*कोकण विभागातील शाळांची पटसंख्या व अतिरिक्त शिक्षकांच्या संदर्भातील प्रश्न कायमचे निकाली*
*मंत्री नितेश राणे, मंत्री उदय सामंत यांच्या आग्रही भूमिकेमुळे शासन निर्णयात होणार बदल*
*शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वाचे घेतले निर्णय
*पहिली ते आठवीच्या शाळांना मिळणार हक्काचे शिक्षक
*१० पटसंख्या असलेले वर्ग बंद होणार नाहीत किंवा दुसऱ्या शाळेत समायोजित केले जाणार नाही
*१५ मार्च २०२४ चा शासन निर्णयात होणार बदल
*शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा होता सततचा पाठपुरवा
मुंबई;
पहिली ते आठवीच्या वर्गात कितीही विद्यार्थी कमी असले तरी शिक्षक एक मंजूर होणार , तसेच नववी दहावीच्या वर्गात किमान 10 विद्यार्थी एका वर्गात असल्यास शिक्षकाचे पद मंजूर राहणार आणि तो वर्ग दुसऱ्या शाळेत समाविष्ट केला जाणार नाही. अशा प्रकारचा दिलासादायक निर्णय आज शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला.त्यामुळे कोकण विभागातील अनेक मराठी माध्यमाच्या बंद पडणाऱ्या शाळा आणि त्यातील वर्ग वाचले आहेत. तसेच अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळालेला आहे. या बैठकीनंतर 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयात बदल करण्याचे ठरवण्यात आले आहे.
*कोकण विभागातील दुर्गम, डोंगराळ, सागर किनारपट्टी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याने अनेक मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये होत्या, त्याकरता मंत्री मा. श्री उदय सामंत, मंत्री मा. श्री. नितेश राणे , आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किरण सामंत, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितत शिक्षण मंत्री मा. श्री दादा भुसे यांच्या दालनात सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली.
सदर बैठकीमध्ये मंत्री नितेश राणे मंत्री उदय सामंत यांनी आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कोकणातील भौगोलिक परिस्थितीची, लोकसंख्येची बाजू मांडून विद्यार्थी संख्या कमी का त्याचे कारण समजावून दिले, तसेच शाळांच्या अंतरामध्ये वस्तुस्थिती पाहिली पाहिजे, या सर्व गोष्टींचा विचार करून, विद्यार्थी संख्येचे निकष शिथिल करा अशी जोरदार मागणी केल्यानंतर पहिली ते आठवीच्या वर्गात कितीही विद्यार्थी असले तरी शिक्षक एक मंजूर होणार , तसेच नववी दहावीच्या वर्गात किमान 10 विद्यार्थी एका वर्गात असल्यास शिक्षकाचे पद मंजूर होईल. अशा प्रकारचा दिलासादायक निर्णय झाला.
त्यामुळे कोकण विभागातील अनेक मराठी माध्यमाच्या बंद पडणारे वर्ग वाचतील तसेच अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकना दिलासा मिळालेला आहे.या निर्णयामुळे मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत , मंत्री नितेशजी राणे, कोकणाचे शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर, आमदार किरण सामंत ,आमदार महेंद्र दळवी यांचे शिक्षक आणि शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत.
दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांबाबत शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे लक्ष वेधले आणि ही पदे त्वरित भरली जावी अशी मागणी केली.
