You are currently viewing दिवाळी…आठवणीतील…

दिवाळी…आठवणीतील…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका पल्लवी उमेश लिखित अप्रतिम लेख*

 

*दिवाळी…आठवणीतील…*

 

“दिन दिन दिवाळी. गाई म्हशी ओवाळी..

गाई कुणाच्या?? लक्षुमणाच्या..!!

 

लक्षुमन कुणाचा?? आई बापाचा..

दे ग आई पळीभर त्याल..

……त्याल नाही चावडीत चाल..

चावडीत होती निळी घोडी..

लाथा मारी फडोफाडी..

त्याल देई घडोघडी………….”

 

किंवा

 

‘दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी

 

गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या

 

लक्ष्मण कुणाचा, आई-बापाचा

 

दे माई खोबऱ्याची वाटी

 

वाघाच्या पाठीत घालीन काठी..

 

लहाणपणी दिवाळी तोंडावर आली की ही अशी गाणी हमखास गायली जायची …..

 

 

दिवाळी म्हणले कि , आपल्याला डोळ्यासेमोर प्रथम येतात ते म्हणजे फ़टाके……दिवाळीत मग वाटावाटी करुन वाटा मिळालेल्या हक्काच्या फ़टाक्यातुन मग हळूच एक फ़ुलबाजीचा डबा काढुन त्यातील दोन फ़ुलवाज्या पेटवायच्या आणि गरागरा फ़िरवत हे गाणे म्हणायचे…( पण लक्ष मात्र उरलेल्या डब्याला कुणी हात तर नाही न लावत आपल्या? म्हणत त्या डब्यावर बारीक नजर ठेवायची😊)

 

….दुसरे म्हणजे—फ़राळाचे विविध प्रकार…आणि नंतर येते ते म्हणजे नविन नविन कपडे, अंलकाराने नटलेले लहान मुलांपासून प्रौढांपर्यंतचे म्हणजे सर्व वयोगटातील व्यक्तिंचे हसरे चेहरे……

 

प्रत्येकाच्या दारात सडा-समार्जन झालेले दिसते….

दारात लहान मुलांचे सुंदर सुंदर किल्ला प्रदर्शन —-

मोठमोठ्या रंगावली ने सजलेले अंगण–

पणत्यांची आणि दिव्यांची आरास–

घरावर केलेले आकाश कंदील आणि लाइट माळांची सजावट–

आणि घराघरातुन सुटलेला मस्त मस्त फ़राळाचा सुंगंध—-

आहाहा!!!!!! क्या बात है!!!!!

दिवाळीला सणांचा राजा का म्हणायचे ते आता आपल्याला समजले असेलच..

कोणत्याही सणांना इतके महत्व असत नाही जितके की आपण या दिव्यांच्या सणाला देतो..

अगदी धनत्रयोदशी, वसू बारस पासून ते पाडवा, भाऊबिजे पर्यंत मस्त चार पाच दिवस चालणारा हा सण आहे..

 

मुलांच्या परिक्षा संपल्याने त्यांच्यात उत्साह नुसता सळसळत असतो…

 

बायकांचे फ़राळ आणि विविध प्रकारचे खाद्य प्रकार करण्याची तयारी चालू असते..

 

पुरुष लोक घर सजावट आणि आकाश कंदील लावणे ..काही बेत ठरवणे इ. चालू असते..

 

तर घरातील वृद्ध लोक विशेषत: पुरुष दिवाळी अंकाचे वाचन करण्यात मश्गुल असतात..

 

अशा त-हेने प्रत्येक जण या दिवाळीचा आनंद आपापल्या परिने घेत असतो..

आता मात्र मागे वळून बघताना “गेले ते दिन गेले”……किंवा “लहान पण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा….” असे काही पोक्त विचार मनात आल्याशिवाय रहात नाहीत.

 

निरागसपणा, अल्लडपणा , बेबंदशाही याला ही एक वय असते नाही का….

 

कोणत्याही वेळी कुणी ही काहीही केले तर ते नाही बरे दिसत…..लहान मुलांचे हसणे, आणि मोठ्या माणसाचे तसेच हसणे यात एक फ़रक असतो; तो म्हणजे मोठी माणसे कारणा शिवाय हसली तर ती वेडी समजली जातात…..असो..

 

तर सांगायचा मुद्दा प्रत्येकाला आपल्या लहाणपणची किंवा भूतकाळातील दिवाळी ही वर्तमानातील दिवाळी पेक्षा अधिक भावते…आणि आपले मन न कळत तुलना करतेच करते..

 

माझ्या ही आठवणीत माझ्या लहाणपणची दिवाळी आहे..

 

आम्ही सर्व पाठक (माहेरचे आडनाव) दिवाळीला आटपाडी(जिल्हा सांगली) इथे एकत्र यायचो…मला एकूण ६ काका त्यांची प्रत्येकी ४/५ मुले आणि आम्ही तिघे असे एकूण २०/२५ जणांचा घोळका जमत होता..आजी मानाने सर्व मुले,सूना आणि नातवंडात उच्च स्थानी…तिचा शब्द कुणी ही खाली पडु देत नसत..आम्ही तर तिला जाम टरकत असू…पण आदरयुक्त भिती असायची त्याकाळी…प्रत्येक काका काकू आपली आपली जबाबदारी ओळखुन असायचे..कुणी ही आजीच्या मनाविरुद्ध नसत. एकजण सर्वांसाठी कपडे आणायचे तर कुणी फ़टाके, कुणी वाण सामान…कुणी काकू मुलींची वेणी-फ़णी ( त्यावेळी वेणी हा सकाळ आणि संध्याकाळचा एक कामाचा प्रकार होता..त्यात ही मग साधी वेणी, बट वेणी, पाचपेडी, चौकोनी अशा फ़र्माईशी असायच्या काकवांना आणि त्या ही हसत हसत सर्व साळकाया म्हाळकायांच्या मागण्या मनापासून पूर्ण करायच्या…), तर कुणी फ़राळाच्या तयारीचे, कुणी पाणी रांधायचे( आडातुन काढावे लागे)….कुणी सकाळी सकाळी चूल पेटवणे…चहा ठेवणे…इ. कामे बिन भोबाट चालत असे…बिन बोभाट हा शब्द आजच्या काळाला अनुसरुन सुचलेला शब्द ….कारण आता हे चित्र खुप म्हणजे खुपच दुर्मिळ झाले आहे…आणि त्यामुळे पूर्वीची ही दिवाळी आता अप्रूप वाटु लागली आहे. आज घरातील प्रौढांना एवढे मानाचे स्थान मिळते का हा प्रश्न म्हणुन विचारायची वेळ आली आहे.

 

लहानपणी मुलांवर घरची काही जबाबदारी नव्हती….म्हणुन कदाचित त्याकाळची दिवाळी स्मरणात असावी…फ़क्त हुंदडायचे आणि मजा करायची…नव्हे त्यासाठीच आपण जन्माला आलो आहोत हा आव असायचा.दिवाळीच्या आधल्या रात्री फ़टाकेची वाटावाटणी असे….ते काम अर्थात धाकटा काका करे….मौज मस्तीत गोल करुन हा कार्यक्रम उरके…प्रत्येक फ़टाके तुला एक तुला एक म्हणत प्रत्येकाला वाटला जाई…काही मोठ्या फ़टाकेचे वितरण मोठ्यामुलांसाठी मग मुली आणि लहान मुलांना छोटे फ़टाके, नागगोळ्या, रंगीत काडेपेट्या, भुईचक्र,फ़ुलबाज्या हे जास्त मिळत….मग त्या रात्री हे आपल्या वाटणीचे फ़टाके लपवायचे …कारण प्रत्येकाला आपला वाटा मिळून सुद्धा धाकट्याचा पळवणे आणि त्याला रडवणे हा खेळाचा प्रकार चालू होई…मग आईच्या मागे भुणभुण, आईचे दोन रट्टे…मग जवळ घेवुन लाडु भरवणे, मोठ्यांना रागे भरणे …असे करत करत दिवस अपुरा पडत असे….पण दिवाळीच्या आधी फ़टाके कुणी उडवत नसत….कारण दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे पहाटे कोणी पहिला फ़टाका वाजवला याची न कळत स्पर्धा असे… एक उठला की हळुहळु एकेक करत सगळे डोळे चोळत बाहेर येत…आजच्या सारख्या “उठा उठा मोती स्नानाची वेळ झाली….” म्हणुन जाहीराती कराव्या लागत नव्हत्या……दिवाळी पहाटे चार वाजता सुरु व्हायची…बंब पेटलेला असायचा…पणत्या, आकाशकंदील सगळीकडे प्रकाशमान व्हायचे. काका लोकांच्या तेल मालिशला सुरुवात ही झालेली असायची…लहान मुले पहाटेच्या फ़टाक्याच्या आवाजाने भोकाड पसरुन असायची… नुसता वाडाभरुन गोंगाट असायचा…मग कुणी आंघोळीला गेले की त्याच्या साठी फ़टाके, फ़ुलबाजी आवर्जुन लावली जायची….आंघोळ करताना मध्येच औक्षण करताना मिचमिचीत डोळे उघडुन मग आम्हाला दाद मिळायची…आणि सार्थक व्हायचे फ़टाके उडवल्याचे…. धनत्रयोदशीला म्हणजे बायकांच्या पहिल्या आंघोळीला देखिल बायकांचा एकमेकींना सुगंधी उटणे लावुन ,व बाहेरुन ओरडुन फ़ुलबाजी लावली आहे ग..म्हणत पहाटे पहाटे सर्व उठायच्या आत बायकांचे अभ्यंगस्नान उरकत असे..

 

सर्वांचे अभ्यंग स्नान हे सूर्योदयापूर्वीच उरकत असे….त्यावर आजीचा कटाक्ष असे…

 

नरकचतुर्थीला नरकासुराचा वध म्हणुन मोठे काका पायाखाली वाघाटी,किंवा हिंगण बिट्टा फ़ोडायचा कार्यक्रम होई आणि मग आमची वरात पळत पळत देवाला जाई..

