You are currently viewing महायुतीच्या जागावाटपानंतर सिंधुदुर्ग भाजपमध्ये बंडखोरी

महायुतीच्या जागावाटपानंतर सिंधुदुर्ग भाजपमध्ये बंडखोरी

महायुतीच्या जागावाटपानंतर सिंधुदुर्ग भाजपमध्ये बंडखोरी

ओरोस मंडळ अध्यक्षांसह ४३ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सिंधुदुर्गनगरी :

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होताच माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी महायुतीची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर अवघ्या काही तासांत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. मात्र या घोषणेनंतर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचे पडसाद थेट राजीनामा सत्रात उमटले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या ओरोस मंडळाचे अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्यात त्यांनी नमूद केले आहे की, “सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर राहून काम करणे मला उचित वाटत नाही. कोणत्याही नेत्यावर माझी वैयक्तिक नाराजी नाही, मात्र माझा राजीनामा त्वरित स्वीकारण्यात यावा.” हा राजीनामा त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सादर केल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

आनंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर ओरोस मंडळात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लॉरेन्स मान्येकर व उदय कुमार जांभवडेकर, ओरोस मंडळ उपाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, तसेच अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह बूथ अध्यक्ष व शक्तिकेंद्र प्रमुख मिळून एकूण ४३ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकत्रितपणे निवडणुका लढवणार असल्याची घोषणा आजच करण्यात आली असताना, जागावाटप फॉर्म्युल्यानंतर लगेचच भाजपमध्ये उफाळून आलेली ही नाराजी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा