पुणे: प्रतिनिधी विश्वभूषण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या भूमीत, घरी यायचे, रमायचे, बाल तरुण वृद्धांसोबत मिसळायचे, असेल ते जेवायचे. ही त्यांची आठवण कायम राहावी म्हणून भारतातील पहिल्या महामाता रमाई स्मारकाची निर्मिती आपण संपूर्ण लोक सहभागातून येथे केली आहे. या स्मारकाचे उद्घाटन आमदार खासदार नाहीतर देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. आणि तोच उत्सव माता रमाई पुण्यतिथी ते स्मारक वर्धापन दिनापर्यंत विविध कार्यक्रमाने संपन्न होत असतो. असे मत मा.नगरसेविका लताताई राजगुरू यांनी व्यक्त केले.
साहित्य सम्राटचे २०६ वे कवीसंमेलन व महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांचे संयुक्त विद्यमानाने वाडिया कॉलेज जवळ पुणे येथे आयोजित केले होते. महामाता रमाई स्मारकाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांमध्ये पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते रमाई स्मारकास पुष्प अर्पण, स्वरांजली संगीत ग्रुप कराओके गाण्यांची मैफिल, कवी गायक भगवान भेंडे आणि सहकारी यांचा एक शाम रमाई के नाम आणि कवी विनोद अष्टुळ व महाराष्ट्रातील नामवंत कवी यांचे रमाईच्या लेकरांची कवी संमेलन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कवी संमेलनाची सुरुवात रमाईपुत्र विठ्ठल गायकवाड यांच्या प्रबोधनात्मक प्रास्ताविकेनंतर झाली. ते म्हणाले रमाई गरीब नाही आणि नव्हती. रमाई जगात सर्वात मोठी दानशूर आहे. तिने देशासाठी आपले चार पुत्र आणि विद्वान पती दिला. यावेळी जी. एस कोतले आणि के. एच सूर्यवंशी यांनी आपले विचार व्यक्त केले.
त्यागमूर्ती माता रमाई व महामानव बाबासाहेब यांच्या विचारसह वास्तववादी प्रबोधनात्मक विषयांच्या मनाला भावणाऱ्या आणि भिडणाऱ्या कविता व गझल मान्यवर तीस कवींनी सादर करून उपस्थित काव्य रसिकांची मने जिंकली.
विचारपीठावर मान्यवर जी. एस कोतले गुरुजी, समाजसेवक के. एच सूर्यवंशी , लाखात एक रमाईची लेक लताताई राजगुरू, रमाई पुत्र विठ्ठल गायकवाड आणि साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ उपस्थित होते.
क्रांतिकारी कवी संमेलनामध्ये बाबा ठाकूर, राहुल भोसले, बबन चव्हाण चऱ्होली, दशरथ दुनघव, बाळकृष्ण अमृतकर, अनिल नाटेकर आळंदी, प्रल्हाद शिंदेमामा राजगुरुनगर, प्रा.बाबासाहेब जाधव, जितेंद्र सोनवणे, नंदकुमार गुरव, ज्ञानेश्वर बिरदवडे, शंकर भारदे कोकण, सिताराम नरके, सूर्यकांत नामुगडे, किशोर टिळेकर, नानाभाऊ माळी, विजय जाधव आणि काव्य रसिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रबोधनात्मक सूत्रसंचालन विनोद अष्टुळ यांनी तर आभार विठ्ठल गायकवाड यांनी व्यक्त केले.

