*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम लेख*
*गड, किल्ले आणि मी*
जन्मापासून मरेपर्यंत जो राजा गडाच्याच सानिध्यात राहिला व राजधानीचे ठिकाण गडावर असणारा हा जगातील एकमेव राजा.
(१ किलोमीटर काय किंवा समोरच्या दुकानाततून काही आणायचे झाले तर वाहनच हवे असे म्हणणारी आताची पिढी पाहिली की वाटते) मावळे कसे रोज चढत असतील गड?पायाखालची वाट म्हणावी तरी जंगलाने वेढलेली,सरळसोट चढण असलेली पायवाट, गगनाला भिडेल असे वाटणारे कडे, अनेक प्रकारची श्वापदे,किटक पशुपक्षी यांचेच सानिध्य.सगळ्या गोष्टींची हल्लीच्या तुलनेत प्रतिकूल . तरी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन पार पाडलेली राजांची कामगिरी व अथक परिश्रम करीत साथ देणारे मावळे
एकेक पैलू विचारात घेतला तरी जीव घाबरा होतो. सर्वच विचार करण्यापलिकडचे आहे असे वाटते.जिथेआपली विचार करण्याची शक्ती अपुरी पडते. राजांचे स्थापत्य अभियंते दादू इंदूरीकरांनी प्रत्यक्ष साकारलेली मुर्तीमंत पुढे उभी ठाकलेली राजधानी पाहून आपण
अचंबित होतो कौतुकाला अन वर्णनाला तर शब्दच सापडत नाहीत.
प्रत्येक वाडा व इतर सर्व बांधकाम काळ्या कातळातून दगड तासून बांधलेले.प्रचंड बांधकामाच्या शिला कशा वर नेल्या असतील ?३५० वर्षे ऊन,वारा,पाऊस यांना तोंड देत हे इतिहासाचे हे मुक साक्षीदार अजूनही अस्तित्व टिकवण्यासाठी झुंजत आहेत.एकेका गडाची कहाणी म्हणजे मावळे आणी राजे यांचा काळजाचा ठोकाच.सज्जनगड तर गुरु समर्थ रामदास स्वामीच्या समाधीची जागा,
ह्या जिवंत इतिहासाचे किल्ले, राजगड व लोहगड सोडून सर्व गड मी पाहिले.
नळदुर्ग, खांदेरी, उंदेरी,जंजिरा, सुवर्णदुर्ग,विजयदुर्ग सिंधुदुर्ग,पद्मदुर्ग
हे जलदुर्ग अरबी समुद्रात महाराजांनी बांधले.
सर्व ठिकाणावरील किल्ले म्हणजेच स्वराज्याची दौलत.
११वीत असताना ब.मो.पुरंदरे यांच्या बरोबर पुरंदर,रायगडची सहल केली होती .प्रत्येक ठिकाणाचे त्यांंच्या तोंडून ऐकलेले वर्णन म्हणजे चालता बोलता इतिहास. अजूनही रायगड म्हटले की, अजुनहि अंगावर शिरशिरी येते.व आयुष्यातील सुंदर पान डोळ्यासमोर उभे राहते. रायगड हे एक माझ वेडंच होते आणि मीही ज्यांना घेऊन गेले त्यांच्या समोर बाबासाहेबांनी सांगितलेला त्याठिकाणाचा इतिहास उभा करत असे.बाजारपेठ ते जगदीश्वराच्या मंदिरापर्यंतचा रस्ता,महाराजांच्या ३०० व्या पुण्यतिथी निमित्त पंतप्रधान इंदिरा गांधी येणार होत्या तेव्हां माझ्या बहिणीच्या वर्गातील सर्व मुलामुलींनी तयार केला आहे.
आम्ही मैत्रीणी एकदा गंमत म्हणून तुझी अंतिम इच्छा काय असेल?असे विचारत होतो. त्यावर माझे उत्तर होते रायगडवर मरण यावे आणि आले नाही तर माझ्या प्रेताला तरी तेथे फिरवून आणून मग अग्नी द्यावा.बहुधा त्याच मानसिक ओढीने असेल कर्मधर्मसंयोगाने पतीची बदली महाड,मोर्बा व माणगांव येथे झाली ११ वर्षे रायगड परिसरात असल्याने २१ वेळा चालत रायगडला जाता आले.सातारला रोज अजिंक्य तारा चढण्याचा सराव येथे उपयोगी आला. महाडला बदली झाल्यावर पहिल्यांदा शिवथर घळ बघायला गेलो. गणित रामदास स्वामी व कल्याण स्वामींचे स्वामींचे पुतळे आहेत दासबोधावर त्यांचे शांतपणे लिखाण चालू आहे असे वाटते. शेजारीच प्रचंड मोठा धबधबा. खरोखरीच एकांतवासात गेल्यासारखे वाटते.शिवथर घळीत सात आठ पुण्यातल्या मुलांची गाठ पडली आम्ही रायगडला जाणार आहे असे त्यांना सांगितल्यावर म्हणाली.आम्हीही तुमच्याबरोबर येतो. महाडला आमच्या घरीच राहिले. रात्री खिचडी, पापड, लोणचे खाऊन सर्व जण झोपलो.पहाटे लवकर उठून आनहीके उरकून रायगडचा पायथा गाठला. तेव्हा मला महेशच्या वेळी सातवा महिना लागला होता. पण गडावर चढताना कुठला उत्साह आला होता माहित नाही. मी पुण्यातील तरुण मुलांच्या पुढे चालत होते. त्याच्यातली मुले म्हणाली ताई तुम्ही मागच्या जन्मी हिरकणी होतात काय? अशा अवस्थेतही तुम्ही किती भराभरा जाताय आणि आम्हीच मागे पडतोय.
ब.मो.पुंरदऱ्यांनी उभा केलेल्या रायगड वर्णनाचा पहिला प्रयोग ह्या मुलांना सांगून केला. पुण्यात आल्यावर मैत्रीणींना घेऊन पहिली रायगड रोपवे सहल अनुभवली.
त्या रायगडचे वर्णन काय करावे.चढतानाच दिसतात रायगडचे उत्तुंग कातळ, बुरूज, माची, टकमक टोक व त्यातून जाणारी वाट.
गड चढल्यावर भवानी देवीचे मंदिर, हत्ती तलाव व पडझड झालेले तीन मनोरे दिसतात. पायऱ्याचे दगडी जीने शाबूत असल्याने वर जाऊन रायगडचे सौंदर्य न्याहाळता येते. पहिल्यांदा सात मजल्याचे तीन मनोरे होते .आता २-३ मजलेच उरले आहेत.मनोरे आणि बुरुज यांचे ढासळते बांधकाम बघून खरोखरच फार वाईट वाटते आताच्या लोकांना ते बांधता येईल का नाही याची शंका वाटते इतके अप्रतिम बांधकाम आहे .
महारांजाची राजधानी म्हणजे, दादु इंदुरीकर बांधलेला एक एक वाडा म्हणजे अप्रतिम बांधकामाचा नमुनाचा आहे. शिवाजी महाराजांचा राजवाडा त्या मागे, सात राण्यांचे ओळीत बांधलेले सातमहाल याचे वैशिष्ट्य म्हणजे पाठीमागे जोडून असलेले पायखाने (हल्लीच्या भाषेत घराला जोडून संडास, बाथरूम)
राणीवशासाठी आंघोळीला तलावाकडे जाण्यासाठी स्वंतत्र पगदंडी.
ते महाल पाहताना वाटते सातही राण्या लढाईहून आलेल्या राजांना ओवाळायला हातात तबक घेऊन उभ्या आहेत.
नगारखान्याची उंची लक्षवेधून घेते. तिथे बसून सनई चौघडे वाजवत असत. राजांच्या विजयाची नौबत व राजे आल्याची ग्वाही इथूनच सर्वांना मिळत असे.
त्यामागे राज्यसभा व महाराजांच्या सिहांसनाची जागा त्याचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यसभेच्या दरबारात कुणी कुजबुजले तरी ते महाराजांना ऐकू येत असे.दरबाराच्या मागे महाराजांचा महाल त्याला जोडून संडास बाथरुम.
पुतळाबाई जेथे सती गेल्या त्या जागेवर असलेल्या सतीच्या खांबाला नमस्कार करून आपण बाजारपेठेत पोचतो.
घोड्यावरून माल खरेदी करता यावा म्हणून बांधलेली दुतर्फा उभी असलेली ११-११ दुकानांची जोतीच आता शिल्लक आहेत.पण नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे पाणी वाहून जाण्यासाठी भक्कम बांधलेली दुकाना लगत असलेली गटारे.
एका दुकानाच्या दाराजवळ उभ्या गडावर नागाचे चित्र आहे.नागाशेट वाण्याने ते तयार करून घेतले होते अशी दंतकथा समजली.मध्यभागी महारांजाचे छत्री धारी सिहांसन,त्यावर विराजमान झालेले राजे.(दरबारात सिहांसन न ठेवता आता इथे केलेली महाराजांची स्थापना मात्र खटकते असो )
त्यानंतर जगदिश्वराचे काळ्या कभिन्न दगडात उभारलेले देखणे मंदीर
त्याच्याच थोडे पुढे गेले की, चिरविश्रांती घेत असलेल्या महाराजांची समाधी.
तिथे आपोआपच नतमस्तक व्हायला होते. अनामिक अशी अनुभूती जाणवते.संपूर्ण शरीरात स्पंदनाच्या लहरी जाणवतात,मी खिळल्यासारखी स्तब्ध होते. कुठेही जावेसे वाटत नाही.नेहमी मला अनामिक अशी अनुभूती जाणवते.शेजारी वाघ्या कुत्र्याची समाधी.त्या इमानदार कुत्र्याने म्हणे महाराजांच्या चितेत उडी घेऊन महाराजांबरोबर आपलेही आयुष्य संपवले होते.
थोडे खाली उतरले कि, वाघजाईचे मंदिर व दक्षिण दरवाजा दिसतो.पण बहुतेक तिकडे कुणी फिरकत नाहीत.
एका बाजुला टकमक टोकाचा बेलगाम उभा कडा, त्यावरून खाली पाहिले तरी धडकी भरते. इतका उत्तुंग कडा आहेत तो. नजर ठरत नाही चक्कर आल्यासारखे होते.कडेलोट म्हणजे काय असेल? याची कल्पना येते.
दुसरी कडे हिरकणी बुरूजही असाच बेलगाम कडा पण टकमक टोकाच्या तुलनेत कमी उंचीचा पायथ्याशी हिरकणीची वाडी. गडाला भक्कम तटबंदी. त्या तटाकडेने आतील बाजुने चालण्यासाठी रस्ता बुरजावर तोफा ठेवायला जागा.
गद्दार व फितुरांना ज्या काळकोठडीत टाकत ती जागाही अंगावर काटा उभा करते.खोल वर काळ्या नितळ पाषाणात बांधलेली चारी बाजुने बंदीस्त ६×६ ची अंधारकोठडी फक्त वरून एखाद्या माणसाला आत टाकता येईल अशी उघडी जागा. सरपटणारा प्राणीही त्यातून वर येऊ शकणार नाही.अशी व्यवस्था.
धान्य साठवण्यासाठी गोदाम,धान्याचे कोठार आहे तिथे अजूनही तांदूळ सापडतात.
घोड्याचे तबेले, हत्ती खाना, हत्ती 🐘 तलाव, पिण्याच्या पाण्याची सात टाकी,राजवाडे सगळच वैभव अप्रतिम पण पडझड झालेले. एक गुहा आहे त्यातून जाणारा रस्ता प्रताप गडला निघतो. आता तो पुर्ण बंद आहे.चारी बाजूंनी उभे असलेले पण दुरवर दिसणारे महाराजांचे गडकिल्ले.
काशीबाईची समाधी शोधण्यासाठी संपूर्ण गड पालथा घातला पण आढळली नाही. खरतर पुरंदरे असतानाच प्रत्येक ठिकाणी पाट्या लावून थोडी माहिती लिहायला हवी होती. म्हणजे पुढील पिढी साठी उपयुक्त ठरले असते.पण त्याची कोणाला कदर? ना सरकारला चिंता
असो .प्रत्येकाने एकदा तरी गडाला भेट द्यावीच.निदान महाराजांच्यावेळचे जे अवशेष शिल्लक आहेत ते तरी बघावेत.ते दगडी बांधकाम बघूनही राजधानीच्या भव्यतेची कल्पना येते.
रायगड चढताना अगर उतरताना पाचाडला जिजाऊच्या समाधीचे दर्शन अवश्य घ्यावे. ज्या मुलीने शिवाजीसारखे नररत्न जन्माला घातले त्या माऊलीचा वाडा ही मागे आहे. महाराज रोज किल्ल्यावरून जिजाबाईंचे दर्शन घेत होते असे पुरंदरे यांनी सांगितलेले वर्णन डोळ्यासमोर साक्षात उभे राहते.
लेखनाला मर्यादा घालावी व वर्णनाला माझे शब्द तोकडे पडतात म्हणूनच व अनुभवण्यासारखाच तो स्वराज्याच्या राजधानीचा गड असल्याने थांबते..
*प्रतिभा फणसळकर *
—*—*—-*—-*—-*—-*

