You are currently viewing “मुलांच्या मोबाईलचे करायचे काय ?” कार्यक्रमात मुक्ता चैतन्य यांचे मार्गदर्शन

“मुलांच्या मोबाईलचे करायचे काय ?” कार्यक्रमात मुक्ता चैतन्य यांचे मार्गदर्शन

मालवण :;

 

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित “मुलांच्या मोबाईलचे करायचे काय ? ” या कार्यक्रमाचे २९ सप्टेंबर रोजी मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सायबर जर्नलिस्ट आणि डिजिटल साक्षरता शिक्षक तथा समुपदेशन मुक्ता चैतन्य यांनी आपले विचार मांडले. ऑर्कुट, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि तत्सम सोशल मीडिया हे सर्वच काहींना काही विकण्यासाठीच अस्तित्वात आले आहेत. त्यांची रचना व्यवसायिक आहे. मोबाईल सुरू केल्यापासून ते बंद करेपर्यंत विविध माध्यमातून तो पैसा वसूल करतच असतो. मानवाचा वाढता स्क्रीन टाईम आणि इंटरनेट यामुळे त्याचा सामाजिक डीएनए बदलत आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲड. देवदत्त परुळे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, खजिनदार शैलेश खांडाळेकर, कार्यकारी सदस्य विकास म्हाडगुत उपस्थिती होते.

या कार्यक्रमात सुरुवातीला सूत्रसंचालक प्रा. डॉ. ज्योती तोरस्कर यांनी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्यावतीने सर्वांचे स्वागत केले. सचिव लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मार्गदर्शक मुक्ता चैतन्य यांचा परिचय करून दिला आणि त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. देवदत्त परुळेकर यांनी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्या विविध प्रकल्पाचा आढावा घेतला आणि उपस्थित मार्गदर्शक मुक्ता चैतन्य यांच्या सामाजिक अभ्यास व कृती प्रकल्पाची माहिती दिली. विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी सेवांगण परिवार मुक्ता चैतन्य यां कार्यक्रमाच्या द्वारे निरामय व आरोग्यदायी पालकत्व, बालपण व ज्येष्ठत्व या सर्वांसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य मार्गदर्शन सत्रात मुक्ता चैतन्य म्हणाल्या की आता मोठ्यांचे व लहानांचे जग वेगळे असते या कल्पनेने चालून उपयोग नाही. मोबाईलपासून उद्भवलेल्या समस्यांचे मूळ पालकांच्या अतिरिक्त स्क्रीन टाईम मध्येही आहे. शून्य ते २ वयोगटातील शिशु वर्गाला मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप वगैरे कुठलाच स्क्रीन दाखवू नये. २ वर्ष ते १६ वर्ष या टप्प्यात मोठ्यांच्या संपूर्ण देखरेखी खाली मुलांना अर्ध्या तास मोबाईलचा वापर करू द्यावा आणि १६ ते २५ या वयोगटात कामाचे प्राधान्य व डिजिटल विवेकाने हा वापर करावा असेही मुक्ता चैतन्य यांनी सांगितले. मोबाईलच्या वापराने थेट शारीरिक हानी आणि विचारांची जटिलता याबाबत त्यांनी माहिती दिली. ४ वर्षे यानंतर मोबाईल वापरायला संपूर्ण प्रतिबंध शक्य नाही. नो स्क्रीन डे, स्क्रीन टाईम ब्रेक या संकल्पना त्यांनी समजावून सांगितल्या मोबाईल किंवा सोशल मीडियावर सर्व गोष्टी व माहिती वाईट नाही परंतु त्यातील आपल्याला किती व काय हवं त्याचा विवेक शिकावा असेही त्यांनी विशेष नमूद केले.

