समिती रचना निश्चित; ४०० कोटींच्या निधीतून पर्यटन, जल पर्यटन व रोजगार निर्मितीला मिळणार मोठी चालना
सिंधुदुर्ग :
जिल्ह्याच्या पर्यटन व सर्वांगीण विकासाला गती देणाऱ्या ‘सिंधू रत्न’ योजनेच्या समितीची रचना शासनाने निश्चित केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून या समितीच्या अध्यक्षपदी जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार आहेत. तर उपाध्यक्षपद मुख्यमंत्री नियुक्त करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
समितीमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. सिंधू रत्न योजनेसाठी शासनाकडून तब्बल ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी ही योजना सुरू केली असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचे जिल्ह्यातून स्वागत होत असून पर्यटन क्षेत्राला यामुळे मोठा फायदा होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. पर्यटनस्थळांवरील सुविधा, जल पर्यटन, सागरी पर्यटन, रोजगार निर्मिती, स्वयंरोजगार तसेच हिल स्टेशनसंदर्भातील विकासकामांना या योजनेमुळे गती मिळणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला ‘सिंधू रत्न’ योजना संजीवनी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
