*ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकारा सुनंदा पाटील “गझलनंदा” लिखित अप्रतिम गझल*
*होळी जळते*
*रंगपंचमी जवळी येता जखमेवरची खपली निघते*
*जुन्या नकोशा आठवणींची ह्रदयामध्ये होळी जळते*
भळभळणाऱ्या जीर्ण व्यथांची ऐकू येते विदीर्ण गाथा
रक्त सांडता कुणी बोलती नार नवेली रंग खेळते
त्यागासाठी नाव जानकी सदैव येते ओठावरती
जिच्या नशीबी चिरा न पणती सती उर्मिला कुणा न दिसते
कुशीत शिरतो सूर्य निशेच्या अंधाराचा पडदा पडतो
रविकिरणांच्या स्पर्शासाठी उषा पहाटे जागी असते
घर दोघांचे स्वप्नामधले रोज बघावे सायंकाळी
स्वप्न भंगता पुन्हा सकाळी नव्या व्यथांचे दार वाजते
*गझलनंदा*
