You are currently viewing तळवडे अपहार प्रकरणातील सरपंचांना वाचविण्याचा प्रयत्न – संदीप गावडे 

तळवडे अपहार प्रकरणातील सरपंचांना वाचविण्याचा प्रयत्न – संदीप गावडे 

भष्ट्राचार प्रकरणी चौकशी समितीच संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा आरोप

सावंतवाडी :

तळवडे ग्रामपंचायत अपहार प्रकरणी सरपंच दोषी असून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आम्ही याबाबतचा गुन्हा सिध्द करुन सरपंचासह संबधित दोषींना जेलमध्ये पाठविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी दिला.

दरम्यान, तळवडे भष्ट्राचार प्रकरणी चौकशी समितीच संशयाच्या भोवऱ्यात असल्याने दोषींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. सावंतवाडी पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर, तळवडे ग्रामपंचायत सदस्य दादा परब, मंगलदास पेडणेकर, सुरेश मांजरेकर, नम्रता गावडे, स्मिता परब आदी उपस्थित होते.

तळवडे ग्रामपंचायत मध्ये गतवर्षी ७२ लाख ८१ हजार ७० रुपये इतक्या रकमेचा अपहार झाला होता यामध्ये संबंधित ग्रामसेवक ठेकेदार व सरपंच दोषी होते. मात्र, या संदर्भात अद्याप पर्यंत गुन्हा दाखल होत नव्हता. यासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली होती यामध्ये या चौकशीमध्ये झालेल्या दप्तर तपासणी तसेच पुरावे यांच्याद्वारे ग्रामसेवक ठेकेदार आदी दोषी ठरले होते. परंतु यामधून सरपंच यांना वगळण्यात आले होते. मुळात सरपंचांना वाचवण्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे छुपी मदत करत होते. तर ज्या ठिकाणी भाजपचे सरपंच आहेत त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मात्र, या संदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये संबंधित ग्रामपंचायत सदस्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करताच तात्काळ पोलिस प्रशासनाला याबाबत गुन्हा दाखल करण्याची सूचना केली आणि आज संबंधितांवर गुन्हाही दाखल झाला आहे. तब्बल एक वर्ष या प्रकरणात सरपंच दोषी असतानाही त्यांना वाचवण्यासाठी केसरकर हे छुपी मदत करत होते. मात्र काही झाले तरी आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधितांना जेलमध्ये पाठवल्या शिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

तळवडे ग्रामपंचायत अपहारामध्ये सरपंच हे मुख्य दोषी असून अजूनही यामध्ये दोषी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या प्रकरणी चौकशीसाठी जी समिती नेमण्यात आली होती तीच संशयाच्या भोवऱ्यात असून त्यामुळे यातून अजून नवीन चेहरे पुढे येणार आहेत. तसेच ७२ लाखाचा आकडा कोटीच्या बाहेर जाण्याचीही शक्यता आहे. आम्ही याबाबत पाठपुरावा करून त्याच्या मुळाशी गेल्याशिवाय गप्प राहणार नाही, असे ते म्हणाले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य म्हणाले, १३ डिसेंबर २०२३ रोजी यासंदर्भात आपण पत्रकार परिषद घेऊन हा प्रकार उघड केल्यानंतर आज पर्यंत दोषींवर कारवाई होण्यास वेळ लागला. परंतु पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्हाला यामध्ये यश आले. आता संबंधितांवर कारवाई होण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. या सर्व कामांमध्ये आम्हाला संदीप गावडे यांनी संपूर्ण सहकार्य केले त्यामुळेच आम्ही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास यशस्वी ठरलो.

प्रतिक्रिया व्यक्त करा