कोकणच्या जलप्रवासाचे नवे पर्व सुरू
– मुंबई-विजयदुर्ग ‘रो-पॅक्स सेवेला मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा
-मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मेहनतीला आले यश
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनाला चालना
-कोकण–मुंबई दुवा होणार अधिक मजबूत; जलसेवेतून विकासाचा महामार्ग
-सागरी वाहतुकीत महाराष्ट्राची झेप; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना साकार
*मुंबई,:*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून केलेल्या आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-विजयदुर्ग रो-रो जलवाहतूक सेवेचा आज मोठ्या उत्साहात शुभारंभ सोहळा संपन्न झाला.मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवपूजा करून भाऊचा धक्का, मुंबई येथून या सेवेची पहिली फेरी कोकणच्या दिशेने रवाना झाली. पहिल्या फेरीला मुंबईकर चाकरमानी व पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनाला चालना*
ही रो-पॅक्स सेवा मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या पायाभूत सुविधा आणि सागरी विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानली जाते. राज्यातील सागरी वाहतूक अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. “कोकण आणि मुंबई यांना अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी जलवाहतूक हा सर्वोत्तम पर्याय आहे. या सेवेच्या माध्यमातून प्रवाशांचा वेळ, खर्च आणि श्रम वाचतील, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
*कोकणच्या अर्थव्यवस्थेला चालना*
रो-पॅक्स सेवेमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर कोकणातील पर्यटन, मत्स्यव्यवसाय, स्थानिक व्यापार आणि उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळणार आहे. पर्यटन क्षेत्रात वाढ होऊन स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच मालवाहतुकीसाठीही हा मार्ग अधिक उपयुक्त ठरणार आहे. कोकणातील नागरिकांसाठी आणि विशेषतः मुंबईत वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांसाठी ही सेवा अत्यंत दिलासादायक ठरणार असून येत्या काळात ही रो-पॅक्स सेवा मुंबई-कोकण वाहतुकीचा एक मुख्य पर्याय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ही रो-पॅक्स बोट सुमारे ६२५ प्रवासी क्षमतेची असून त्यामध्ये एकाच वेळी ४० चारचाकी वाहने आणि २५ दुचाकी वाहने वाहून नेण्याची क्षमता आहे. प्रवाशांसाठी आरामदायी आसनव्यवस्था, सुरक्षितता उपकरणे, आधुनिक नेव्हिगेशन प्रणाली आणि सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास अवघ्या ६ ते ७ तासांत पूर्ण होणार असल्याने वेळेची मोठी बचत होणार आहे. तसेच वाहनांसह प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्याने कुटुंबासोबत किंवा व्यवसायिक कारणांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

