सिंधुदुर्गात १ मे पासून सर्वच शासकीय विभागात “एआय” प्रणालीचा वापर करणार – नितेश राणे
बॅ नाथ पै संस्थेत आयोजित “कॉफी वीथ स्टुडंट” कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद…
कुडाळ
जिल्ह्यातील आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गृह खाते आदी शासकीय कार्यालयात आता “एआय” प्रणालीचा वापर केला जाणार आहे. १ मे पासून ही यंत्रणा राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा मानस जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान ही चाचणी यशस्वी झाल्यास सिंधुदुर्ग हा देशातील पहिला “एआय” प्रणाली वापरणारा जिल्हा ठरणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.
बॅ. नाथ पै संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या कॉफी विथ स्टूडंट या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शैलेंद्र पै, अदिती पै, बॅ. नाथ पै संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, प्राचार्य बांदेकर, प्राचार्य भंडारी, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमृता गाळवणकर आदी उपस्थित होते.
श्री. राणे पुढे म्हणाले, या शिक्षण संस्थेचा कारभार चांगला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण दर्जेदार आहे. या त्यांच्या कामाचे कौतुक करून आपल्या संस्थेला असलेल्या अडचणी निर्माण होणारे प्रश्न माझ्यापर्यंत घेऊन या ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन असे सांगून पूर्वी या ठिकाणची जनता रस्ते, विज, पाणी हे प्रश्न घेऊन येत होते पण आता शिक्षणाकडे सर्वांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे आपली शाळा डिजिटल व्हावी अशी निवेदने अनेक येत आहे. ही खरी अभिमानास्पद गोष्ट आहे. आताच युगे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर केला जात आहे. आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शासकीय कार्यालयांमध्ये एआय प्रणालीचा वापर केला जाणार आहे. देशातील पहिला सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय कार्यालयांमध्ये एआय प्रणालीचा वापर करणारा जिल्हा असणार आहे असे सांगितले. आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या प्रणालीचा वापर होणार आहे. त्यामुळे या संदर्भातील प्रशिक्षण देणारे कोर्सेस सुद्धा सुरू करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
