वेंगुर्ला :
वेंगुर्ल्यातील चिपी – कालवंडवाडी येथील घराला रात्री शॉटसर्किट होऊन लागलेल्या आगीत पूर्ण घर जळून बेचिराख झाले आहे. काल रात्री ही दुर्घटना घडली. मात्र दुर्घटनेवेळी घरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीमुळे घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
चिपी कालवंडवाडी येथील श्रीमती शुभप्रभा सीताराम चव्हाण व वैभवी विजय पवार यांच्या घराला आग लागल्याने घराचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने या दोन्ही महिला बचत गटाच्या मीटिंगला गेल्याने त्या थोडक्यात बचावल्या. सदर घटनेची माहिती मिळताच चिपी सरपंच सौ. माया चव्हाण, ग्रामसेवक मंगेश नाईक, तलाठी दि.एस. गवते, पोलीस पाटिल संदेश पवार आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी कोतवाल रुक्मानंद वरक, सुनील राठीवडेकर आदी उपस्थित होते.
सदर आगीत हे घर पूर्णपणे बेचिराख होऊन नुकसान झाले आहे. दरम्यान शिवसेना पक्षाचे उप जिल्हा प्रमुख सचिन देसाई आणि कुशेवाडा सरपंच निलेश सामंत यांनी आपतग्रस्तांना भेट देऊन पाहणी केली.