You are currently viewing शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मांगेली गावचे गोपाळ गवस यांचा विशेष सन्मान

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मांगेली गावचे गोपाळ गवस यांचा विशेष सन्मान

दोडामार्ग :

 

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी व सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळ यांच्या वतीने आज १ सप्टेंबर २०२४ रोजी शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय चे शिक्षक श्री गोपाळ गवस यांना विशेष सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री गोपाळ गवस हे गेली १५ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असतांनाच विविध समाज उपयोगी आणि शैक्षणिक उपयोगी उपक्रमात ते सहभागी असतात. अगदी मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वामुळे श्री गोपाळ गवस यांचे सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांशी शिक्षका पलीकडे अर्थात मैत्रीचे नाते आहे.

गोपाळ भिवा गवस हे दोडामार्ग तालुक्यातील अतिदुर्गम गाव मौजे मांगेलीचे रहिवासी आहेत. त्यांचे एम. ए. (हिंदी) एम. ए. (समाजशास्त्र) बी.एड. एल.एल.बी. पर्यंतचे शिक्षण झाले आहे. यापूर्वी पुष्पसेन ज्ञानपीठ, मुंबई महानगरपालिका या ठिकाणी अध्यापनाचे कार्य करत होते. त्या ठिकाणी त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यानंतर आता गोपाळ भिवा गवस अंशकालीन सेनाधिकारी फर्स्ट ऑफिसर ५८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन ओरस कोल्हापूर ग्रुप अंतर्गत कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यरत आहेत. अध्यापनाचे कार्य करत असतानाच विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण व भारतीय सेनेची ओळख करून देण्याची विशेष कामगिरी बजावत आहेत. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनी नागपूर येथे भारतीय सेनेकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापूर्वी गुरू गौरव २०२२, सिंधुदुर्ग भूषण, कोकण रत्न तसेच राष्ट्रीय छात्र सेना निदेशालय महाराष्ट्र शासन याच कडून प्रशंसाप्रत्र सारखे सन्मान प्राप्त झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथमच माध्यमिक विभागातून राष्ट्रीय स्तरावरील मुख्य गणतंत्र दिवस शिबिरामध्ये गोपाळ गवस यांच्या विद्यालयातून पहिलीच विद्यार्थिनी कॅडेट स्वरांगी संदीप खानोलकर दिल्ली येथे २०२३ मधे सहभागी झाली होती. ५८ एनसीसी बटालियन चे कार्यालय ओरोस येथे सुरू करण्यामध्ये गोपाळ गवस यांचा मोलाचा वाटा आहे. यापूर्वी हे कामकाज कोल्हापूरहून चालत असे.

या सर्व शैक्षणिक क्षेत्राततील कामाचा आढावा घेऊनच गोपाळ भिवा गवस यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच आज महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी व सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळ यांच्या वतीने विशेष सन्मान पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

यावेळी गोपाळ भिवा गवस म्हणाले की, आपल्या या यशस्वी वाटचालीत आपले कुटुंबीय, मित्रपरिवार, सर्व विध्यार्थी आणि विद्यार्थिनी कुमारी अंतरा तानावडे यांचा मोठा वाटा आहे आणि हे सर्वच या पुरस्काराचे खरे मानकरी आहेत. माझे विध्यार्थी, सहकारी, प्रशाला व संस्था यांचे मनःपूर्वक आभार.

प्रतिक्रिया व्यक्त करा