You are currently viewing स्मृति भाग ३७

स्मृति भाग ३७

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्य. भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ३७* 

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आज आपण शङ्खस्मृतिमधील काही श्लोक पहाणार आहोत . ” ब्रह्माद्याचार ” हा तिसरा अध्याय येतो . यात ब्रह्मचारीने शिक्षण घेतांना कसे वागावे , याचा विचार केलेला आहे . यात जो शिष्याचे उपनयन संस्कार , शौचाचार , अग्निकर्म व सन्ध्योपासनेची शिक्षा दिल्यावर जो वेद प्रदान करतो तोच गुरु असतो , अन्य नाही , हे ठासून सांगितलेले नजरेत भरते . जो शुल्क घेवून अध्यापन कार्य करतो तो उपाध्याय म्हणवला जातो . ( गुरु नाही ) . आता हीच गुरुकुल पद्धत असेल तर कुठल्याही शाळेतले वा काॅलेजमधील शिक्षक कधीच गुरु होवू शकतच नाहीत ?????? कारण ते स्वतःच संस्काराविना शिकवतात ?(सुश्रृताचार्यांनीही उपनयनाचे महत्व व प्रयोग सांगितलेला आहे .) ( मी अभ्यासाविना म्हटले नाही बरं ! हे उल्लेखण्याचे कारण आमच्याकडे शंकासुरांची कमी नाही .) आणि आता भारतात वाढलेला गुरुईझम बघितला तर अक्षरशः लाज वाटते गुरुंची व गुरु मानणारांची !!! नंतर एक श्लोक येतो —

 

*माता पिता गुरुश्चैव पूजनीयाः सदा नृणाम् ।*

*क्रियास्तस्याSफलाः सर्वा यस्यैतेSनादृतास्त्रयः ॥*

माता , पिता आणि गुरु मनुष्यांसाठी सदा पूजनीय आहेत . जो पर्यंत तिघांचा अदर करत नाही तोपर्यंत मनुष्याच्या सगळ्या क्रिया निष्फळ असतात !!

आजकालच्या ब्रेड ओरिएन्टेड लर्निंग स्कूलमधे आई वडिलांना वा गुरुंना नमस्कार करुन शिक्षण घेणारे मुले नाहीतच !! त्यांचे शिक्षकच कधी आईवडिलांना नमस्कार करत नसतील तर ते काय शिकवतील ?

आमच्या घरात १२नोव्हेंबर १९६२ ला सायंप्रार्थना माझ्या आजोबांनी सुरु केली . जी आजतागायत अखंड सुरु आहे . निमित्त माझ्या जन्माचे . प्रार्थना झाली की लहानांनी मोठ्यांना नमस्कार करायचा व मग इतर गोष्टी . माझा दिवस देवादिकांना व घरातील आईसह वडिलधार्‍यांना नमस्कार केल्याशिवाय सुरु होत नाही व मावळतही नाही ! सांगणे असे की रोज नमस्कार करायची सवय लागलेली ! ( जी वयासह वृद्धिंगत होते ती सवय बरं का ! ) सहावीत का सातवीत असेन त्यावेळी . एक दिवस माझेकडून चूक झाली . आजोबांनी पाहिले . नेमकी प्रार्थनेची वेळ झाली होती . सगळे प्रार्थनेला बसलेले . प्रार्थना झाली . मी नमस्काराला उठलो . तेवढ्यात आजोबा कडाडलेच . ” तू कुणालाही नमस्कार करायचा नाही , तिथेच उभा रहा !! ” आता सगळे नमस्कार करतांना मी पहायचे आणि त्या बारापंधरा जणांचा मोठ्यांना होत असलेला नमस्कार पहात थांबायचे !! मला लाज वाटली व पुन्हा तशी चूक झालीच नाही ! या संस्कार करण्याच्या व शिक्षेच्या वेगवेळ्या पद्धतीतून तावून सुलाखून बाहेर पडलेलो ! अशी ही नमस्काराची कथा सर्वाना आनंददायी ठरो .😂😂😂😂

संयमपूर्वक प्रातःकाळी उठून , स्नानादि करुन , अग्नियजन करुन , शांतचित्त होवून , भक्तिपूर्वक गुरुंना अभिवादन करावे . गुरुंची आज्ञा घेवून ब्रह्माञ्जलि बनवून नतमस्तक होवून गुरुंचे मुखकमल न्याहाळत स्वाध्याय सुरु करावा . अबबबबबं !! असे केल्याने कुठे पैसे मिळतात हो ( शंकासूर ) !! पण केलं पाहिजेना ? हो केलेच पाहिजे . पुढे कोणत्या दिवशी व अवस्थेत अध्ययन करु नाही ? ते सांगितलेले आहे . पुन्हा पुढे एक श्लोक येतो—

 

*मधुमांसाञ्जनं श्राद्धं गीतं नृत्यञ्च वर्जयेत् ।*

*हिंसापवादांश्च स्त्रीलीलां च विशेषतः ॥*

मध , मांस , अञ्जन ( नेत्रांजन सुरमादि ) , श्राद्धभोजन , गीत , नृत्य , हिंसा , निन्दा , विवाद आणि विशेष रुपाने स्त्रियांसह क्रीडा यांचा परित्याग करावा .

मध , मांस खावू नये . अंजन घालू नये . श्राद्धभोजन घेवू नये . आता मध का खावू नये ? यावर विचार करु लागलो तर वास्तविक मध हे स्वर सुधारणारे असून त्याचा विरोध का ? मधाचा अभ्यास करता गेलं तर ते रुक्ष आहे . ” अन्नं वृत्तिकराणां श्रेष्ठम् ” या न्यायाने ते स्वभावातील रुक्षत्व खचितच वाढवेल ? म्हणून नको सांगितले असावे ! पण मन अशांत होते अजून समर्पक उत्तराचे शोधात !! अन् सापडले . उष्णतेने पीडित , उष्ण द्रव्यांबरोबर व उष्ण काळात मध विषासमान मारक आहे , हे उत्तर . पहा . उच्चाराने रुक्षता व वेदमंत्रांमुळे उष्णता असे दोन्हीही वाढणार ! म्हणून नको . ” वृध्दी समानैः सर्वेषाम् ” म्हणजे समानाने समानाची वृद्धि होते , या न्यायाने मांस खाल्लं की मांसाची वृद्धि होवून १) आळस , २) जिव्हाजडत्व , ३) ज्याचे मांस त्याचा एखादातरी गुण , इ. गोष्टी सहज होतील म्हणून मांस नको खायला . श्राद्धभोजनाने स्वभावही तसाच होईल ना ?? म्हणून नको . गीत आणि नृत्य हे विद्येचे प्रकार नसून ते कलेत येतात . वेदाध्ययनात व संस्कारात व्यत्यय नको म्हणून ते नको ! हिंसा—निन्दा—विवाद होवूच नये! पुढे म्हटले आहे , विशेषरुपाने स्त्रियांशी क्रीडा नको ! खरंच आज ज्यांनी मुलामुलींचे एकत्र शिक्षण आणले ते श्रेष्ठ का ऋषि श्रेष्ठं ? मला एकत्र शिक्षण आणणारे मूर्ख वाटतात . ते आमच्यावरती , आमच्याच मूर्खांनी आमचीच संस्कृती उद्ध्वस्त होण्यासाठी लादलेलं शिक्षण आहे . यानेच स्त्रीअत्याचाराचे प्रसंग भारतात वाढले , हे एक प्रधान कारण आहे . हे आजच्या विचारवंतांना कळत कसं नाही ? सगळ्या लोकांच्या जीवनात प्रकाश यावा असं वाटत असेल तर पुन्हा गुरुकुलंच असावी असं जोपर्यंत वाटत नाही भारतीयांना तोपर्यंत अंधारच स्वागत करत राहील !!!! शेवटी गुरुदक्षिणा देवून गुरुंना नमस्कार करुन गुरुकुलातून बाहेर पडावं , असं सांगितलंय ! खरं पहायला गेलो तर लग्न झालेल्यांनाच शिक्षणसंस्थेत प्रवेश हवा ! शिक्षकाचे संस्थेव्यतिरिक्त वैयक्तिक जीवनातील आचार—विचार—उच्चारातील पावित्र्य—मांगल्य हे सर्व बघितलं जावं ! नाहीतर आमची मूर्ख न्यायव्यवस्था याचे विपरीत निकाल देणारी ! कशी माझ्या भारत देशाची मान जगात उंचावेल ? आज थांबतो . उद्या पुन्हा नवीन श्लोक !

विनंती इतकीच , सर्वच स्मृति वाचनीयच आहेत . वाचाल ना ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =