*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*
*महिला दिन…*
महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या डायरीतील (डायरीला म्हणजे डॉलीला पत्र लिहिते) एक पान इथे प्रस्तुत करते आहे.
हाय डॉली….
खुप दिवस झाले आपण काही बोललोच नाही..आज तुझ्याशी काही गोष्टी शेअर करायच्या आहेत ग…आज मन खुप उदास आहे…आक्रंदत आहे…विचारांची खुप सरमिसळ होतीय…गुंता वाढतोय….काय करु?….मार्च उजाडला की महिलावर्ग मस्त उत्साहात असतो…विविध स्पर्धा, मनोरंजन, विविध स्टॉलस् ची रेलचेल…नटणे मुरडणे यांचा तर ऊत येतो..कारण तमाम पुरुषवर्गांनी बहाल केलेला वर्षातील फ़क्त एकदिवस या महिन्यात येतो न..! पण खरं सांगु? मला या गोष्टीचे अजिबात अप्रूप नाही…मी नेहमीच स्वत:ला ’आजचा दिवस आपलाच’ म्हणुनच जगते. पण आज काहीही नकोसे वाटते आहे…आत कुठे तरी उदासी आली आहे..आज काहीही न करता नुसते ’नाहीरे’ म्हणुन दिवस काढावासा वाटतोय……पण नुसते बसले तरी चैन कुठे पडतेय?..म्हणले मग तुझ्याशी बोलले की खुप बरे वाटते…हलके वाटते..आज काल प्रत्यक्ष कुणाशी बोलणे अन् ते ही स्पष्ट म्हणजे कठीणच असते म्हणा…कुणी दुखावले तर जाणार नाही न माझ्या कडुन? ही भीती…कारण अस्मादीक वृश्चिकराशीचे…म्हणजे स्पष्ट वक्तव्यामुळे आम्ही (कु)प्रसिद्धच..
पण तुझे तसे नाही ही खात्री आहे…म्हणुन तुझ्याशी बोलायला मला कुणा बापाची भिती नाही वाटत..
अग काय झाले माहीत आहे का…आज न सकाळी सकाळी समोरच्या घरातुन मावशींचा एकदम स्फ़ोट झाल्यासारखा आवाज आला…खुप चिडल्या होत्या आणि आपल्या मुलाला चक्क “रांडीच्या…कळत नाही तुला ? किती वेळा सांगितले तरी ऐकत नाही होय? आता परत मला काम झाल न…जरा बसेन म्हणले निवांत तर नाही….चालुच आहे तुझे …” असे म्हणत चिडुन वर त्याला फ़टके मारत होत्या… त्या आवाजा बरोबर त्या पोराचे भोकाड पसरलेला आवाज आणि त्या दोघांच्या आवाजाने छोटी मुलगी ही रडु लागली…तिला ही आईच हवी होती…
काय झाले असेल… म्हणुन नेहमी प्रमाणे लगेच मी खिडकीतुन डोके बाहेर काढलेच…तशी आमची कन्या आणि त्यांचे पिताश्री ही फ़िस्कारलेच … “ बघा बाई! तुम्ही बघितलेच पाहीजे…आम्हाला चौकशा लागतातच म्हणा….नको तिथे उत्सुकता दाखवायची….बस्स! झाले हं आता.. हे तर नेहमीचेच आहे मावशींचे …अतिरेकी पणा…..बंद कर ती खिडकी !”…इती..कन्या!
अच्छा म्हणजे लेकीने किती सहजतेने घेतले हे…पण मला मात्र लहान मुलांवर कुणी हात उचलला तरी खुप राग येतो…लहान मुले ही किती निरागस असतात…त्यांना काय कळते…आणि मी म्हणते या गोष्टी तरी त्यांच्या डोक्यात शिरतीलच कशा…बिचारा फ़क्त ३री त आहे….आणि “शिवु नकोस मला” हे काय कळण्याचे वय आहे? आई ही तिला बिलगल्या शिवाय कळते होय? त्या लेकराचा तिच्या जवळ जाण्याचा हक्क जगात कुणीच हिसकावुन शकत नाही त्यांच्या पासुन …प्रत्यक्ष ती आई ही का असेना..
कोणत्या जगात वावरतात अजुन या बायका?२१व्या शतकात वावरतो आपण आणि अजुन ही शिवाशीव पाळतात याचे खुप म्हणजे खुप दु:ख होते ग. या गोष्टी अजुन ही समाजात काही घरांतुन आहेत…हे सत्य नाकारता येत नाही..अजुन ही मुलगी ऋतुमती झाली की जाहीरपणे तिच्या ओटीभरणाचा,फ़ोटोचा कार्यक्रम आमच्या सारख्या काही गावातुन केला जातो..याचे वैष्यम्य वाटते.. या छोट्या छोट्या मुली आजकाल ८/९ व्या वर्षी सुद्धा वयात येवु लागल्यात (निसर्गाचा शापच म्हणा) त्या अशा बाजुला बसतात…त्यांना गादीवर झोपु देत नाहीत..जेवण भिका-यासारखे वाढले जाते…शी!!!!!!! नाही अजुन वर्णन करु शकत मी….
स्त्री कुठल्या कुठे पोहचली आहे आज….याची यादी मी देणार नाही कारण ते सर्वांना माहित आहेच…पण जे पूर्वीचे हे स्त्रियांचे वाईट दिवस आहेत ते मात्र “देवी”…”पोलिओ” सारखे संपायला हवेतच. अग पूर्वीचे दिवस वेगळे होते..स्त्रियांना प्रचंड प्रमाणात अंगमेहनतीची कामे असत….या ४ दिवसात तिला पूर्ण शारिरीक विश्रांती मिळावी यासाठी हा उपाय योजला गेला होता…शिवाय हायजिन म्हणुन तिला ही काही गोष्टी पाळाव्या लागत…पण आता त्यागोष्टी आजकाल काही आवश्यक नाहीत…पण त्यांना सांगायला गेले की आमच्यात नाही चालत म्हणुन मलाच गप्प करतात…पण एकदोन ठीकाणी मी सांगुन सांगुन या प्रथा बंद करायला भाग पाडतीय…माझे प्रयत्न चालुच राहतील…
डॉली आज न मला सावित्री बाई फ़ुलेंची खुप आठवण येते आहे ग…त्यांच्या मुळेच मी आज इतके मोकळे बोलु शकते, लिहु शकते…मत मांडु शकते…
काय म्हणतेस? त्या आहेत इथेच?….ग्रेट….
खरचं हॅट्स ऑफ़ सावित्री ताई तुम्हाला..तुम्ही म्हणजे २०व्या शतकातील फ़ार मोठी गिफ़्ट आहे आम्हा महिलांना….तुम्ही हाल सोसले आणि फ़ळे आम्ही चाखतो आहोत…अर्थात तुमचीच ती इच्छा होती म्हणा…आज आम्ही शिकलो सवरलो …कुटुंबाची काळजी घेत सामाजिक जबाबदारीचे ही भान ठेवायला शिकलो आहोत…ताई ! आपल्या काही भगिनींनी तर इतकी प्रगती केली आहे की विचारुच नका…काही जणींनी अंतराळात मुक्काम करुन फ़ार मोठी कामगिरी ही केली आहे…आणि अजुन ही करत आहेत…तर काही देशाच्या उच्चस्थ पदाच्या मानकरी ही झाल्यात…एवढेच नाही तर गाड्या, विमाने, मेट्रो,रेल्वे…..काय काय नाही चालवत ? ताई खरचं आज तुम्ही हव्या होत्या…तुम्ही लावलेल्या रोपट्याचे किती मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले ते तुम्ही बघायलाच हवे असे वाटते.. अर्थात तुम्ही इथे आमच्या आसपास असल्याचे जाणवतेच आम्हाला….तरी ही तुमच्याशी बोलायचा मोह नाही आवरु शकले…
