You are currently viewing भारत विरुद्ध अमेरिका सामन्यात कोणाचे वर्चस्व राहणार

भारत विरुद्ध अमेरिका सामन्यात कोणाचे वर्चस्व राहणार

*गोलंदाजांचे की पावसाचे?*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

टी२० विश्वचषक २०२४ चा २५ वा सामना बुधवारी भारत आणि अमेरिका यांच्यात होणार आहे. टीम इंडिया या सामन्यात चांगली कामगिरी करून सुपर-८ मध्ये निर्विवाद पोहोचण्याचा प्रयत्न करेल. स्पर्धेतील दोन्ही सामन्यांमध्ये अमेरिकन संघाने स्वतःला सर्वोत्कृष्ट असल्याचे सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीत त्यांना स्पर्धेतील दुबळा संघ समजणे भारतीय संघाची मोठी चूक ठरू शकते.

भारतीय संघाला या सामन्यात अमेरिकेला पराभूत करून सुपर-८ मध्ये स्थान मिळवायचे आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले. मात्र, भारतीय गोलंदाजांनी कहर केला. या सामन्यात भारताने शेवटच्या सात विकेट ३० धावांच्या आत गमावल्या.

या संघाने पाकिस्तानलाही पराभूत केल्यामुळे अमेरिकेविरुद्धची ढिलाईची वृत्ती भारताला महागात पडू शकते. अमेरिकेच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. यामध्ये सौरभ नेत्रावळकर आणि हरमीत सिंग यांचाही समावेश आहे ज्यांनी आतापर्यंत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. अमेरिकेचा संघ हा दुसऱ्या भारतीय संघासारखा दिसतो कारण त्यात भारतीय वंशाचे आठ खेळाडू आहेत. याशिवाय पाकिस्तानी वंशाचे दोन खेळाडू आणि वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडचा एक खेळाडू या संघाचा भाग आहे. सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवूनही अमेरिकेच्या खेळाडूंची फारशी चर्चा होत नसली तरी भारताविरुद्धची चांगली कामगिरी त्यांना क्रिकेट विश्वात ओळख मिळवून देऊ शकते. मोनांक पटेल, हरमीत, नेत्रावळकर, जेसी सिंग आणि नोष्टुश केंजिगे यांची नाळ भारताशी जोडलेली आहे, परंतु जेव्हा रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत सारखे खेळाडू असतील तेव्हा सामना आकर्षक होईल. खेळपट्टीच्या वागणुकीमुळे संघांमधील अंतर कमी झाले असेल पण अमेरिकेला भारतीय संघावर मात करणे सोपे जाणार नाही.

रोहित आणि कोहलीसारख्या फलंदाजांना गोलंदाजी करण्याची किंवा बुमराहसारख्या गोलंदाजाचा सामना करण्याची संधी नेहमीच मिळत नाही आणि अशा परिस्थितीत अमेरिकन खेळाडूंसाठी ही एक संस्मरणीय संधी असेल. नाणेफेक जिंकून भारतीय संघाला नक्कीच प्रथम फलंदाजी करायची आहे. भारताने प्रथम गोलंदाजी केल्यास अमेरिकेला बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजासारख्या गोलंदाजांविरुद्ध तिहेरी धावसंख्या गाठणे कठीण होईल.

आतापर्यंत स्पर्धेच्या दोन्ही सामन्यांत विराट कोहली, सूर्या आणि शिवम दुबे कमकुवत ठरले आहेत. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या या आक्रमक फलंदाजांना येथील परिस्थितीशी जुळवून घेण्यात अपयश आले आहे. अशा स्थितीत दुबेला संघातील स्थान टिकवणे सोपे जाणार नाही कारण यशस्वी जैस्वालसारखे फलंदाज त्याची संधी येण्याची वाट पाहत आहे. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवसारख्या मनगटाच्या फिरकीपटूंनाही सुपर-८ पूर्वी संधी मिळायला हवी. अशा परिस्थितीत दुबेंच्या जागी या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते.

भारत आणि अमेरिका यांच्यातील हा सामना १२ जून रोजी होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होईल, तर स्थानिक वेळेनुसार हा सामना सकाळी १० वाजता सुरू होईल. हवामान अहवालानुसार या काळात पावसाची शक्यता सहा टक्के राहील. ही टक्केवारी कमी असली तरी न्यूयॉर्कच्या हवामानावर विश्वास ठेवता येत नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पावसाची शक्यता पाच टक्के वर्तवण्यात आली होती. सामन्यादरम्यान अधूनमधून पाऊस पडत होता. सामन्यादरम्यान न्यूयॉर्कमधील तापमान २७ अंशांपर्यंत राहू शकते. त्याच वेळी, वारा ताशी १०-१५ किमी वेगाने वाहू शकतो. याशिवाय आर्द्रता ५३ ते ६४ टक्क्यांपर्यंत असू शकते.

टी२० विश्वचषक २०२४ चे आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिज करत आहेत. अमेरिका प्रथमच आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहे. अशा परिस्थितीत न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये ड्रॉप इन पिचचा वापर केला जात आहे, त्यामुळे या स्पर्धेची मजा दिसत नाही. या मैदानावर एकामागून एक लो स्कोअरिंग सामने होत आहेत. सर्वात मोठ्या संघासाठी १०० धावा करणे देखील डोंगरावर उडी मारण्यासारखे आहे. अशा स्थितीत भारत विरुद्ध अमेरिका सामनाही लो स्कोअरिंग होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा