जिल्ह्यात स्टॉप डायरीया अभियान सुरू
सिंधुदुर्गनगरी
पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसारजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग च्या वतीने स्टॉप डायरी या हे अभियान दिनांक १६ जून ते ३० जुलै २०२६ कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
अतिसार हा विशेषतः पाच वर्षाखालील बालकांसाठी जीवघेणा ठरु शकणारा आजार असून सुरक्षित पिण्याचे पाणी, साबणाने हात धुण्याची सवय, परिसराची स्वच्छता आणि स्वच्छता विषयक योग्य पद्धतीचा अवलंब केल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते. नागरिकांमध्ये जन जागृती निर्माण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक बळकट करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आरोग्य विभाग ग्रामपंचायत विभाग पाणी व स्वच्छता विभाग शिक्षण विभाग महिला व बालविकास विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयातून या अभियान प्रभावीपणे राबविले जाणार आहे. अभियानांतर्गत तालुका व ग्राम स्तरावर बैठक आयोजित करण्यात येणार असून ग्रामपंचायत व स्वच्छता समिती शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना अभियानाची माहिती दिली जाणार आहे. गावनिहाय पाणी गुणवत्तेचे परीक्षण करून पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्रोतांची नियमित तपासणी करण्यात येईल. विद्यार्थी आणि स्थानिक स्वयंसेवकांना फिल्ड टेस्ट किटच्या साह्याने पाणी तपासणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेऊन गळती असलेल्या पाईपलाईनचे दुरुस्ती किंवा बदल करण्यात येईल .पाणी साठवण टाक्यांची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाईल .पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नियमित क्लोरीनीकरण करून नळाद्वारे वितरित पाण्यात किमान 0.2 पीपीएम मुक्त अवशिष्ट्य क्लोरीन राखले जात असल्याची खात्री करण्यात येणार आहे.
या अभियानादरम्यान साबणाने हात धुण्याचे महत्त्व़, सुरक्षित पिण्याचे पाण्याचा वापर, अन्न हाताळताना घ्यायची काळजी आणि अतिसार प्रतिबंधाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येईल. गाव स्तरांवर स्वच्छता मोहिमा राबवून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन आणि सुरक्षित कचरा हाताळणी बाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाईल मार्गदर्शन केले जाईल. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक स्थितीची शाश्वतता राखण्यासाठी विशेष योजना करण्यात येणार आहे. स्थानिक समुदाय स्वयंसेवी संस्था अंमलबजावणी सहाय्य संस्था(ISAs ) ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून या अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे .पाणी गुणवत्तेशी संबंधित तक्रारीचा नियमित आढावा घेऊन नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
