You are currently viewing जिल्ह्यात 25 फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश

जिल्ह्यात 25 फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश

जिल्ह्यात 25 फेब्रुवारीपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)  व 37 (3) नुसार दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या  कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

               कोकण  विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वी.परीक्षा दि. ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५ व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता १० वी दि. २१ फेब्रुवारी २०२५ ते दि. १७ मार्च २०२५ रोजीच्या कालावधीत सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इयत्ता १२ वी साठी २३ परीक्षा केंद्र व इयत्ता १० वीसाठी ४१ केंद्र अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

              सिंधुदुर्ग  जिल्ह्यात इयत्ता १० वी व १२ वी ची शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरळीत पार पाडून कोठेही अनुचित प्रकार घडू नये व जिल्ह्यातील  कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी  यासाठी जिल्ह्याच्या  संपुर्ण  भूभागात मनाई आदेश लागू करण्यात येत आहे.

वरील कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे.

कलम ३७ (१) नुसार

१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा  करण्यासाठी

   वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.

२) अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.

३) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा

      करणे किंवा तयार करणे.

४)  व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे,  (ज्या कारणामुळे समाजाच्या

        भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)

५)  सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे.

६)  सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग

       आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.

कलम ३७(३) नुसार

१)                सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका

काढणे  व  सभा घेणे.

   २)  हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न, धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही .

वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा