You are currently viewing इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारताचा प्रथमच कसोटी पराभव

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारताचा प्रथमच कसोटी पराभव

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिला पराभव

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाला. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कांगारू संघाने नऊ गडी राखून विजय मिळवला. पुणे येथे २०१७ साली कांगारूंनी शेवटचा विजय मिळवला होता. दुसऱ्या डावात त्यांना विजयासाठी ७६ धावांचे लक्ष्य मिळाले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (शुक्रवारी) ऑस्ट्रेलियाने एका गड्याच्या मोबदल्यात ७८ धावा करत मालिकेत पहिला विजय मिळवला. भारताकडे २-१ अशी आघाडी आहे. सलग तिसरा कसोटी सामना तीन दिवसात संपला.

होळकर स्टेडियमवर पहिल्यांदाच कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. यापूर्वी २०१६ मध्ये त्यांनी येथे न्यूझीलंडचा ३२१ धावांनी पराभव केला होता. त्याच वेळी, २०१९ मध्ये बांगलादेशचा एक डाव आणि १३० धावांनी पराभव झाला होता. केवळ होळकर स्टेडियमवरच नाही तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला पहिल्यांदाच कसोटीत पराभव पत्करावा लागला. कर्णधार असताना त्याने पाचपैकी चार कसोटी जिंकल्या आहेत आणि एक सामना गमावला आहे.

भारताने पहिल्या डावात १०९ धावा केल्या होत्या. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने १९७ धावा केल्या होत्या. त्यांना ८८ धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात १६३ धावांत सर्वबाद झाला. त्यांनी ७५ धावांची आघाडी घेतली. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ७६ धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात कांगारू संघाने १८.५ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ८७ धावा करत सामना जिंकला.

या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ विश्व कसोटी विजेतेपदाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकला असता तर अंतिम फेरी गाठली असती, मात्र आता त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. विश्व कसोटी विजेतेपदाचा अंतिम सामना ७ ते ११ जून दरम्यान इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळवला जाईल. आता भारताला चौथ्या कसोटीत विजय मिळवावा लागेल, अन्यथा श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लायनसाठी हा कसोटी सामना संस्मरणीय ठरला. त्याने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावात आठ विकेट्स घेतल्या. सामन्यात ११ विकेट घेतल्याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दुसऱ्या डावात त्याने अधिक धोकादायक गोलंदाजी केली. लायनने रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांना बाद केले. लायनने भारतीय संघाला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाला कमी धावांचे लक्ष्य मिळाले.

दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे त्रिकूट सामना रोमांचक करेल अशी टीम इंडियाच्या चाहत्यांना अपेक्षा होती. अश्विनने पहिल्याच षटकात विकेट घेत खळबळ उडवून दिली, पण त्यानंतर मार्नस लॅबुशेन आणि ट्रॅव्हिस हेडने आघाडी घेतली. दोन्ही भारतीय गोलंदाज विकेट्ससाठी तळमळत होते. हेडने नाबाद ४९ आणि लबुशेनने २८ धावा केल्या. ख्वाजा शून्यावर बाद झाला.

भारताकडून या सामन्यात फक्त चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावले. पहिल्या डावात विराट कोहली आणि शुभमन गिल यांनाच २० धावांचा आकडा गाठता आला. कोहलीने २२ आणि शुभमनने २१ धावा केल्या. टीम इंडिया १०९ धावांवर बाद झाली. दुसऱ्या डावात भारताच्या दिग्गज फलंदाजांकडून सर्वाना चांगल्या कामगिरीची अपेक्षा असताना एक एक करून खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. पुजारानेच भारताची इज्जत वाचवली. त्याने दुसऱ्या डावात ५९ धावा करून भारताला डावाच्या पराभवापासून वाचवले.

मालिकेतला चौथा आणि शेवटचा सामना ९ मार्च पासून अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा