ॲड. दिलीप नार्वेकर

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात महिला आरोग्य चिकित्सा शिबिर संपन्न

सावंतवाडी :

ज्या घराची स्त्री सक्षम असते त्या घराला घरपण असते. घरच्या राबत्या स्त्रीला जोपर्यंत कोणतीही व्याधी किंवा आजार होत नाही तोपर्यंत त्या घरातील प्रत्येकाचे स्वास्थ्य चांगले असते. म्हणून स्त्रीशिवाय अवघे विश्व अपुरे आहे. महिलांच्या असण्यानचं घराला घरपण आहे. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे, असे प्रतिपादन भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडीचे अध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांनी केले. सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित महिलांच्या आरोग्य चिकित्सा शिबिरात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय दळवी, उपप्राचार्य डॉ. पी. व्ही. देवऋषी, उद्घाटक स्त्री चिकित्सक डॉ. मानसी वझे, संस्था संचालक व सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक उमाकांत वारंग आरएमओ डॉ. एम. व्ही. चोडणकर तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, व्हाईस ऑफ मीडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक गावकर, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, सदस्य नागेश पाटील, दिव्या वायंगणकर, सदस्य अनुजा कुडतरकर, नरेंद्र देशपांडे, तसेच व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे कार्याध्यक्ष आनंद धोंड, सचिव शैलेश मयेकर, सदस्य साबाजी परबत सेच महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टर नंददीप चोडणकर, डॉ. विशाल पाटील, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर तसेच खासकीलवाडा महिला मंडळाच्या अध्यक्षा सीमा नाईक व महाविद्यालयातील परिचारिका करुणा गावडे, सपना परब, स्नेहलता मुननकर आदी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना डॉ. मानसी वझे यांनी सांगितले की, महिला सगळ्यांची काळजी घेतात, परंतू स्वतःची काळजी घेत नाहीत. म्हणून महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक उमाकांत वारंग म्हणाले, सावंतवाडी शहरातील प्रत्येक प्रभागातील महिलांच्या आरोग्याची तपासणी अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढेही सावंतवाडी शहर आणि तालुक्यात अशाच पद्धतीने शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्री. वारंग यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित असलेले सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी महिलांच्या आरोग्य तपासणीची काय गरज आहे?, याचे विश्लेषण करताना अलीकडच्या काळात उद्भवलेल्या विविध आजारांवर भाष्य केले. तसेच सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर यांनी आपल्या मनोगतात महिलांच्या दैनंदिन जीवनात असलेल्या अडचणी आणि त्यावर त्यांनी मात करून केलेला संघर्ष सांगितला व महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणेबाबत जागरूक असणे किती महत्त्वाचे आहे?, हे विशद केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. रुपेश पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा