पर्यावरणासाठी वटवृक्षाचे जतन व संवर्धन होणे आवश्यक – अनिल पाटील
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून १०० वटवृक्षाचे वाटप…
सिंधुदुर्गनगरी
पर्यावरणासाठी वटवृक्षाचे जतन व संवर्धन आवश्यक आहे. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक महिलेने एक तरी वडाचे झाड लावून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत हातभार लावा, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले. वडाचे महत्त्व जास्तीत- जास्त महिलांना समजावे यानिमित्ताने वट पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना तब्बल १०० वटवृक्षाचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधून वटवृक्षाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचावे या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आगळ्यावेगळ्या वटपौर्णिमा सणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी अनिल पाटील , सुनिता पाटील, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई, उपजिल्हाधिकारी भूसंपादन शारदा पोवार, तहसीलदार पुनर्वसन शितल जाधव, चैताली सावंत, तहसीलदार महसूल , माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी व इतर विभागाच्या महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात या कार्यक्रमाच्या आयोजनामागचे महत्त्व उपजिल्हाधिकारी शारदा पोवार यांनी सांगितले. त्या म्हणाल्या वटपौर्णिमा सणासाठी वडाच्या फांद्या तोडून त्याचे पूजन करण्यापेक्षा आजच्या सणाचे औचित्य साधून वडाच्या झाडाचे रोपण प्रत्येकाने केल्यास निसर्गाचे संतुलन साधण्यास आपण हातभार लावू त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे शारदा पोवार यांनी सांगितले .
निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी वडाच्या झाडाचे जसे आध्यात्मिक पौराणिक महत्त्व आहे तसेच त्याला आयुर्वेदिक दृष्ट्या देखील फार महत्त्वपूर्ण स्थान आहे त्यामुळे वडाच्या झाडाचे संवर्धन होणे ही काळाची गरज बनली आहे.या सणाचे औचित्य साधून वृक्षांचे संवर्धन करणे, वृक्षाचे संगोपन करणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. वृक्ष संगोपनाचे हे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवणे हा या आयोजनामाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले .
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अर्धांगिनी श्रीमती सुनिता पाटील उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या जिल्हा प्रशासनातील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांनी राबवलेला हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागत आहे. हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यातून इतरांनी देखील प्रेरणा घ्यावी आणि अशा प्रकारचे उपक्रम ठीक ठिकाणी साजरे व्हावे असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी केले तर आभार प्रदर्शन चैताली सावंत तहसीलदार महसूल यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित महिला वर्गाने विविध गुणदर्शन पर कार्यक्रम देखील सादर केले.उपस्थित मान्यवर आणि सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांना या निमित्ताने वट वृक्षाचे रोप वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तसेच सिंधुदुर्ग नगरी प्राधिकरण क्षेत्रात वट वृक्षाचे रोपण जिल्हाधिकारी यांच्या अर्धांगिनी सुनिता पाटील यांचे हस्ते करण्यात आले. वट वृक्षाचे पूजन देखील या निमित्ताने करण्यात आले.अशा रीतीने वटपौर्णिमा सण हा एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आला.

