निधी खर्च करण्यात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात आघाडीवर – नितेश राणे
आत्तापर्यंत ९८ टक्के निधी खर्च…
कणकवली
राज्याकडून गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासासाठी अडीचशे कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. यातील ९८ टक्के निधी आत्तापर्यंत खर्च झाला आहे. निधी खर्च करण्यात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. पुणे दुसरा त सोलापूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दिली.
श्री.राणे यांनी आज प्रहारभवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित होते.
श्री.राणे म्हणाले, पालकमंंत्री झाल्यानंतर मी पहिल्याच पत्रकार परिषदेत जनतेला विश्वास दिला होता. की जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये आर्थिक शिस्त आणण्यासाठी प्रयत्न करेन. जिल्ह्यासाठी अालेला निधी योग्य पद्धतीने खर्च व्हायला हवा. योग्य नियोजन व्हावे हा हेतू पहिल्या दिवसापासून ठेवला होता. पहिल्या दिवसाासून सांगितलं होतं की, ३१ मार्च पर्यंत गतवर्षीचा अडीचशे कोटींचा निधी शंभर टक्के खर्च करेन आणि पुन्हा राज्य सरकारकडे जाऊन जादा निधी आणेन.
ते म्हणाले, सोमवारी ३१ मार्च आहे, गतवर्षीच्या निधी पैकी ९८ टक्के निधी खर्च झालेला आहे. अडीचशे कोटी पैकी ९८ टक्के जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून निधी आम्ही खर्च करण्यात यशस्वी झालेलो आहे. राज्य सरकार म्हणून जिल्हा नियोजन निधी खर्च या संबधीत राज्य नियोजनची वेबसाईट आहे, त्यामध्ये सगळ्या जिल्ह्याचा आढावा देण्यात आलेला आहे. १८ जानेवारीला पालकमंत्री म्हणून प्रवास सुरू केला. तेव्हा सिंधुदुर्ग ३२ व्या क्रमांकावर होता. आज आपला सिंधुदुर्ग जिल्हा राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. आता आम्ही हक्काने अर्थमंत्र्यांकडे जादा निधीची मागणी करू शकतो आणि तो आम्हाला मिळणार देखील आहे.