You are currently viewing गांधी चरित्र म्हणजे आधुनिक युगातील आश्चर्यच

गांधी चरित्र म्हणजे आधुनिक युगातील आश्चर्यच

 

‘यत्र नार्यस्तु पूज्यंते

रमंते तत्र देवता’

जिथे स्त्रीचा सन्मान होतो तेथेच देवता वास करतात. म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारख्या थोर राष्ट्रपुरुषांनी स्री च्या सन्मानासाठी तिच्या शिक्षणावर भर दिला. स्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते. म्हणून स्त्रियांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचे असेल तर स्त्रियांचा रोजगार जिथे आहे ती क्षेत्र वेगाने वाढवली पाहिजेत. महात्मा गांधीजींनी कुटीर उद्योग, सुत कताई, शेतीवर आधारित उद्योग यांना महत्त्व दिले होते. आज खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी निर्णय घेतले पाहिजेत. याच धर्तीवर महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी ज्यांचं आयुष्यच एक आश्चर्य आहे. असं आश्चर्यकारक जीवन जगणारा माणूस म्हणून पुन्हा एकदा आठवताना….

मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरात मध्ये पोरबंदर या ठिकाणी 2 ऑक्टोंबर 1869 रोजी झाला. लहानपणी अगदी सर्वसामान्य मुलाप्रमाणे त्यांचं वर्तन होतं. अतिशय भित्रा, लाजाळू, शालेय जीवनात अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे बुद्धिमत्ता. वयाच्या बाराव्या वर्षी कस्तुरबा नामक एका मुलीशी त्यांचा विवाह झाला . वयाच्या 19 व्या वर्षी कायद्याची पदवी घेण्यासाठी ते लंडनला गेले. जाताना आईसमोर स्वतःच्या पवित्र जीवन जगण्याविषयी आणि स्वतःला पवित्र ठेवण्याविषयी शपथ घेतली. परत आल्यावर राजकोटला वकिली सुरू केली. “स्वतःचा वकिली व्यवसाय खूपसा यशस्वी न करता आलेल्या या माणसाने भारताची वकिली मात्र इतकी अप्रतिम केली की ब्रिटिशांना सुद्धा त्यांच्या वकिली पांडित्याची भीती वाटे”. पुढे वकिलीच्या कामासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या लोकांची वर्णद्वेषी राजवट होती. सत्याग्रहाच्या अभिनव तंत्राने गांधीजींनी तेथील अन्याय सहन करणाऱ्या जनतेला निर्भय बनवून न्याय मिळवून दिला. 9 जानेवारी 1915 ला ते भारतात आले. हा दिवस आपण ‘प्रवासी भारतीय दिन’ म्हणून साजरा करतो. भारतात आल्यावर प्रथम त्यांनी त्यांचे राजकीय गुरु नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची भेट घेतली आणि त्यांच्या सल्ल्यानुसार भारत भ्रमण केले. भारत भ्रमण करतांना त्यांना भारतीय जनतेच्या दारिद्र्याची, अज्ञानाची व मागासलेपणाची कल्पना आली. परिणामी त्यांनी स्वतःच्या सुटा बुटाच्या पोशाखाचा व राहणीमानाचा त्याग केला.

भारत भ्रमण करतांना ते पुण्याला लोकमान्य टिळकांकडे गेले . टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. लोकमान्य टिळक ब्रिटिशांशी सनदशीर मार्गाने लढा देत होते. उत्सव, वृत्तपत्रे, राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था, संघर्षरत चळवळी व प्रतियोगिता सहकारिता या माध्यमातून टिळकांचे कार्य सुरू होते. तत्व म्हणून सत्याग्रहाचे सर्वोच्च स्थान गांधीजींचे, पण टिळकांना ते मान्य नव्हते. ते गांधीजींना म्हणाले की जनतेला हे मान्य असेल तर मी सुद्धा तुमचा अनुयायी होईल. पण मला या पद्धतीने स्वातंत्र्य मिळेल असे वाटत नाही.

इंग्लंडमध्ये असताना एकदा गांधीजींची सावरकरांशी भेट झाली होती. त्यानंतर 1937 च्या जवळपास गांधीजी रत्नागिरीत आले असता त्यांनी सावरकरांची भेट घेतली. भेटीत सावरकर गांधीजींना म्हणाले या देशाच्या अहिंसावादी तत्त्वज्ञानामुळे पूर्वी हा देश अनेक वेळा परकीयांच्या भक्षस्थानी पडला “रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले” त्यावर गांधीजी म्हणाले आपल्या दोघांचेही उद्दिष्ट समान आहे पण मार्ग वेगळे आहेत.

