*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*दिव्यांचे महत्त्व आणि आध्यात्म*
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळी म्हणजे दीपोत्सव. दिवा लावणे म्हणजे अंधकार नष्ट करणे. तम सारुनी प्रकाशाकडे जाणे.
वास्तविक प्रत्येक भारतीय सण साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये जीवन जगण्याचे, जीवन शांती मिळवण्याचे अध्यात्मिक तंत्र अगदी साध्या सोप्या पद्धतीतून उलगडले असते. फक्त हे सण पारंपरिक पद्धतीने साजरे करत असताना, प्रत्येकाने स्वतःलाच, हे का? हे कशासाठी?याचा काय अर्थ? असे प्रश्न विचारले पाहिजेत. केवळ अंधानुकरण नको. त्या मागचा उद्देश समजून घ्यायला हवा.
हिंदू धर्मातला सर्वात मोठा आनंदाचा सण म्हणजे दिवाळी. आणि घरोघरी दिवे लावून तो साजरा केला जातो. या दिव्यांचे महत्त्व जाणून घेणे हे उद्दिष्ट असावे.
सत्य आधार तप: तैलं दयावर्ति: क्षमा शिखा। अंधकारे प्रवेष्टव्ये दीपो यत्नेन वार्यताम् ।।
सभोवताली घनदाट अंधार असेल, आपल्या अंतरात त्रासदायक वादळे असतील, तर सत्याचा दिवा लावला जावा, जेणेकरून त्याच्या प्रकाश अंतरबाह्य पवित्रता निर्माण करणारा असेल. या दिव्याला तपश्चर्येचे तपाचे तेल टाकावे ,त्या दिव्याची वात दयेची असावी आणि ज्योत क्षमेची असावी.
आज समाजात पसरलेल्या अंधाराला नष्ट करायचे असेल तर असाच दीप मनामनात तेवत ठेवण्याची आवश्यकता आहे.
साधी मातीचीच पणती पण तिचा मिणमिणता प्रकाश सभोवताली मंगलमय तेज निर्माण करतो. अंध:कारातून सळसळत्या चैतन्याने घेतलेली झेपच जणूं काही! हा चिमुकला प्रकाश म्हणजे चांगुलपणाचा उजेड देणारा, एक महान ऊर्जेचा मंगलमय स्त्रोतच जणू! म्हणूनच अमावस्येच्या अंधारात मिणमिणणारा हा प्रकाश सांगत असतो,
” तुम्हीही असेच तेजोमय व्हा. संकटावर मात करा. तुमच्या सूक्ष्म अस्तित्वाने चैतन्याची झेप घ्या. विजय पताका तुमचीच असेल. सत्संगाचा साबण लावून सेवाभावी जलाने अभ्यंग स्नान करा आणि त्या पवित्र स्नानात आपले स्वभाव दोष आणि अहं धुवून काढा. त्यागाच्या पंचाने सर्वांग कोरडे करा. लोभ, स्वार्थ, हवस सोडून आनंदाचे नवी वस्त्रे परिधान करा. स्नेह, प्रीतीचा, फराळ करून वाचा मधाळ आणि सात्विक ठेवा. अष्टांगसाधनेची ज्योत पेटवा,”
दिवाळी म्हणजे दीपोत्सव. बाहेर तर दिवे पणत्या लावून रोषणाई करायचीच आहे, पण खरा दिवा हृदयात लावा. तिथला तम आधी दूर करा. तरच आपण जाणीवपूर्वक दिवाळीचा सण साजरा करत आहोत याचे समाधान लाभेल.
दिवाळीचे दिवस म्हणजेच वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन ,बलिप्रतिप्रदा, आणि भाऊबीज.प्रत्येक दिवस एक एक संदेश देऊन जातो. क्षण क्षण मोलाचे असतात. कर्तुत्वाला नवी दिशा ते देतात. ‘धर्माच्या मार्गाने पैसा मिळवा, आचार विचारांची सात्विकता जपा, अमंगला पासून दूर राहा, भोगवृत्ती, स्वार्थ, लालसा, अनाचार, दुष्ट प्रवृत्ती या अंतरातल्या असुरांचा संहार करा. जुनी वैरं विसरून शत्रूचेही अभिष्टचिंतन करा. भावाच्या निर्व्याज प्रेमाने स्त्री जातीचा सदैव आदर करा. ‘अशी सुरेख शिकवण या दीपोत्सवातून समाजाला दिलेली आहे. म्हणून बाह्यांगा पेक्षा या उत्सवाचे अंतरंग जाणून घेणे हे महत्त्वाचे ठरते.
लखलख चंदेरी तेजाचा हा चांदण सडा अंगावर घेताना, कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्ती सहज आठवतात.
स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही
।तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही
उठतात तमावर त्याची पाऊलेचिन्हे
त्यांनाच पुसशी तू
तो आहे किंवा नाही…।।
तेव्हा या प्रकाश पावलांच्या ठशांमधले देवत्व जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच दिवाळी साजरे करणे …
राधिका भांडारकर

