You are currently viewing नागपंचमी सण, आंदोलने, मिरवणुका पार्श्वभूमिवर 17, 18 रोजी मनाई आदेश

नागपंचमी सण, आंदोलने, मिरवणुका पार्श्वभूमिवर 17, 18 रोजी मनाई आदेश

विटे (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : सांगली जिल्ह्यात नागपंचमी सण, विविध आंदोलने, मिरवणुका दरम्यान वाद्ये वाजविणे या बाबीवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिनांक 17 व 18 ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी मनाई आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 प्रमाणे प्रदान अधिकारान्वये पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सार्वजनिक ठिकाणी रहदारीचे विनियमन व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याच्या अधिकारान्वये पोटकलम (एन) मधील रस्त्यांमध्ये किंवा सार्वजनिक जागामध्ये किंवा त्याच्याजवळ गायनवादन करणे, वाद्य, ढोल, ताशे किंवा इतर वाद्ये वाजविणे आणि शिंगे किंवा इतर कर्कश वाद्ये वाजविणे यासाठी लायसन देणे, त्यावर नियंत्रण ठेवणे किंवा जवळपास राहणाऱ्या किंवा जवळून जाणाऱ्या लोकांस अडथळा, गैरसोय, त्रास, धोका, भय किंवा नुकसान पोहोचू नये म्हणून या आदेशाद्वारे मनाई केली आहे.

आदेशात म्हटले आहे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 पोटकलम (ओ) जमाव व रस्त्यातून किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणूका यातील व्यक्तींची वर्तणूक व वागणूक किंवा कृती यांचे विनियमन करणे व मिरवणूकांच्या बाबतीत त्यांनी ज्या मार्गानी, ज्या पध्दतीने व ज्यावेळी जावे ते मार्ग, ती पध्दत व त्या वेळा विहीत करणे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 38 (1) प्रमाणे प्रदान केलेल्या अधिकारान्वये जवळपास किंवा जवळपासच्या मालमत्तेचा भोगवटा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींना त्रास, अशांतता, अस्वस्थता किंवा नुकसान होऊ नये किंवा त्रास, अशांतता, अस्वस्तथा किंवा नुकसान होण्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून लेखी आदेश देऊन पुढील गोष्टींना आळा घालण्यासाठी, मनाई करण्यासाठी, त्याचे नियंत्रण किंवा विनियमन करण्यासाठी त्यास योग्य वाटतील अशा सूचना दिल्या आहेत.

हा आदेश दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजीचे 00.01 वाजल्यापासून लागू केला असून तो दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजीचे 10 वाजेपर्यंत अंमलात राहील. या दरम्यान पोलीस ठाणे स्थलसीमा हद्दीत कोणालाही मोर्चे, मिरवणुका, निदर्शने इत्यादी आयोजित करावयाचे असल्यास त्यांनी संबंधित पोलीस ठाणे अधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून वेळ, मार्ग, घोषणा, मिरवणूका इत्यादी बाबी ठरवून घेवून त्यास परवानगी घेणे बंधनकारक राहील. या आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 131 व 136 प्रमाणे कारवाईस पात्र राहील, असे आदेशात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा