*दीप्ती शर्मा प्लेअर ऑफ टूर्नामेंट तर शेफाली वर्मा प्लेअर ऑफ फायनल मॅच*
मुंबई :
नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियानं इतिहास घडवला. भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या विजयासह कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न साकार केलं. या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका महिला संघ 45.3 षटकात 246 धावांवर बाद झाला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वूल्वार्टने शतकी खेळी केली केली. पण एका बाजूने लारा किल्ला लढवत असताना दुसऱ्या बाजूने एक एक विकेट पडत होती. दुसऱ्या बाजूनं अपेक्षित साथ न लाभल्यानं तिचे प्रयत्न अपुरे ठरले आणि भारतानं एका ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. या सामन्यात शेफाली वर्मा 87(77) आणि 2/36 कामगिरीसाठी प्लेअर ऑफ फायनल मॅच ठरली तर संपूर्ण स्पर्धेत आपल्या जादुई फिरकीच्या जोरावर 22 विकेट आणि तीन हाफ सेंच्युरी मारत अष्टपैलू खेळ करणाऱ्या दीप्ती शर्माला प्लेअर ऑफ टूर्नामेंट किताब देण्यात आला.
*शेफाली आणि स्मृती मानधानाची विक्रमी भागीदारी*
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय महिला संघाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर स्मृती मंधाना आणि वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळालेल्या शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी रचली. दोघींनी जबाबदारीने खेळ करत संघाला मजबूत पाया दिला. ही जोडी आणखी मोठी भागीदारी करेल असं वाटत असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत मंधानाला 45 (58) धावांवर माघारी पाठवलं.
*चांगली सुरुवात पण मधल्या फळीत अपयश…*
स्मृती मंधाना आणि शेफाली यांच्या जोडीने भारताला चांगली सुरुवात करून दिली होती, मात्र त्यानंतर कोणतीही फलंदाज जोडी मोठी भागीदारी करू शकली नाही. त्याचा परिणाम थेट धावफलकावर दिसून आला. स्मृती मंधाना बाद झाल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज 24 (37) धावांवर बाद झाली, तर शेफाली वर्मा 87 (78) धावांवर माघारी परतली. कर्णधार हरमनप्रीत कौरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण ती फक्त 20 (29) धावा करून बाद झाली. अमनजोत कौरने 12 (14) धावा केल्या. रिचा घोषने आपल्या बहारदार शैलीत सुरुवात करून काही क्षण झळक दाखवत 34 (24) धावांची खेळी केली. शेवटी दीप्ती शर्मा 58 (58) धावा करून अखेरच्या चेंडूवर दुसऱ्या धावेसाठी धावताना धावबाद झाली. अशा प्रकारे भारताने निर्धारित 50 षटकांत 7 गडी गमावून 298 धावा केल्या.
*दीप्ती शर्माची कमाल, शेफालीने केली धमाल*
भारतीय संघाच्या मदतीला नेहमी धावून येणारी दीप्ती शर्माने कमाल केली आणि सामन्यात पाच विकेट घेत दक्षिण आफ्रिकन महिला संघाचे कंबरडे मोडले. दुसऱ्या बाजूने वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळालेल्या शेफाली वर्माने अनपेक्षित मिळालेल्या संधीचे सोने करत दक्षिण आफ्रिकेची जमलेली जोडी फोडलीच पण सामन्यात दोन विकेट घेत गोलंदाजीत देखील धमाल केली.

