१५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश; राजकीय हालचालींना वेग
सिंधुदुर्ग :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लवकरच जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
या निकालामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी, मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून आगामी निवडणुकांसाठी वातावरण तापू लागले आहे.