गांधीजींनी विरोधाला विरोध नाही केला, त्यांच्या मते विरोधक म्हणजे शत्रू नव्हे, मतभेद म्हणजे शत्रुत्व नव्हे, भारतीय तत्त्वज्ञानातील हे सहिष्णुतेचे तत्व त्यांनी अंगीकारले होते. आधुनिक लोकशाहीचे ते द्योतक आहे. क्रांतिकारकांबद्दल ते ‘वाट चुकलेले देशभक्त’ असा उल्लेख करत.

गांधीजींना भारतीय जनमानसाच्या नाडीचा अचूक अंदाज होता. त्यांना भारतीय संस्कृती, प्रथा, परंपरां व सभ्यतेचा अभ्यास होता म्हणूनच देशासंदर्भातील सर्वच विषयांवर त्यांचे निश्चित असे मत होते व ते मत सर्व कालिक होते. त्यांचे शिक्षणाविषयीचे धोरण हे बऱ्याच अंशी आजच्या आधुनिक अंगाने आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणात दिसून येते. नई तालीम, मुलोद्योगी शिक्षण म्हणजेच व्यवसायाभिमुख शिक्षण व स्वयंपूर्ण शाळा ही त्यांची संकल्पना आपल्याला नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये दिसत आहे. लोकविद्या व लोककलांना चालना, संस्कृत भाषेला चालना, इयत्ता सहावीपासून कौशल्यावर आधारित शिक्षण, नववी ते बारावी ऐच्छिक विषय निवड. थोडक्यात 10-2-3 हा मेकॅलो प्रणित पॅटर्नला तिलांजलीच.

सत्य, सत्याग्रह, अहिंसात्मक लढा लढताना जुलूम व अन्याय यांचा अहिंसक मार्गाने प्रतिकार करणे . प्रतिकार करताना होणाऱ्या हालअपेष्टा संयमाने सहन करायच्या. अन्याय करणाऱ्या व्यक्तीला सत्य व न्याय बाजू याची जाणीव करून देणे व तिचे मत परिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट असते. सत्याग्रहीने त्यासाठी हिंसा किंवा असत्य याचा वापर करता कामा नये. केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक हिंसा सुद्धा पूर्णपणे अमान्य .हा विचार स्वीकारणे एक फार मोठे आश्चर्यच होते. तेही भारतासारख्या अनेक जाती, धर्म, संप्रदायांमध्ये विभागलेल्या या समाजाला हा विचार स्वीकारण्यासाठी सिद्ध करणे सोपी गोष्ट अजिबात नाही, आईन्स्टाईनने आपल्या एका ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की विसाव्या शतकात ही विचारधारा असणारा एक माणूस या भूतलावर होऊन गेला ही गोष्ट भविष्यातील अनेक पिढ्यांना केवळ चमत्कारच किंवा दैवी गोष्ट वाटेल व ते यावर विश्वासच ठेवू शकणार नाहीत. 1915 ला गांधीजी भारतात आल्यानंतर व भारतभ्रमण केल्यानंतर त्यांनी चंपारण्यतील नीळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची समस्या, खेडा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतसारा माफीचा प्रश्न, अहमदाबादचा गिरणी कामगार लढा सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी केला .

याच दरम्यान ब्रिटिश सरकारने रौलट कायदा आणला. या कायद्याद्वारे कोणाही भारतीयाला विना चौकशी अटक व तुरुंगात टाकण्याचा अधिकार सरकारला मिळाला होता. गांधीजींनी त्या कायद्याला काळा कायदा असे म्हटले व 6 एप्रिल 1919 ला जनतेला हरताळ पाळण्याचे आवाहन केले. याच दरम्यान पंजाबमध्ये अमृतसर येथील जालियनवाला बागेत जनरल डायरने शांततेने सभा घेत असलेल्या निशस्त्र लोकांवर बेछूट गोळीबार केला. हजारो लोक त्यात मरण पावले. या हत्याकांडाचा निषेध म्हणून गांधीजींनी त्यांना मिळालेली ‘कैसर ए हिंद’ ही पदवी सरकारला परत केली तर रवींद्रनाथ टागोर यांनी ‘सर’ ही पदवी सरकारला परत केली व अशा सरकारशी सहकार्य करणे म्हणजे सैतानाशी सहकार्य करणे असे म्हणत गांधीजींनी जनतेला सरकारशी कोणत्याही प्रकारे सहकार्य न करायचे आवाहन केले. या देशांमध्ये ब्रिटिश सरकार भारतीय जनता त्यांना सहकार्य करते म्हणून आहे मग ते भीतीपोटी का असेना एकदा का लोकांच्या मनातील भीती नष्ट होऊन त्यांनी सरकारशी सर्व प्रकारचा असहकार पुकारला तर हे सरकार एक दिवस ही टिकू शकणार नाही. गांधीजींनी देशातील जनतेला असहकार आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. आंदोलन पूर्ण अहिंसक असावे असे गांधींजीचे मत होते. पण चळवळ ऐन भरात असताना उत्तर प्रदेशातील चौरी चौरा येथील शांतपणे निघालेल्या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला. लोक संतप्त झाले. लोकांनी पोलीस स्टेशनला आग लावली. त्यात 22 पोलीस मरण पावले. गांधीजींनी या हिंसक घटनेमुळे चळवळ तात्काळ थांबवली. गांधीजींवर सरकारने राजद्रोहाचा खटला भरला. त्याला उत्तर देताना गांधीजी म्हणाले ” मला गुन्हा मान्य आहे मी ब्रिटिशांच्या राणीच्या सत्तेला न्यायाचे राज्य मानत होतो, पण जालियनवाला हत्याकांडाने माझ्या या विचाराला धक्का बसला म्हणून असे वर्तन करणाऱ्या सैतानरूपी सत्तेविरुद्ध असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, पण हे करताना जनतेची पूर्ण तयारी केली नाही, जनतेची तयारी न करताच आंदोलन केले म्हणून मी दोषी आहे मला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी ”

भारत मंत्री लॉर्ड बर्कनहेड यांच्या अहवानानुसार पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीयांनी सर्व समावेशक अशी वसाहती अंतर्गत स्वातंत्र्याची मागणी इंग्रज सरकारकडे केली व त्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एका वर्षाची मुदत दिली. या ठरावावर सरकारने एका वर्षात काहीही न केल्याने 1930 ला राष्ट्रीय सभेने पूर्ण स्वराज्याची मागणी करण्याचा ठराव मांडला व त्यानुसार जन आंदोलन सुरू करण्यासाठी सर्व सूत्रे महात्मा गांधींकडे सोपविण्यात आली. महात्मा गांधींनी त्यानुसार देशभर सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. सविनय कायदेभंगासाठी गांधीजींनी मिठाची निवड केली. गांधीजींच्या मते मीठ हे गरीब, श्रीमंत या दोघांनाही अत्यावश्यक आहे. मिठासारख्या जीवनावश्यक नैसर्गिक वस्तूवर कर बसवणे अन्यायकारक होते. गांधीजी 1930 ला आपल्या 78 सहकाऱ्यांसोबत अहमदाबाद जवळील साबरमती आश्रमातून मिठाचा कायदा मोडण्यासाठी 350 किलोमीटर पदयात्रा करत दांडी या ठिकाणी येऊन पोहोचले . दांडी येथील समुद्र किनाऱ्यावर मीठ उचलून त्यांनी मिठाचा कायदा मोडला. या त्यांच्या कृतीबद्दल ‘उचललेस तू मुठभर मीठ, साम्राज्याचा खचला पाया’ असे वर्णन केले जाते’

जेव्हा गांधीजींनी सविनय कायदेभंगाच्या आंदोलनासाठी मिठाची निवड केली व त्यासाठी साबरमती ते दांडी पदयात्रा करण्याबद्दल सहकाऱ्यांशी चर्चा केली व आपला निर्णय सरकारला कळवला तेव्हा सरकारमधील व्हाईसरॉय सहित अनेकांनी गांधीजींच्या या आंदोलनाची टवाळी केल्याचे दिसून येते. पण जशी गांधीजींची पदयात्रा सुरू झाली व त्याला मिळणारा जनतेचा प्रतिसाद बघून सर्वच आश्चर्यचकित झाले अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये या यात्रेबद्दल चर्चा होऊ लागली. तेव्हा इंग्रज सरकारला खडबडून जाग आली. जेव्हा सरकार जनतेवरच अन्याय करते व सनदशीर मार्गाने सरकारविरुद्ध प्रतिवाद करण्याचे सर्व मार्ग खुंटतात तेव्हा अशा सरकारला त्याच्या चुकीच्या निर्णयांची वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्यासाठी लोकशाही मार्गाने प्रतिवाद करण्याचे हत्यार म्हणजे पदयात्रा होय. याची सुरुवात गांधीजींनी प्रथम यशस्वी केली. त्यानंतर या देशात अनेक नेत्यांनी पदयात्रा केल्या व पदयात्रेच्या माध्यमातून सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न केला .

ब्रिटिश प्रधानमंत्री रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करण्यासाठी गोलमेज परिषदांचे आयोजन केले होते. पहिल्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचा सहभाग नसल्याने ती निष्फळ ठरली. दुसऱ्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेच्या सहभागा संदर्भात पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी केलेल्या अहवाना नुसार व्हाईसरॉय आयर्विन व गांधीजी यांच्यात करार झाला. त्या करारा प्रमाणे गांधीजींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेला येण्याचे मान्य केले तसेच सविनय कायदेभंगाचे आंदोलन स्थगित केले व सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटने मध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली. त्याचबरोबर राष्ट्रीय सभेच्या अनेक नेत्यांची तुरुंगातून मुक्तता केली . गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले. गोलमेज परिषदे मध्ये भारतातील अनेक संस्थानिकांचे व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. अनेक विषयांवर या भारतीय सभासदांमध्येच एकमत न झाल्याने गांधीजी निराश झाले व उद्विग्न मनस्थितीत भारतात परत आले. भारतात आल्यावर त्यांनी सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाची दुसरी फेरी सुरू केली. गांधीजींना सरकारने अटक केली यानंतर लगेचच तिसरी गोलमेज परिषद भरली. त्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभा सहभागी नव्हती पण ब्रिटिश सरकारने जातीय निवाडा घोषित केला. या जातीय निवाड्यामुळे हिंदू धर्मात फूट पडणार हे गांधीजींच्या लक्षात आल्याने गांधीजींनी येरवडा तुरुंगातच या निर्णयावर आमरण उपोषण सुरू केले . गांधींच्या प्राणाचे मोल लक्षात घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीजीं सोबत पुणे करार केला. या करारानुसार दलितांना 78 विभक्त मतदार संघ ऐवजी विधिमंडळात 148 राखीव जागा द्याव्यात असे ठरले. पुढे याला ब्रिटिश सरकारने पण मान्यता दिली.

1930 मध्ये सविनय कायदेभंगाच्या काळात व्हाईसरॉय आयर्विन यांच्या जागेवर व्हाईसरॉय विलिंगटन यांची नेमणूक झाली तेव्हा व्हाईसरॉय आयर्विन यांनी नवीन येणाऱ्या व्हाईसरॉय साठी एक सूचना पत्र लिहिले होते. या सूचनापत्रांमध्ये ते लिहितात ‘ या मोहनदास करमचंद गांधी पासून सर्वात जास्त सावध राहा, ही अत्यंत चतुर व्यक्ती आहे, साधूचा रूप घेणारी, पंचा गुंडाळणारी, तू जर या व्यक्तीपासून सावध राहिला नाही तर ही व्यक्ती केव्हा तुला खिशात घालेल, हे तुलाही कळणार नाही ॑ सर्वसाधारण माणूस सुद्धा प्रामाणिकपणाच्या जोरावर किती मोठ्या उंचीवर जाऊ शकतो याचे हे एक उत्तम उदाहरण आपल्याला दिसून येते. गांधीजी स्वतःच्या जीवनाबद्दल स्वतः म्हणत ‘ My life is my message ‘ माझे जीवन हाच माझा संदेश आहे.

गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय सभेचे विसर्जन करण्याचा सल्ला दिला होता. कारण स्वातंत्र्य हे केवळ काँग्रेस राष्ट्रीय सभेमुळेच मिळाले असे नाही, त्यासोबतच ते म्हणत प्रत्येक कार्यकर्त्यांने आपापल्या गावासाठी स्वतःला वाहून घ्यावे. आधुनिक कालखंडात जे राळेगणसिद्धी मध्ये आदरणीय अण्णा हजारेंनी केले. असंच काम प्रत्येक कार्यकर्त्यांने आपापल्या गावात केले तर गाव समृद्ध होईल व गाव समृद्धीने देश समृद्ध होईल हा विचार गांधीजींनी आग्रहाने मांडला.

फाळणी बद्दल गांधीजींना अंधारात ठेवले. फाळणी जिनांनी घडवून आणली किंवा ती ब्रिटिशांनीच घडवून आणली कारण भारतीय उपखंडात कायमची अस्थिरता राहावी ही त्यामागची धारणा होती किंवा तो एक कुटील डाव होता. ज्या देशाला आपण गुलाम बनवले त्या देशाकडून भविष्यात आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ही त्यांनी केलेली एक सोय होती. गांधीजींना फाळणी मान्य नव्हती ते स्वतः अनेक वेळेला म्हणाले, मी या देशाची फाळणी होऊ नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करेन. म्हणूनच आपण 14 ऑगस्ट हा दिवस स्मृती दिन म्हणून पाळण्यास सुरुवात केली कारण या दिवशी देशाचे विभाजन झाले.

 

गांधी चरित्र आधुनिक युगातील एक आश्चर्य या लेखात गांधीजींचे कार्यकर्तृत्व व विचारधारा आजच्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

 

लेखक

प्रा. प्रशांत पुंडलिक शिरुडे

के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली.

prashantshirude1674@gmail.com

9967817876

प्रतिक्रिया व्यक्त करा