जिल्हा नेतृत्वावर गंभीर आरोप; २२ वर्षांच्या पक्षसेवेला पूर्णविराम
मालवण :
गेली २२ वर्षे भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून प्रतिकूल परिस्थितीत संघटना वाढवणारे भाजपचे मालवण मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला. जिल्हा नेतृत्वाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि अकार्यक्षमतेमुळे मालवण नगरपालिकेत भाजपचा पराभव झाला असून, निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून समांतर यंत्रणा राबवली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
आज आयोजित पत्रकार परिषदेत बाबा मोंडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, भाजप नेते विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी युवक दशेत असताना पक्षात प्रवेश केला. नारायण राणे आणि महायुतीचे निलेश राणे यांच्या विजयासाठी आम्ही रक्ताचे पाणी केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत मालवण शहरातून तसेच देवगड जिल्हा परिषद गटातून विक्रमी मताधिक्य मिळवून दिले.
मात्र नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी जिल्हा नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंजीर खुपसण्याचे काम झाले. अनेक वर्षे नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष म्हणून काम केलेल्या, पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट वाटपात डावलून तिसऱ्याच ‘पॅरलल’ यंत्रणेला झुकते माप देण्यात आले. मित्रपक्षासोबत (शिवसेना – शिंदे गट) युतीबाबत जिल्हा नेतृत्वाने संभ्रम निर्माण केला. सुरुवातीला युती नाकारली आणि नंतर कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वतंत्र लढण्याची रणनिती आखली, जी भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरली.
संघटनेत प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना “पटत नसेल तर राजीनामा द्या” अशी उत्तरे जिल्हा स्तरावरून दिली गेली. कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकीपुरता वापर करण्याची पद्धत आता सहन होत नाही. राज्यात भाजप क्रमांक एकवर असताना मालवणमध्ये मात्र जिल्हा नेतृत्वाच्या चुकीच्या कॅल्क्युलेशनमुळे पक्षाची पीछेहाट होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२२ वर्षे कुटुंबासाठी कष्ट घेतलेल्या पक्षातून बाहेर पडणे आनंदाची गोष्ट नसून अत्यंत दुःखद असल्याची भावना व्यक्त करत, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत पुन्हा कार्यकर्त्यांचा असा वापर होऊ नये आणि त्यांना त्रास होऊ नये, यासाठी बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याचे बाबा मोंडकर यांनी सांगितले.
