*रानभाज्या म्हणजे निरोगी आरोग्य व जीवनसत्वांचे जणू भांडारच : दिलीप भाई तळेकर*
*निरोगी आरोग्याचा मूलमंत्र म्हणजे रानभाज्या : स्मिता नलावडे*
*अर्थार्जनाचे साधन म्हणजे रानभाज्या : दिलीप भाई तळेकर*
कणकवली :
औषधी वनस्पती, नैसर्गिक मध,मसाल्याचे पदार्थ, अशा अनेक प्रकारच्या वस्तूंचा खजिना म्हणजे निसर्ग. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, त्यापैकी एक म्हणजे रानभाज्या. पावसाळ्यात पहिल्या पावसानंतर रानभाज्या रुजायला सुरुवात होते. या भाज्या म्हणजे निरोगी आरोग्याचा व जीवनसत्वांचा जणू भांडारच असतो तसेच त्या अर्थार्जनाचे. माध्यम सुद्धा आहेत,असे प्रतिपादन पं.समिती कणकवलीचे माजी सभापती दिलीप तळेकर यांनी यावेळी केले. ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे येथील रानभाज्या व गावठी वस्तूंची विक्री प्रदर्शन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी शिक्षण विभाग सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे, माजी पं.स.सभापती दिलीपभाई तळेकर, तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर, जिल्हा व्यापारी संघटना कार्यवाहक चंद्रकांत उर्फ राजू जठार, पं.स.कणकवली चे विषय तज्ज्ञ सचिन तांबे, नांदगाव केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल, जी.बी.प्लस टेक्नॉलॉजीचे सर्वेसर्वा संचिता खंडमळे, कासार्डे उपसरपंच पाताडे,वारगांवचे ग्रामस्थ सुधाकर नर, अरुण ताम्हणकर, चंद्रकांत ताम्हणकर, तळेरे पो.पा.चंद्रकांत जाधव, तळेरे व्यापारी संघटना अध्यक्ष दशरथ कल्याणकर, रिक्षा संघटना अध्यक्ष राजकुमार तळेकर,माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, प्रशालेचे सर्व शाळा स.सदस्य,प्राचार्य अविनाश मांजरेकर, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच तळेरे नं.१ शिक्षक श्रीराम विभूते, तळेरे गावातील सर्व उद्योजक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
निसर्ग शेती, सेंद्रिय शेतीचे महत्त्व तसेच पावसाळ्यात निसर्गामध्ये आपोआप रुजून येणाऱ्या रानभाज्या, परसबागेतील भाज्यांतुन मिळणारी पोषकतत्वे यांची माहिती मुलांना व्हावी, त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे आणि या वस्तूंचे मार्केटिंग कसे करावे याचे कौशल्य विद्यार्थ्यांना व्हावे हा हेतू ठेवून प्रशालेचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल शिक्षण विभाग सिंधुदुर्ग कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे यांनी प्रशालेचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी जंगलात मिळणाऱ्या व सहज उपलब्ध होणाऱ्या कुरडू, शेंडवेल, टाकळा, भारंगी, कुड्याच्या शेंगा, काटला, पेवगा, शेवगा, अळू या प्रकारच्या अनेक रानभाज्या तसेच कुळीथ, अंडी, आगळ, भाजीची केळी, अशा गावठी वस्तूंची विक्री तसेच रानभाज्यांपासून बनविलेले पदार्थ यांचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले.वस्तूची विक्री कौशल्याचा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला.
हा कार्यक्रम प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, ज्येष्ठ शिक्षिका डी. सी. तळेकर, सहा.शिक्षक पी.एन काणेकर, तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेऊन नियोजनबद्धरित्या राबविल्याबद्दल त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, शाळा समिती अध्यक्ष अरविंद महाडिक,सर्व शाळा समिती सदस्य, तसेच शिक्षण प्रेमी, तळेरे ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी यांनी कौतुक केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समिती कणकवलीचे विषय तज्ज्ञ सचिन तांबे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले,त्यामधून विद्यार्थ्यांना आसपास सहज उपलब्ध होणाऱ्या व आरोग्यदायी रानभाज्यांची मोलाची माहिती दिली..
“प्रकृतीचं वरदान – रानभाजीचे भोजन महान!”
“जेवणात रोज रानभाजी असावी, तब्येतीला नवी उजळण द्यावी!”… अश्या प्रकारच्या घोषवाक्यांनी कार्यक्रमाची उंची आणखीनच वाढविली.
