You are currently viewing शिक्षण..

शिक्षण..

*जीवनात शिक्षणाचे सामर्थ्य अपरंपार आहे.पशुचा पशुपती करण्याचे विलक्षण सामर्थ्य शिक्षणात आहे.खऱ्या अर्थाने शिक्षण कधी संपतच नाही.’शिक्षण’ या शब्दाचा खरा अर्थ ‘शिक-क्षण’ असा आहे.याचाच भावार्थ असा की,माणसाने जीवनात क्षणाक्षणाला शिकायचे असते. शिक्षण कोणाकडून घ्यायचे याला मर्यादा नाही.मिळेल त्या मार्गाने शिक्षण घ्यावयाचे असते.त्याचप्रमाणे पोरापासून थोरांपर्यंत कोणाकडूनही शिक्षण अवश्य घ्यावे.तसे पाहिले तर विश्वातील प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक प्राणी किंवा प्रत्येक माणूस यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच असते.शिक्षणाने माणूस विनम्र होतो,शहाणा होतो व त्याला जीवनात शांती-समाधान प्राप्त होते.शिक्षण कसे घ्यायचे,ते कसे पचवायचे व त्याचे संतर्पण कसे करायचे यासाठी सुद्धा शिक्षण आवश्यक आहे.शिक्षणाचे यथार्थ महत्त्व मानव जातीला न समजल्यामुळे मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण होत असतात.शिक्षणाने माणसांतील माणूस निर्माण झाला पाहिजे,किंबहुना माणसांतील माणूस जे निर्माण करते त्यालाच शिक्षण असे म्हणतात.*

🎯 *लोकांना सुधारण्याचे दोन मार्ग.एक शिक्षण व दुसरा मार्ग म्हणजे शिक्षा.शिक्षा केल्याशिवाय मूर्ख सुधारत नाही तर शिक्षण देऊन सुज्ञांना सुधारता येते.*

🎯 *शिकावयाचे दोन मार्ग.अभ्यास करून शिकणे हा एक मार्ग आणि शिकविता शिकविता शिकणे हा दुसरा मार्ग.*

🎯 *शिक्षण असे दिले गेले पाहिजे की त्याच्यातून एका बाजूने माणसाला पोट भरता आले पाहिजे व दुसऱ्या बाजूने त्या शिक्षणातून त्याला शहाणपण प्राप्त झाले पाहिजे.*

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा