एम टू एम बोटीची घोषणा: मुंबई-कोकण प्रवासासाठी नवी रो-रो सेवा सप्टेंबरपासून सुरु
मुंबई –
राज्याचे बंदर व मत्स्य व्यवसाय मंत्री आणि कोकणचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबई ते कोकणदरम्यान नवीन जलद ‘Ro-Ro’ सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ‘M2M’ नावाची ही बोट मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून सुटणार असून, पहिला थांबा जयगड आणि दुसरा थांबा विजयदुर्ग येथे असेल. ही बोट २५ नॉट्स या वेगाने धावणार असून, ती दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी बोट ठरणार आहे.
ही सेवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच १ किंवा २ तारखेपासून सुरु होण्याची शक्यता आहे, मात्र हवामान सुधारल्यानंतर अंतिम तारीख जाहीर केली जाईल. सध्या जयगड व विजयदुर्ग येथे ट्रायल फेऱ्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या सेवेचा उद्देश मुंबई ते कोकण प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी बनवणे हा आहे. या बोटीत प्रवाशांसाठी इकोनॉमी ते फर्स्ट क्लास अशा विविध श्रेणी उपलब्ध असणार आहेत. दर पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत –
इकोनॉमी: ₹2,500
प्रीमियम इकोनॉमी: ₹4,000
बिझनेस क्लास: ₹7,500
फर्स्ट क्लास: ₹9,000
चारचाकी वाहने: ₹6,000
मिनीबस: ₹13,000
बोटीत ५० चारचाकी वाहने नेण्याची स्वतंत्र डेकसह सुविधा असून, एकावेळी प्रवासी आणि वाहने दोन्ही वाहून नेणे शक्य होणार आहे.
या सेवेच्या माध्यमातून मुंबई ते रत्नागिरी अवघ्या ३.५ तासांत तर मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास पाच तासांत पूर्ण होईल. यामुळे रस्त्यावरील प्रवासाचा वेळ, थकवा आणि वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.
ही सेवा कोकणवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी एक नवा प्रवास पर्याय ठरणार असून, कोकणात समुद्रमार्गे पर्यटनासही चालना मिळेल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

