You are currently viewing “मुलींना माहेर असतं, सासर असतं पण घर नसतं”

“मुलींना माहेर असतं, सासर असतं पण घर नसतं”

एका विवाहित स्त्रीचं व्यक्तिगत मत…

मत वाचल्यावर मनात एक प्रश्न उभा राहतो,
खरंच हे सत्य आहे का?
आजची स्त्री ही उच्चशिक्षित आहे, नारी शक्ती म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं.
समाजातील विविध घटकांमध्ये तिचं योगदान हे अमूल्य आहे,
स्त्री ही माता, भगिनी, भार्या, मुलगी, मैत्रीण आहे.
प्रत्येक रुपात ती आपली एक स्वतंत्र ओळख जपते… एक वेगळेपण दाखवून देते..
अपार प्रेमाचा स्रोत स्त्रीच्या हृदयात असतो,,,
असं सर्व असताना सुद्धा स्त्रीला असं का वाटावं की, “मुलींना माहेर असतं, सासर असतं, पण घर नसतं…???

पूर्वी असलेली एकत्र कुटुंब पद्धती आज ऱ्हास पावताना दिसतेय, आणि एककल्ली कुटुंब व्यवस्था जन्मास येताना दिसतेय,
ज्यात मी, माझा नवरा आणि माझं मूल. ( शक्यतो एकच, दुसऱ्याची जबाबदारी नको)
त्यात स्वतःच्या माता-पिता समान असलेले, ज्यांनी तिच्या नवऱ्याला लहाणाचं मोठं केलं, ते सासू-सासरेही नकोसे वाटतात, किंबहुना त्यांची अडचणच वाटते.
पण काहीवेळा असा विचार करणाऱ्या मुली ह्या लग्नापूर्वी आपल्या माहेरच्या घरी स्वतःच्या आई वडील भावंडांसमवेत कशा राहत असतील? त्यांचं त्यांच्या माहेरी पटत असेल का?
आई वडिलांना त्या मान देत असतील का?
भावंडांशी प्रेमाने वागत असतील का????
असे कित्येक प्रश्न आ वासून समोर उभे राहतात.
कारण लग्नानंतर जर “माहेर” सुद्धा त्यांना घर वाटत नाही,,,,
तर……
“सासर” ला त्या “घर” समजतील का?
हाच महत्वाचा प्रश्न उभा राहतो.
लग्नापूर्वी जर त्यांनी माहेरी असताना आपल्या घरात आई-वडील, भाऊ, बहीण,,,
असलेच एकत्र तर काका, काकी, आत्या इ. ना मान-सन्मान, प्रेम, माया, आपुलकी दिली असेल तर,,,
लग्नानंतरही ते माहेर त्यांना आपलसच वाटणार. आपल्या घरच्या लोकांविषयी अपार प्रेम असणार, त्या घराची ओढ किंचितही कमी होणार नाही.
कारण त्याच घरात तिचा जन्म झालेला असतो, बालपण गेलेलं असतं, आणि लग्न होताना आनंदाश्रूनी त्याच घराने, आणि प्रिय व्यक्तींनी निरोप दिलेला असतो, जो तिला पुन्हा पुन्हा तिच्या माहेराकडे जाण्याची ओढ लावत असतो….
पण…
इथेही एक प्रश्न राहतोच तो म्हणजे *”माहेरी तिच्याबद्दल माहेरच्यांना किती आपुलकी, प्रेम, माया, ओढ असेल?”*
जर ती नसेल तर मात्र “माहेर” असतंच, पण ते तिच्यासाठी “घर” नसतं….

दुसरी बाजू विचारात घेतली तर,
“सासर” हे तेव्हाच तिच्यासाठी “घर” बनतं,
जेव्हा ती स्वतः सासरसाठी समर्पित होईल, सासर आपलं मानेल, सासरची लोकं, नवीन जुळलेली नाती ती आपलीशी करेल, त्यात स्वतः प्रेम, माया, आपुलकी भरेल,,,,,
आणि सासरच्या घराला स्वतःचं “घर” मानेल…
घराला घरपण देणं हे सुद्धा एका स्त्रीच्या हातात असतं,
कधी लेक होऊन, कधी माता होऊन, तर कधी भार्या होऊन तिने ते घर सावरायचं असतं,
योग्य दिशेला वळवायचं असतं,
आणि घराला घरपण मिळवून द्यायचं असतं.
घरातल्या माणसांवर कधी प्रेमाने, तर कधी रुसव्या, फुगव्याने आपलंसं करायचं असतं,
आपल्या बद्दल त्यांच्या मनात प्रेम, माया, आपुलकी आणि घराची सून म्हणून आदर निर्माण करायचा असतो.
तेव्हाच सासर हे तिच्या साठी माहेराहून प्रिय होऊन “घर बनतं”.

आजकाल एकत्र कुटुंब पाहायला मिळणं खूप अवघड झालेलं आहे,
कुटुंब व्यवस्थेत झालेले बदल हे बऱ्याचअंशी निराशाजनक आहेत.
अशाही काही स्त्रिया असतात,
ज्या स्वतःचं घर टिकण्यासाठी छोटे छोटे घरात उडणारे खटके हे हसण्यावारी नेतात,
क्षणिक दुःख गिळून पुन्हा चेहऱ्यावर हास्य फुलवतात,
काहीजणी असतात,
ज्या कोणीही काहीही बोललं तरी त्यावर लक्षच देत नाहीत,
आपण आणि आपलं काम, हेच पाहतात,
अशावेळी घरात सुख, सौख्य नांदते, भांडणतंटे झाले तरी अवघ्या काहीच क्षणात ते विसरूनही जातात,,,
आणि पुन्हा एकमेकांमध्ये प्रेमभावना पहायला भेटते.
पण,,,,,
हल्ली माझं एक वेगळं घर असावं, मला स्वातंत्र्य असावं, अशा भापक कल्पनेतून कुटुंब उध्वस्त होताहेत,
एकाच घरात आई समान सासुशी, बहिणीसमान नणंद, जावेशी पटत नाही (अपवाद वगळता).
त्यातूनच स्त्रीच्या मनात खदखद तयार होतो, आणि आपण वेगळं रहावं, “सासर” हे आपल्यासाठी “घर” नाही,
आपलं एक स्वतंत्र घर असावं,(भले ते भाड्याचं असेल)
ज्यात आपण, आपला नवरा, आणि एक मूल हाच संसार आनंदात करू….
अशी कल्पना उत्पन्न होऊ लागते, आणि आनंदात, सुखात जगणारे आठ दहा लोकांचं कुटुंब तुटून ना माहेर, ना सासर, असं “घर” नावाचा वेगळा संसार उभा राहतो,
ज्यात क्षणोक्षणी भय, चिंता, काळजी नजरेत दिसत असते,
वेळ घालविण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी मित्र-मैत्रिणी भेटत नाहीत, कॉम्प्युटर, मोबाईल हेच मित्र बनतात, एकलकोंडेपणा वाढीस लागतो….
पण स्वातंत्र्याच्या नावाखाली वेगळेपण जन्म घेतं…

जर स्त्रीने स्त्री शी पटवून घेतलं,
स्त्रीने स्त्रीला समजून घेतलं,
एकमेकींची सुख दुःख वाटून घेतली,
सासूला आईचा दर्जा,
सासऱ्यांना वडील मानून,
दिर, नणंद यांना भावंडांसमान लेखल
तर,,,,
घर तर तुटत नाहीच,
पण “माहेराची” आठवण न येता,,,,
“सासर” हेच तिचं “घर” बनतं….
अगदी अखेरच्या श्वासापर्यंत…!!!!

म्हणजे….
स्त्रीने जर ठरवलं तर….
“माहेर” असो वा “सासर”….
ती स्वतःच त्याच “घर” बनवू शकते….
आणि बिघडवूही शकते….!!!

(दिपी)

प्रतिक्रिया व्यक्त करा