पुणे :
भटके विमुकतांचे पहिले अभ्यास केंद्र सावित्रीबाई फुले विद्यापीठात प्रथमच आजपासून सुरू होत आहे. हुतात्मा हरी मकाजी नाईक यांच्या पुण्यतिथी दिनी ही ऐतिहासिक घटना घडत आहे. या अभ्यास केंद्रामार्फत समाजातील तरुणांना दिशा मिळणार आहे तसेच काव्य बोले काळजाला म्हणत समाज प्रबोधन करणाऱ्या साहित्यसम्राट पुणे संस्थेच्या कवीसंमेलनामुळे आज उपस्थित सर्वांना वैचारिक ऊर्जा सुद्धा मिळणार आहे. याची मला खात्री आहे. असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विद्यापीठाचे प्र.कुलगुरू पराग काळकर यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
हुतात्मा हरी मकाजी नाईक यांच्या पुण्यतिथी दिनी मराठी भाषा भवन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी भटके विमुक्त अभ्यास केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी साहित्य सम्राट पुणे संस्थेचे भटके विमुक्त जीवन या विषयावर २१८ वे कवी संमेलन अधीसभा सदस्य कृष्णा भंडलकर यांनी आयोजित केले होते.
विचार पिठावर माननीय प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, कृष्णा भंडलकर अधीसभा सदस्य, रवींद्र शिगणापुरकर, प्रा.डॉ. डी.बी.पवार, प्रा. डॉ.विलास आढाव, प्रा.डॉ. गीता शिंदे, प्रा. डॉ.सुनील भडंगे आणि साहित्यसम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते उद्धवजी काळे यांनी भटके विमुक्तांचा जीवनप्रवास, क्रांतीकारकांचा इतिहास, संघटनांचे कार्य सांगताना भविष्यात सर्व भटके विमुक्त समाज एकत्र येतील आणि तरुणांना दिशा देण्यासाठी अधिक जोमाने समाजसेवा करतील असा विश्वास आपल्या भाषणातून व्यक्त केला.
दुसऱ्या सत्रात प्रबोधनात्मक आणि उत्स्फूर्त कवी संमेलनामध्ये अजूनही समाजातील अनेक घटकांना स्वातंत्र्य कळालेच नाही या आशयाची १६ ऑगस्ट ओरडला या कवितेला टाळ्यांच्या गजरात काव्य रसिकांकडून विशेष दाद मिळाली.
या कवी संमेलनामध्ये कवी राहुल भोसले यांनी गोरगरिबांचा कैवारी हरी मकाजी नाईक यांच्या जीवनावरील कविता, बाळकृष्ण अमृतकर यांनी भटके विमुक्तांचे जीवन दाखवणारी कविता, योगेश भोरे यांनी वास्तव जीवनावरील भाष्य करणारी कविता, जगदीप वनशिव यांनी माणसाला माणूस पण शिकवणारी कविता, कवयित्री रेखा दुसाने यांनी भटके विमुक्तांचे जगणे यावर भाष्य करणारी कविता प्रिया दामले, विजय सातपुते, रामचंद्र पाचुनकर, ऋषिकेश कोल्हे, रेखा दुसाने नंदकिशोर गावडे, गीता शिंदे अशा अनेक कवी कवयित्री यांनी भटके विमुक्त जीवन, समाज, आणि त्यांचा इतिहास अशा विषयांवरील परखड आणि बहारदार कविता सादर करून काव्य रसिकांची मनी जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा भंडलकर यांनी, कवी संमेलनाचे सूत्रसंचालन विनोद अष्टुळ आणि तर आभार डॉ.गीता शिंदे तसेच बाबासाहेब दूधभाते यांनी केले.
