You are currently viewing “महाराष्ट्राची संस्कृती”

“महाराष्ट्राची संस्कृती”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री स्मिता रेखडे लिखित देवशयनी आषाढी एकादशी निमित्त अप्रतिम लेख*

 

*“महाराष्ट्राची संस्कृती”*

 

“चला जाऊ पंढरीला”

‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल ‘

वारकरी संप्रदाय वैष्णव संप्रदायातील मुख्य संप्रदाय. काशी,पंढरपूर ही कधिही नाश न पावणारी पुरातन तीर्थक्षेत्रे. ‘आधी रचिली पंढरी,नंतर वैकुंठ नगरी,जेव्हां नव्हते चराचर तेव्हां होते पंढरपुर ‘ काशी ला शंकर व पंढरपूर ला विष्णूचे अस्तित्व आहे . एक तरी ओवी अनुभवावी तशी एकदा तरी वारी करावी. भक्ती भावाने नतमस्तक होण्यासाठी वारकरी आषाढी एकादशीला शेतीची, व्यवसायाची कामे पुर्ण करुन वारी ला प्रस्थान करतात. झेडां,पताका,टाळ,मृदंगाच्या गजरात भजन किर्तन करत तहानभुक विसरुन दैवताच्या भेटीची अद्भुत आनंदानुभुतित रममाण होतात. ‘ सावळे सुंदर रुप मनोहर,राहो निरंतर ह्रदयी माझे’. भक्तीप्रेमाची वर्षभराची जपणुक करुन वापस जाईपर्यंत शेत दिमाखात डोलत असते .

कोरोना अदृश्यरुपी विषाणुच्या वैश्विक महामारी मुळे पायीवारीवर बंधन आली होती. पण लालपरीच्या (बस) मदतीने पालखीचे आगमन थेट पंढरपूरी झाले होते. ‘ठेविले अंनते तैसेची रहावे’ ह्या उक्तीप्रमाणे सच्छिल,धार्मिक वृत्तीमुळे ‘जय जय विठोबा रखुमाई’ चा बीजमंत्र जपत घराघरातून ‘ठाई ठाई ईश्वराचे अस्तित्व’ मानुन मानसिक वारीतुन आम्ही उपासना करतो. दुस-या वारक-यात पांडुरंग बघुन माऊली म्हणतो. पुराणानुसार ह्या दिवशी उपवास केल्यास पापांतुन मुक्ती व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. व्रतात सर्व ईश्वरांचे तेज एकवटले आहे. अश्या महाराष्ट्राचे दैवत विठोबा ची वारी फार पुर्वी पासून सुरु आहे.

‘ संतकृपा झाली,इमारत फळा आली,ज्ञानदेव रचिला पाया, उभारले देवालया,नामा त्याचा किंकर, तेथे रचिले तें आवार,जनार्दन एकनाथ,खांब दिधला भागवत,तुका झालास कळस,भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकतो ध्वजा,निरुपणा केले बोजा!!

भक्तीसंप्रदायात भागवत धर्माची स्थापना नामदेव,चोखोबा,नरहरी,गोरोबा,सावतामाळी जनाबाई,

कान्होपात्रा,ज्ञानदेव,तुकाराम, निवृती,मुक्ताई ह्या मांदियाळी नी तुळशीमाळ आणि नामस्मरणातुन समाजप्रबोधन परिवर्तन साधले .परमकल्याण साधणारे नाम हे सर्व साधनेचे सार आहे. वाल्या कोळी ही तरला तो नामाच्या साधनेने. भवसागर तरण्याचे कर्म,ज्ञान, भक्ती हे ईश्वर प्रिय अध्यात्म.

‘एक तत्व नाम,दृढ धरी मना”जय जय रामकृष्ण हरी’ नामामृताचा मध ज्यांनी प्राशला त्यांना सर्व सिध्दी प्राप्त झाल्या.’हरी हरी म्हणा तुम्ही सकळ’ आपल्याला अनुकूल असे नामस्मरण हेच परमार्थात ईश्वरप्राप्ती चे उत्तम साधन आहे.’ हरि प्राप्तीची उपाय, धरावे संताचें पाय’!

चातुर्मासात केलेले जपतप, दान,तीर्थक्षेत्री स्नान हे अक्षय फलदायी असते .सुर्य चंद्राचे तेज कमी होऊन अधिक पावसामुळे विविध जंतुकिटक निर्मीतीने अनारोग्य टाळण्यासाठी बंधन घालणे ऊत्तम.

भगवान विष्णु ने वामन रुपात दैत्य बलीला यज्ञामध्ये तीन पावले जागा मागितली. पहिले पाऊलात पृथ्वी,आकाश, सर्व दिशा दुस-या पाऊलात स्वर्ग लोक,तिस-या पाऊलात बलीने स्वतःला समर्पित करुन डोक्यावर ठेवण्यास सांगितले. प्रसन्न होऊन विष्णुनी बलिला पाताळ लोकांचा अधिपती बनवला व वर मागावयास सांगितला. बलीने विष्णु आपल्या महालात नित्य असावे असा वर मागितला विष्णुला बलिच्या बंधनात पाहुन लक्ष्मीने बलीला भाऊ मानले व बंधनातून मुक्त करण्याची विनंती केली. ह्या दिवसापासुन विष्णु आषाढी ते कार्तिक एकादशी चार महिने क्षीरसमुद्रात शयन करतात. शिव भगवान आषाढी एकादशी पासुन महाशिवरात्र पर्यंत तर ब्रम्हदेव शिवरात्री पासुन देवशयनी एकादशी पर्यंत पाताळात रहातात अशी मान्यता आहे.

तुळस ही लक्ष्मीचे प्रतीक आहे. लक्ष्मी विष्णूची भार्या ती तुळशीच्या रुपात सदैव श्रीहरी चरणी राहते. विठ्ठल हे विष्णु चे रुप म्हणून तुळशी वाहुन विठ्लपुजन. हे आध्यात्मिक संस्कार विज्ञानाशी सांगड घालून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. ज्याची जी उपासना असेल तेथे त्या देवतेचा मंत्र वंद्य ठरतो. ईश्वर धर्म म्हणजे काय तर आपल्या मनाला समाधान मिळते ते योग्य कर्म करणे.

‘आम्हा सापडले वर्म, करु भागवत धर्म. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. ‘आत्मा हाच ईश्वर सांगणारा भागवत धर्म.

‘रुप पाहता लोचनी,सुख झाले हो साजणी!!

तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा!!

‘आवडे निरंतर हेची ध्यान’हीच अंतःकरणातील स्पंदने म्हणजे भक्तीची फलश्रुती.🙏🙏🙏🙏🙏

 

सौ. स्मिता श्रीकांत रेखडे.

प्रतिक्रिया व्यक्त करा