You are currently viewing मराठी भाषा गौरव दिनानिमित्त श्री भगवती हायस्कूल मुणगे येथे “माझा मऱ्हाटाची बोलू कवतिके” कार्यक्रम..

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त श्री भगवती हायस्कूल मुणगे येथे “माझा मऱ्हाटाची बोलू कवतिके” कार्यक्रम..

देवगड :

 

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज जयंती निमित्त श्री भगवती हायस्कूल मुणगे येथे कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांचा “माझा मऱ्हाटाची बोलू कवतिके” हा व्याख्यानपर कार्यक्रम झाला. श्री सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद मालवण यांनी “मराठी भाषेचे अलंकार” याविषयी शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाला प्रबोधन केले. अध्यक्षस्थानी श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री सुरेश गोविंद बांदेकर हे होते तर प्रमुख अतिथी श्री. संजय बांबुळकर, सदस्य शालेय समिती श्री भगवती एज्युकेशन सोसायटी हे होते. श्री सुरेश ठाकूर आणि श्री सुरेश बांदेकर यांच्या हस्ते कुसुमाग्रज प्रतिमा पूजन आणि दीपपूजन झाले.

मराठी भाषेचे अलंकार या सदरात श्री सुरेश ठाकूर यांनी “मराठी भाषेचे संप्रदाय आणि म्हणी” या विषयांवर आपले विचार मांडले. ते म्हणाले “मराठी भाषा लवचिक आहे” असे सांगितले जाते. जशी वाकवावी तशी वाकते. वाकवणारा जितका निष्णात तितके त्याचे बोलणे, लिहिणे परिणामकारक होते. भाषा प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी मराठी व्याकरण, शब्दाचे उच्चारण जसे आवश्यक असते तसेच म्हणी आणि संप्रदाय यांचा उगम, त्यांचे उपयोजन आणि त्यांची निर्मिती याबाबत शालेय व वयात ज्ञान प्राप्त होणे आवश्यक आहे. कारण संप्रदाय आणि म्हणी कोणत्याही भाषेचे अलंकार असतात, ते भाषेचे सौंदर्य वाढवितात हे पटवून देत असताना ठाकूर यांनी अनेक संप्रदाय आणि म्हणी यांची उगमस्थाने गोष्टी रुपातून आणि चर्चेतून मुलांना उलगडून सांगितली. ते पुढे म्हणाले *प्रत्येक वाक्यप्रचार आणि म्हणींना रंग, रूप आणि गंध असतो.* म्हणींच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका श्रीम. गौरी तवटे यांनी केले. तर आभार शिक्षक श्री प्रसाद बागवे यांनी मानले.

ठाकूर म्हणाले “माझा मऱ्हाटाची बोलू कवतिके” या अंतर्गत मराठी भाषेचे विविध रूपे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि रसिक ग्रामस्थ यांचे समोर उलगडून दाखविण्याचा कोकण मराठी साहित्य परिषद मालवण यांचा उपक्रम आहे. यात कथाकथन, नाट्य, व्याकरण, लेखन याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. अलीकडे पळसंब मालवण येथील जयंतीदेवी क्रीडा मंडळ पळसंबच्या कार्यक्रमासाठी “ग्रामीण भागातील युवक हा साहित्य निर्मिती करू शकतो” याविषयी त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा