*वारकरी दिंडीत पालकमंत्री नितेश राणे यांचा उत्स्फूर्त सहभाग*
*विठ्ठलनामात तल्लीन होत घेतली पालखी खांद्यावर*
कणकवली :
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायातर्फे कणकवली शहरातून काढण्यात आलेली भव्य वारकरी दिंडी ‘विठ्ठलमय’ वातावरणात पार पडली. दिंडीत हजारो वारकऱ्यांनी सहभाग घेत विठ्ठल–रखुमाईच्या नामगजराने शहर दुमदुमून टाकले.
या दिंडीत पालकमंत्री नितेश राणे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विठ्ठलाची पालखी खांद्यावर घेत त्यांनी विठ्ठलनामात तल्लीन होत विठूरायाला वंदन केले. ‘विठ्ठल माझा, मी विठ्ठलचा’ अशा घोषात वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. यावेळी त्यांच्या समवेत कणकवली माजी नगरध्यक्ष समीर नलावडे, सिंधुदुर्ग भजन संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे, माजी सभापती सुरेश सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संजय मालंडकर, वारकरी सांप्रदायाचे कार्याध्यक्ष, पत्रकार संतोष राऊळ, सेक्रेटरी गणपत घाडीगावकर, उपाध्यक्ष राजू राणे, कोषाध्यक्ष प्रभू गावकर, यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या वारीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी सहभागी झाले. महिलांनी डोक्यावर तुळशीवृंदावन घेतले होते, तर टाळ–मृदुंगाच्या निनादात भगव्या पताका फडकत होत्या.
वारी एस.टी. वर्कशॉप येथील गणेश मंदिरातून सकाळी निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक, आप्पासाहेब पटवर्धन चौक, बाजारपेठ मार्गे प.पू. भालचंद्र महाराज संस्थानात पोहोचली. येथे हरिपाठ, भजन आणि टाळ–मृदुंगाच्या तालावर विठ्ठलनामाचा जयघोष झाला.
यावेळी सहभागी झालेल्या वारकऱ्यांना व मृदुंगवादकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. भक्तिभाव, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने कणकवली नगरीचा प्रत्येक कोपरा ‘विठ्ठलमय’ झाला.
