पुणे (गुरुदत्त वाकदेकर) :
जलदिनाचे औचित्य साधत तितिक्षा इंटरनॅशनलतर्फे आयोजित तितिक्षा कला साहित्य संमेलन पुणे २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. दशकपूर्तीनंतर पुण्यात भरलेले हे पहिले संमेलन ठरले. मराठी भाषा, संस्कृती आणि विविध कलाप्रकारांना प्रोत्साहन देत या उपक्रमाने सर्जनशीलतेसाठी सक्षम व्यासपीठ उभे केले. साहित्य, कला, क्रीडा, उद्योग, न्यायव्यवस्था आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत समाजसंवर्धन आणि सांस्कृतिक जतन यांचे महत्त्व अधोरेखित झाले.
कार्यक्रमाची सुरुवात “गर्जा महाराष्ट्र माझा” या राज्यगीताने झाली. ओवी काळे हिने नृत्याविष्कारातून गणेशस्तवन सादर केले. ग्रंथपूजन, प्रतिमापूजन आणि कलशपूजन या विधींनी कार्यक्रमाला पारंपरिक स्वरूप प्राप्त झाले. लोककलावंत राजेश खर्डे, वेसावकर यांच्या हस्ते जलपूजन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. शलाका गाडगीळ यांनी अष्टविनायकांवरील स्वागतगीत सादर केले. नीला चित्रे, विजय जकातदार आणि सुनीता कावसनकर (युगंधर प्रकाशन) यांच्या हस्ते ‘इच्छापूर्ती’ आणि ‘अभिलाषा’ यांसह पाच पुस्तकांचे प्रकाशन झाले.
अमृत बिराजदार, शंकर अंदानी, सुभेदार महेंद्र गवई, राजेश खर्डे, वेसावकर, शहाजीराव पाटील, शोभा जोग यांची प्रमुख उपस्थिती लाभली. व्यासपीठावरील वक्त्यांनी तितिक्षा संस्थेच्या कार्याचा गौरव व्यक्त केला. नवोदितांना संधी उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाची प्रशंसा झाली. कला आणि साहित्याच्या प्रवासातील संघर्ष, जिद्द आणि अनुभव यावर विचार मांडले गेले. साहित्य विचारांना दिशा देते, तर कला त्या विचारांना गती देते, अशी भूमिका व्यक्त झाली.
संमेलनात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना तितिक्षा गानसम्राज्ञी लता मंगेशकर स्मृती पुरस्कार, तितिक्षा मंदाश्री स्मृती पुरस्कार, तितिक्षा शौर्यसंग्राम पुरस्कार, तितिक्षा समाज कोहिनूर पुरस्कार, तितिक्षा साहित्य सूर्य पुरस्कार, समाजभूषण, समाजरत्न, शिक्षणरत्न, कलारत्न, काव्यरत्न, शब्दरत्न, कल्पकता रत्न आणि जीवनगौरव अशा सन्मानांनी गौरविण्यात आले. शोभा जोग, सुनीता कावसनकर, सुभेदार महेंद्र गवई, शहाजीराव पाटील, राजेश खर्डे, वेसावकर, प्रकाश पाठक, विठ्ठल मुरकेवार, अनिता टिळेकर, मनिषा रानवडे, लता महेंद्र गवई, अमोल काळे, निलेश दातार, प्रथमेश सूर्यवंशी, मनोहर वाळिंबे, सुलक्ष्मी बाळगी, ज्योती हमीने, संजय पातुरकर, दिपाराणी गोसावी, लक्ष्मण शिंदे, रविंद्र गाडगीळ यांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कारार्थींच्या वतीने संजय पातुरकर आणि मनोहर वाळिंबे यांनी मनोगत व्यक्त केले. ‘आई’ या विषयावर चारोळ्या सादर करणाऱ्या ५३६ साहित्यिकांमधून १२४ जणांना तितिक्षा प्रमोद मातृगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
इतिहास संशोधक मंडळाच्या आवारातील पोतदार सभागृहात संमेलनाचा उत्तरार्ध रंगला. अमृत बिराजदार, निलेश दातार, शंकर अंदानी, लक्ष्मण शिंदे आणि मनोहर वाळिंबे यांच्या उपस्थितीत महाशिवरात्र, होळी आणि सावित्री काव्यलेखन स्पर्धांचे पारितोषिक वितरण झाले. विना सूत्रसंचालक कवितेतून कवितेला आमंत्रण देणारी संकल्पना विशेष ठरली. लकी ड्रॉ आणि ‘सर्वोत्कृष्ट रसिक’ पुरस्कारांनी कार्यक्रमाला वेगळी रंगत दिली. वाचन संस्कृतीला चालना देत नव्या लेखकांना प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय यशवंत सातपुते, प्रमोद कुलकर्णी आणि प्रिया दामले यांनी केले, तर संयोजन एम. अजया, अजिता मुळीक आणि भालचंद्र शिर्के यांनी केले. सांस्कृतिक जतन, सर्जनशील अभिव्यक्ती आणि समाजसंवाद यांचा संगम साधणारे हे संमेलन ठसा उमटवून गेले.
