*आंगणेवाडी यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थ मंडळाने खबरदारी घ्यावी*
*पालकमंत्री नितेश राणे यांच्या आंगणेवाडी येथील आढावा बैठकीत सूचना ; पाणी, वीज, मोबाईल नेटवर्क सेवा सुरळीत ठेवा*
*मालवण*
दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीचा जत्रोत्सव 22 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. शासन, प्रशासन आणि आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने जत्रेचे नियोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी आंगणेवाडी येथे भेट देऊन यात्रापूर्व नियोजनाचा आढावा घेतला. आंगणेवाडी मध्ये येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा आणि सुरक्षितता या गोष्टी महत्त्वाच्या असून भाविकांची कुठेही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या प्रत्येक विभागाने खबरदारी घ्यावी. भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. केलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय साधावा. यात्रेमध्ये कुठेही अप्रिय घटना घडू नये यासाठी ग्रामस्थ मंडळ आणि प्रशासन यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पुढील वर्षी आंगणेवाडी मध्ये पाणी, वीज, मोबाईल नेटवर्क, ड्रेनेज यंत्रणा, स्वच्छतागृह व्यवस्था या गोष्टी कायमस्वरूपी दूर केलेल्या असतील असे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे येथे म्हणाले.
पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी आंगणेवाडीला भेट देऊन आई भराडीदेवीचे दर्शन घेतले. यावेळी आंगणे कुटुंबियांच्या वतीने देवालयात ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे यांच्या हस्ते पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर ना. राणे यांनी यात्रा नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, उपअभियंता अजित पाटील, मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, बाबू आंगणे, आनंद आंगणे, तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ना. नितेश राणे यांनी वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित होणार नाही याच्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आत्ताच कराव्यात असे सक्त निर्देश दिले. देऊळवाडा ते आंगणेवाडी या व्हीआयपी साठी असलेल्या रस्त्या लगत वाढलेली झाडी तोडून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. कुठेही गर्दी होणार नाही तसेच वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी आरटीओ आणि पोलीस प्रशासन यांनी लक्ष घालावे.चोवीस तास येथे भाविकांना आरोग्य सेवा उपलब्ध राहिली पाहिजे त्या दृष्टीने नियोजन पूर्ण करावे असे आदेश दिले.
जत्रे दिवशी भाविकांची संख्या वाढणार असल्यामुळे अशावेळी मोबाईल नेटवर्क यंत्रणेवर ताण येऊ नये यासाठी या यंत्रणेची क्षमता वाढवावी अशा सूचना केल्या. मनोरंजन खेळणी असलेल्या ठिकाणच्या सर्व साहित्याची तपासणी करावी. कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. तसेच यावेळी आरोग्य, पोलीस प्रशासन, पाणीपुरवठा विभाग यांना सुद्धा आवश्यक त्या सूचना दिल्या.