*”दीपोत्सव २०२५” व “एक दीप भारतमातेच्या वीरगती प्राप्त जवानांसाठी” आदरांजली कार्यक्रम संपन्न*
वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावात स्वयंभू श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून कार्तिक अमावस्या, बुधवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता श्री सप्तेश्वर (स्वयंभू) महादेव मंदिर रेडी, तालुका वेंगुर्ला येथे ११११ दीप प्रज्वलित करून गावातील सामाजिक ऐक्य व बांधिलकी जपण्याचे उद्दिष्ट ठेवून “दीपोत्सव २०२५”हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कै.श्री राजन बापू रेडकर मित्रपरिवार आयोजित,अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ,युवा भंडारी मित्रपरिवार,माऊली डी जे अँड डेकोरेटर्स यांच्या सहकार्याने आयोजन करीत असलेल्या दीपोत्सवाचे यंदाचे नववे वर्ष असून या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कै.श्री. राजन बापू रेडकर यांच्या मित्रपरिवारातील सर्व उपस्थितांच्या हजेरीत ११११ दीप श्री सप्तेश्वर (स्वयंभू) महादेवाच्या मंदिरात प्रज्वलित करण्यात आले.
रयतेच्या रक्षणासाठी भारतीय सीमेवर वीरगती प्राप्त होऊन हौतात्म्य पत्करलेल्या ह्या शूर विरांची आठवण करीत “एक दीप भारत मातेच्या वीरगती प्राप्त जवानांसाठी” आदरांजली संस्थेच्या वतीने रेडी मधील स्वयंभू महादेवा चरणी दीप व पुष्प अर्पून पूजन करून पुरोहित श्री प्रसाद अभ्यंकर यांनी देशाच्या सीमांवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांच्या संरक्षणाचे तसेच पुलवामा हल्ला व इतर भारतातील जनतेचे रक्षण करताना जोखीम पत्करून स्वतःचा जीव धोक्यात घालून वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस व सैनिक यांच्या आत्म्यास सदगती तसेच इतर सर्व सामाजिक क्षेत्रात आपला बहुमूल्य वेळ देऊन चांगली विकासात्मक कामे करणाऱ्या व चुकीच्या गोष्टींना रोखण्यासाठी व जे चुकीच्या गोष्टी करीत आहेत त्यांना सुबुद्धी देण्याची व सदर कार्यक्रम सामाजिक हित व ऐक्य जपले जाऊन पूर्ण होवो, असे साकडे महादेवांचरणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली.
भारतमातेच्या वीरगती प्राप्त झालेल्या जवानांकरिता आदरांजली म्हणून पुष्पहार तसेच “एक दीप भारतमातेच्या वीरगती प्राप्त जवानांसाठी” स्मारकाला दीप प्रज्वलित करून वीरगती प्राप्त जवान तसेच संस्थेचे संघटक तथा ह्या दीपोत्सव कार्यक्रमाचे निर्माते कै.श्री.राजन बापू रेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली.
राष्ट्रभावनेचा जागर करणाऱ्या उपक्रमांतर्गत वंदे मातरम ह्या आपल्या राष्ट्र गीताला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झाली. बँकिंमचंद्र चटर्जी लिखित ह्या वंदे मातरम गीताने स्वतंत्र संग्रामात राष्ट्रभक्ती व देशप्रेम वृद्धिंगत करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.त्याच निमित्ताने “वंदे मातरम” सार्धशताब्दी हे घोषवाक्य दिव्यांच्या माध्यमातून लिहून दिवे प्रज्वलीत करण्यात येऊन इतर मंदिर परिसर, दीपमाळा, तुलसीवृन्दावन सह सर्व परिसर दिव्यांनी सजवून प्रज्वलीत करण्यात आला.
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ व कै.श्री.राजन बापू रेडकर मित्रपरिवारातर्फे ह्या आयोजनात हॉटेल पारिजात रेडी,निलेश राणे,दिलीप साळगावकर,विनायक कांबळी,रेडी तंटामुक्ती अध्यक्ष वैभव आसोलकर,रिमा मेस्त्री,भूमी मांजरेकर,रवींद्र राणे,दयानंद कृष्णाजी,सौरभ नागोळकर,अरुण कांबळी,ताता नाईक,ज्ञानेश्वर राणे,राजेश सातोसकर,भूषण मांजरेकर,राजाराम चिपकर,नारायण मेस्त्री,कांता केरकर,विजय नाईक,संकल्प वाडकर,महादेव साळगावकर, महेंद्र गवंडी यांचे विशेष सहकार्य लाभले.