 

दिवाळीच्या पहिल्या दिवशी मग पहाटे म्हणजे सकाळी लवकरात लवकर घरा जवळच असलेल्या रामाच्या मंदीरात जायचे पुजा करुन दर्शन घेतले की तिथे फ़टाके उडवायचे..

 

मग घरी येवुन फ़राळावर ताव मारणे….पहिल्या दिवशी घरातील सर्व व्यक्तींचा एकत्रीत फ़राळ मग दुपार पासुन ते दिवाळी संपली तरी नंतर ही २ दिवस तरी सकाळ संध्याकाळ एकमेकांकडे असे एकत्रित फ़राळ कम सहभोजन चाले…लहान-मोठे आणि तमाम महिला वर्ग यांच्या गप्पांना नुसता ऊत येत असे. आमचा किल्ला ही दिवाळीला सैनिकांसह सजलेला असे… एकमेकांकडे मग कोणते सैनिक जास्त आहेत, कसा किल्ला बनवला…इ. चर्चा आमच्यात रंगत…

 

किती तरी अशा आठवणी आहेत..आता मात्र असे चित्र फ़ार क्वचित दिसुन येते..

 

आज आपापल्या फ़्लॅटमध्ये मी आणि माझी मुले एवढेच दिवाळी साजरी करताना दिसतात..रात्रभर टीव्ही मुळे सकाळी उठणे होत नाही…टीव्हीवर कार्यक्रमाची इतकी रेलचेल असते कि, बाहेर फ़िरुन यायचे कष्ट ही नको वाटतात जीवाला…..मग दुसरे दिवशी पहाटे उठणे होत नाही…काय करायचे इतक्या सकाळी उठुन? हा दृष्टीकोण बनला आहे..आपल्या मुलाला हवे तेवढे फ़टाके आणले, कि आपली जबाबदारी संपली आणि बाजारातुन हवे ते पदार्थ हल्ली विकत मिळतात मग आपल्या बायकोने का त्रास घ्यावा—या विचाराने नवरा आणि बाप या भूमिकेतुन घरचा पुरुष आपले कर्तव्य बजावल्याच्या भूमिकेत शांत रहातो….मी कसा विचार करतो तसाच बाकी ही करोत…हा मोठेपणा ही तो मिरवतो …… मुलांना रेडीमेड किल्ले आणुन देतो—मातीत हात कशाला घालायचे—-प्रदुषीत होतात ना हात मग ! हा दृष्टीकोन वाढु लागला आहे. म्हणजे आज कामे हलकी झालीत, पण त्या बरोबर पूर्वीची मजा ही कमी झाली आहे असे वाटते…

 

आज कधी ही कोणत्या ही दिवशी बाहेर फ़राळाचे खायला मिळते…बारश्या पासून ते निवडणुक वाढदिवस कधी ही फ़टाके वाजवले जातात…नविन कपडे तर आज कधी ही आवडले तर सर्रास घेतले जातात. त्यामुळे आता कशाचेच अप्रूप वाटेनासे झाले आहे…शिवाय नात्यां-नात्यांमध्ये दुरावा आला आहे..त्यामुळे एकत्र दिवाळी साजरी करणे ही संकल्पना बाजूला पडली आहे. मी बरा आणि माझा संसार बरा…जोडीला टीव्ही बरा ! मग आम्हाला हवेत कशाला सख्ये सोबती? ही विचारधारा रुजु बघते आहे…जी घातक आहे..माणसाला माणंसांपासून तोडू पहाते आहे…

 

पण काही ही असो ! दिवाळी ती दिवाळीच…दिवाळी आल्याने भरजरी साड्यांमुळे स्त्रिया सुखावुन जातात..स्त्री सुखी कि अख्ख कुंटुंब सुखी रहाते….आणि खर सांगू ? किती ही म्हणले तरी प्रत्येक स्त्रीला आपल्या हातचे फ़राळाचे जिन्नस सगळ्यांना खावु घालायची प्रचंड हौस असते…ते ती आपल्या परिने करण्याचा नक्की प्रयत्न करत असते….कधी यशस्वी होते, तर कधी आहे त्यात समाधानी रहाते……आणि गुणगुणते—–

 

“आली माझ्या घरी ही दिवाळी”……………..

 

“आली हसत नाचत ही दिवाळी”………….

 

—————————————————————————————————-

 

©पल्लवी उमेश

जयसिंगपूर

*संवाद मिडिया*

😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬

*सविस्तर वाचा👇*

————————————————–
*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝

*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨

*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..

🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬

🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨

*सुविधा :*

▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले

▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले

▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा

▪️भूकंपरोधक बांधकाम

▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट

▪️आकर्षक लॉबी

▪️लिफ्टची सोय

▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी

▪️पाण्याची 24 तास सोय

♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*

▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा

▪️अंतर्गत भुयारी गटारे

▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र

👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬

🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563

📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com

🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in

*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*

📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827

*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा