*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ११६ वे
अध्याय – १९ वा, कविता – ८ वी
___________________________
एकनिष्ठ सेवा केली आत्मारामाने । घर,जमीन केली अर्पण नम्र भावनेने । स्वामी दत्तात्रय केदार ,नारायण जामकर,बुवा दुधाहारी,सदा सेवेत याच श्रद्धा-भावनेने ।।१।।
स्वामी रक्षण भक्तांचे करिती । संकटे त्यांची निवारीती ।
याची येते प्रचिती । मारुतीपंत पटवारी कथेतूनी ।।२।।
मारुतीपंतांची श्रद्धा-भक्ती । स्वामी जाणती ।
मारुती मालक,तिमाजी नोकराची निष्ठा मालकाप्रती ।
हे सार असे या गोष्टीचे ।।३।
स्वामींनी लीला केली । तिमाजीस प्रेरणा दिली । जाग त्यास आली । केले रक्षण त्याने जोंधळ्याचे ।।४।।
टाळले नुकसान मारुतीपंतांचे । उदाहरण हे तिमाजीचे । असे हो इमानदारीचे । बोधप्रद विबुध हो ।।५।।
एकदा बाळापूर बाजारपेठेत । सुखलालच्या दुकानासमोरच्या रस्त्यात । बैसले स्वामी साक्षात ।
भक्त घेती दर्शन येता-जाता ।।६।।
स्वामी मूर्ती दिगंबर । वस्त्र नव्हते अंगावर । पाहून त्यांना,
धावून येई नारायण हवालदार । आणि मारी छडीने ।।७।
आले हुंडीवाला दुकानदार । म्हणे, हे हवालदार । करू नको अविचार । उचलू नको हात,सत्पुरुषावर ।।८ ।।
तू संतांचा अपराधी । माफी मग तू यांची आधी । मोठी चूक तुझी,नसे रे साधी । कर विचार तू जरा ।।९ । ।
हवालदाराने तरी दुर्लक्ष केले । स्वामींना अपशब्द वापरले ।
म्हणे, मी ढोंग्याला मारले । हा गुन्हा कसा काय ? ।।१० ।।
हवालदाराने साधुस मारले । या कर्माचे फळ त्यास मिळाले । यातून एक पाहिजे शिकले । माणसाने वागावे समजून-उमजून हो ।।११।।
**********
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे-पुणे.
___________________________