ताई या वटवृक्षाखाली मात्र ब-याच काही घटना ही घडतात हो…अजुन ही काही चालीरिती ,प्रथा या आम्हा बायकांच्या पिच्छा सोडत नाहीत बघा..मघाशी सांगितलेच मी अजुन ही काही ठीकाणी कडक सोवळे-ओवळे पाळावे लागते..अंधश्रद्धाच्या नावाखाली काही कुप्रथांना सामोरे ही जावे लागते आहे…तर अजुन ही काहींच्या नशिबी हुंडाबळी, अत्याचार,बलात्कार, विनयभंग, या घटना या एकेक पारंब्यांना लटकत आहेत…नव्हे तर या पारंब्यांना या घटनेशी सामोरे जावे लागत आहे. काही काही पारंब्या या जाड आहेत, तर काही पातळ ; पण त्या आहेत हे सत्य आहे….वासनांचा चिखल तुडवण्यासाठी म्हणुन ही काही पारंब्यांची शिकार केली जाते….मग त्या पारंब्या कोवळ्या आहेत की जुन हे ही पाहीले जात नाही….मग या पारंब्या आक्रोश करतात तेंव्हा फ़क्त पानांची सळसळ होते…क्षणभर वारे सुटते आणि मग सारं काही शांत होत…..पुन्हा नवीन पारंब्याच्या शोधात शिकारी भटकत येतोच……
ताई हे कुठे थांबणार हो?…आपण जेंव्हा स्त्रीला उंब-याबाहेर श्वास घ्यायला शिकवत होतात तेंव्हा हे आपल्या ध्यानी ही आले नसेल नाही का?
ताई आता तर या पारंब्यांची नुसती चाहुल जरी लागली तरी ती उपटुन टाकुन देतात हो ! त्यावेळी किती वेदना होतात आम्हाला……त्या वेदनांची चाहुल जरी लागली तरी आमचे आतडे तुटते….विदिर्ण होते….एवढा मोठा झालेला हा वृक्ष सुद्धा हुंदके देवुन देवुन रडतो…आतुन पोखरला जातो…आक्रंदन चालुच असते आमचे…पण आमच्या दु:खाचे साधे पडसाद ही त्यांना ऐकु येवु नयेत हे आमचे दुर्देव !
त्यातुन ही काही पारंब्या नको त्या ठीकाणी उगवल्याच, तर त्यांना फ़ुलण्याआधीच मीठ चारुन पाणी तोडतात…आणि वर दुधाचा अभिषेक करतात….म्हणजे विषबाधेने तिचा मृत्यु अटळच….शिवाय पुराव्या आभावी घडल्याने….तेरी भी चुप और मेरी भी चुप !….असे आणि किती किती गोष्टी घडत आहेत ताई …..काय सांगु तुम्हाला? यांना कसे कळत नाही की नवीन नवीन पारंब्या उगवल्या, वाढल्याशिवाय ही सृष्टी कशी बहरेल?कशी फ़ुलेल? जर असेच घडत राहिले तर त्यांचा नाश होइलच शिवाय त्यामुळे एक दिवस आमचा हा वटवृक्षाचा डोलाराच कोसळुन भुईसपाट होइल ….आणि मग ताई परत शून्यातुन सुरुवात करावी लागेल…
परत तुम्हाला नव्याने जन्म घ्यावा लागेल….
मात्र ताई त्यावेळी मात्र नक्की विचार करुन काही निर्णय घ्यावा आपण असे मला वाटते..
तरी ही ती वेळ परत येवु नये अशीच आमची तुमची सर्वांची इच्छा आहे ……हे नक्की !
ताई आज तुमची आठवण झाली आणि तुमच्याशी संवाद ही साधता आला….ते ही आमच्या या डॉली मुळेच हं..!
अग बाई! किती वेळ गेला ते समजलेच नाही की ग…
चल बाय !
महिलादिनाच्या कार्यक्रमाला प्रेसिडेंट म्हणुन तरी जायलाच हवे…..
बाय..बाय बाय…..
परत भेटुच…
©पल्लवी उमेश ..