सोशल साईट्स व व्हाट्सअप वरील ऑनलाइन भांडणे आज माणसांचे ऑफलाइन जीवन बिघडवतात. त्यामुळे माणूस म्हणूनही सामाजिक ध्रुवीकरण होत आहे. मोबाईल किंवा इंटरनेटचा इतिहास हा फार जुना नाही. त्यामुळे याबाबतीतील अजून अधिक वैचारिक, मानसिक व शारीरिक हानी यांची तीव्रता कोणाला तितकीशी माहित नाही. जन्मानंतर हातात फोन आल्यावर जीवन बदलते हे वास्तव आहे. परंतु आजही कोणीच मोबाईल व लॅपटॉप सकट जन्माला येत नाही तर माणूस म्हणूनच आपण जन्माला येतो. त्यामुळे या समस्यांवर आपण ठरवलं तर आपल्या जीवनाची परिपूर्ण आखणी करून व त्यांची अंमलबजावणी करून नक्कीच तोडगा काढू शकतो असे त्यांनी आश्वस्त केले. आपल्याला किंवा आपल्या मुलांना मोबाईलचे व्यसन लागलं आहे किंवा लागू शकणार आहे. तसेच ही समस्या बनवून त्याचा दुष्परिणाम मन, काम, आरोग्य यावर दिसतोय असे वाटले तर समुपदेशन करून घ्यायला कमीपणा मानू नये असा त्यांनी सल्ला दिला. मोबाईल व्यतिरिक्त मोठी माणसे काय छान छान गोष्टी करू शकतात हे मुलांना दिसलं तर आपोआप मुलं त्यांचे अनुकरण करतील व मोबाईलचा वापर कमी होईल असे त्यांनी सुचवले.

सोशल मीडिया आणि टीव्हीवरील इन्फ्लुएन्सर, ऑनलाइन गेमिंग, अती माहितीचे दडपण, माहितीवर वैचारिक प्रक्रिया न होणे, मेंदूत निष्कारण माहितीचा साठा होणे, रिल्स बघायच्या छंदाने कामाचा व स्वतःला द्यायचा वेळ फुकट जाणे आणि त्यामुळे दडपण, निराशा, तणाव, ऑनलाइन फ्रॉड, १८ वर्षापर्यंत पॉर्न साईटच्या वापराची अवैधता अशा विविध गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला. जेवताना मोबाईल व टेलिव्हिजन चा वापर माणसाला पोषणापासून दूर ठेवतो व आजार उद्भवतात असे त्यांनी स्पष्ट केले. कोविड नंतर डोळे व कानाच्या समस्या झपाट्याने वाढल्या कारण माणसाचा स्क्रीन टाईम वाढला व क्रयशक्ती रोडावली याबाबत त्यांनी जागरूक केले. आज माहिती व कृतींची मुबलक उपलब्धता इंटरनेटवर असल्याने शिक्षण पद्धतीत थोड्याफार बदलाची ही गरज असल्याचे मुक्ता चैतन्य यांनी नमूद केले. यानंतर त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांची, शंकांची उत्तरे दिली.

या कार्यक्रमात बुद्धिबळात विशेष प्राविण्य मिळवलेली शालेय अमूल्या साटम, आदित्य प्रभुगावकर, आशिष कोकरे, कस्तुरी तलवारे, ऋचा चव्हाण, ओम गावकर, अस्मि आठल्येकर, प्रतिक कोकरे यांचा बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान आणि त्यांचे प्रशिक्षक संतोष गांगनाईक यांचा मार्गदर्शक मुक्ता चैतन्य यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बुद्धिबळात विशेष प्राविण्य मिळवलेली शालेय विद्यार्थिनी अस्मि आठल्येकर हिने मनोगत व्यक्त केले व तिच्या सर्वांगीण प्रगती बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, खजिनदार शैलेश खांडाळेकर, कार्यकारी सदस्य विकास म्हाडगुत, पदाधिकारी समाज अभ्यासक सौ. मंगल परुळेकर, सेवांगण सदस्य, कर्मचारी आणि उद्योजक रुजारिओ पिंटो, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. ज्योती बुवा तोरसकर, आहारतज्ञ गार्गी ओरसकर, निवृत्त महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अधिकारी प्रदीप चव्हाण, श्री. तीनईकर, ओझर विद्यामंदिर मुख्याध्यापक डी डी जाधव, टोपीवाला हायस्कूलचे श्री बर्वेसर, ऋतुजा केळकर, श्रीमती कोळंबकर पल्लवी तारी खानोलकर, पर्णीका जाधव, मामा वरेरकर, नाट्यगृह व्यवस्थापक श्री सुभाष कुमठेकर, संजय कासवकर, लोचन कासवकर सामाजिक संस्थांचे सदस्य, तसेच विविध शाळांचे शिक्षक, पालक, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे सचिव लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मुक्ता चैतन्य यांचे आणखीन मार्गदर्शन उपक्रम आयोजित केले जातील असे सांगितले आणि याबाबत बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण येथे समुपदेशन केले जाईल अशी ग्वाही दिली. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मार्गदर्शक मुक्ता चैतन्य आणि उपस्थित पालक मुलं, शिक्षक मालवण नगर परिषद प्रशासन व कर्मचारी आणि कार्यक्रमाला सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा