You are currently viewing गुलमोहरचं पत्र तिच्यासाठी

गुलमोहरचं पत्र तिच्यासाठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता बढे लिखित अप्रतिम लेख*

 

*“गुलमोहरचं पत्र तिच्यासाठी”*

 

प्रिये,

तू पहिल्यांदा माझ्या सावलीत उभी राहिलीस त्या दिवसापासून

माझ्या प्रत्येक फांदीला अर्थ मिळाला.

तुझ्या हसण्याने माझ्या कळ्या उमलल्या,

तुझ्या स्पर्शाच्या वाऱ्याने माझी पानं थरथरली.

तुला कदाचित जाणवलं ही नसेल,

पण तू गेल्यावर मी थोडा रिकामा होतो.

जसा सूर्य असतो, आभाळ असतं,

पण माझे रंग मात्र तुझ्यासोबत निघून गेले.

दर वर्षी मी पुन्हा लाल फुलांनी पेटतो,

लोक म्हणतात — “किती सुंदर फुललाय गुलमोहर!”

पण त्यांना काय ठाऊक,

माझ्या प्रत्येक पाकळीत मी तुझंच नाव लिहिलंय.

जर कधी पुन्हा या वाटेने आलीस,

तर थांब एक क्षण माझ्या सावलीत,

मी काही बोलणार नाही…

फक्त काही फुलं अलगद ठेवेल तुझ्या पायांशी.

तुझ्या प्रतीक्षेत

तुझा गुलमोहर

 

त्या वर्षी पावसाळा लवकर आला होता.

गुलमोहराच्या फांद्यांवर पाण्याचे थेंब चमकत होते , जणू अपूर्ण शब्द थांबून राहिले होते.

आणि एक दुपार…

ती पुन्हा त्या वाटेने आली.

पण आता तिच्या चालण्यात आधीसारखी बेफिकिरी नव्हती,

डोळ्यांत थोडं अंतर, थोडी आठवण होती.

ती सावलीत थांबली काही वेळ.

क्षणभर काहीच बोललं गेलं नाही.

वार्‍याने हलकेच फांदी हलवली,

आणि काही लाल पाकळ्या तिच्या खांद्यावर अलगद पडल्या.

ती हसली,हलकंसं, ओळखीचं.

हात पुढे करून तिने खोडाला स्पर्श केला.

“मी परत आले…” ती कुजबुजली.

त्या स्पर्शात प्रश्न नव्हते,

तक्रारी नव्हत्या,

फक्त एक शांत समजूत होती.

आणि त्या दिवशी गुलमोहोर अधिकच फुलला.

कारण काही प्रेमांना शब्द लागत नाहीत.

ते सावलीत, शांतपणे, वर्षानुवर्षं थांबू शकतात.

आणि त्या दिवसापासून,

ती कधी रोज नाही आली,

पण अधूनमधून येऊ लागली.

आणि गुलमोहरानेही शिकुन घेतलं,

प्रेम म्हणजे धरून ठेवणं नाही,

तर प्रेम म्हणजे परत येण्यासाठी उभं राहणं.

येऊ लागली होती अधूनमधून.

सावलीत काही क्षण थांबायची,

पाकळ्या हातात घ्यायची… आणि शांत निघून जायची.

एके दिवशी मात्र ती एकटी नव्हती.

तिच्यासोबत एक लहान मुलगी होती ,

डोळ्यांत तसंच कुतूहल, ओठांवर तसंच हसू.

“आई, हा किती सुंदर लाल झाड आहे!”

मुलगी आनंदाने म्हणाली.

ती क्षणभर थांबली.

गुलमोहराकडे पाहिलं ,

त्या नजरेत भूतकाळ नव्हता,

फक्त एक हलकी कृतज्ञता होती.

“हो… हा माझा जुना मित्र आहे,”

ती हळूच म्हणाली.

मुलगी धावत जाऊन खोडाला मिठी मारली.

त्या छोट्या हातांच्या उबेत

गुलमोहराला काहीतरी वेगळंच जाणवलं.

प्रेमाचं रूप बदलतं,

पण त्याचा रंग तसाच राहतो.

त्या दिवशी फुलं जरा जास्तच सांडली.

त्यात विरह नव्हता, हुरहूर नव्हती,

फक्त एक पूर्णविराम होता, सुंदर, शांत.

ती निघून गेली…

पण यावेळी गुलमोहर रिकामा नव्हता.

कारण त्याला कळलं होतं —

काही प्रेमं आयुष्यात राहत नाहीत,

पण ती आयुष्य घडवून जातात.

काळ पुढे सरकत गेला.

गाव बदललं, रस्ते रुंद झाले,

जुनी घरं पाडून नवी उभी राहिली.

पण गुलमोहर तिथेच उभा होता —

थोडा अधिक रुंद, थोडा अधिक शांत.

एक संध्याकाळ…

पांढऱ्या केसांची एक स्त्री हळूहळू त्या वाटेने आली.

चालण्यात आता घाई नव्हती,

पण पावलांना ओळखीची दिशा होती.

ती सावलीत येऊन थांबली.

हात पुढे केला…

जुन्या खोडावरच्या खाचाखोचांना स्पर्श केला.

“आपण दोघं म्हातारे झालो, नाही का?”

ती हलकंसं हसली.

वार्‍याने फांद्या हलवल्या.

काही पाकळ्या तिच्या पायाशी पडल्या —

आता त्या आधीसारख्या ताज्या नव्हत्या,

पण रंग अजूनही तितकाच लाल होता.

ती हळूच खाली बसली.

डोळे मिटले.

काही क्षण… काही आठवणी…

आणि एक दीर्घ श्वास.

त्या संध्याकाळी सूर्य जरा जास्त वेळ थांबला होता,

जणू या दोघांच्या शेवटच्या भेटीचा साक्षीदार व्हायला.

ती उठली.

एक पाकळी उचलली.

हृदयाजवळ ठेवली.

आणि निघून गेली —

यावेळी मागे वळून न पाहता.

गुलमोहर मात्र शांत होता.

कारण काही कथा पुन्हा सुरू होत नाहीत,

त्या फक्त पूर्ण होतात.

आणि पूर्ण झालेल्या कथांना

नेहमीच एक सुंदर लाल रंग असतो…

 

ती गेल्यानंतर अनेक दिवस गावात कुजबुज होती.

कोणी म्हणालं — ती शहरात स्थायिक झाली.

कोणी म्हणालं — ती आता परत येणार नाही.

 

पण एका पावसाळी सकाळी,

गुलमोहराच्या खोडाशी काहीतरी चमकलं.

 

माती थोडी सरकली होती.

तिथे एक छोटंसं टिनचं डबकं पुरलेलं होतं.

 

पावसाच्या पाण्याने ते अर्धवट उघडलं…

आत एक जुना कागद होता.

ओलसर, पण अक्षरं अजून जिवंत.

 

“जर कधी मी परत आले नाही,

तर समज — मी तुला विसरले नाही.

मी फक्त जगायला निघाले आहे.

तू इथेच राहा…

कारण माझ्या आयुष्यातला सर्वात शांत क्षण

तुझ्या सावलीतच होता.”

 

खाली एक तारीख —

आणि तिचं नाव.

 

गुलमोहराच्या फांद्या त्या दिवशी फार हलल्या नाहीत.

वाराही शांत होता.

 

जणू त्याला आधीपासूनच माहीत होतं —

ती कधीच पूर्णपणे गेली नव्हती.

 

कारण प्रेम काही वेळा भेटीत नसतं,

ते जपलेल्या जागांमध्ये राहतं.

 

आणि त्या दिवसापासून

गुलमोहराच्या मुळांखाली एक रहस्य दडलेलं आहे —

एक अपूर्ण नाही,

तर न बोललेलं पूर्ण प्रेम.

तेव्हापासून च गुलमोहोराची लाली अजूनच भडक झाली……लाल….रक्त लाल….

 

*रणरागिणी संगीता श्रीकांत बढे*

*वर्धा*

प्रतिक्रिया व्यक्त करा