You are currently viewing नाट्यश्री कविता स्पर्धेतील विसाव्या सत्रात डॉ.चंद्रकांत लेनगुरे व जयराम धोंगडे विजयी

नाट्यश्री कविता स्पर्धेतील विसाव्या सत्रात डॉ.चंद्रकांत लेनगुरे व जयराम धोंगडे विजयी

गडचिरोली :

स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते. या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.

या उपक्रमाचे विसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २५ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून स्पर्धेचे हे *विसावे* सत्र असल्याने यावेळी दोन कवींना सन्मानित करण्यात आले आहे. त्यात गडचिरोली येथील प्रसिद्ध कवी डॉ. चंद्रकांत लेनगुरे व नांदेड येथील प्रसिद्ध गझलकार जयराम धोंगडे या दोन कवींची आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांच्या अनु.”मायबोली माझी” व “आई ‘विसी ” या कवितांची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे, कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.

डॉ. चंद्रकांत लेनगुरे हे गडचिरोली येथील प्रसिद्ध कवी असून ते झाडीबोली शाखा गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष आहेत. नुकत्याच मौजा- खडकी (बामणी) जिल्हा- गोंदिया येथे झालेल्या एकतिसाव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. विविध संस्थातर्फे अनेक पुरस्काराने ते सन्मानित आहेत. आजवर त्यांचे तीन कवितासंग्रह, एक चारोळी संग्रह व एक कथागितसंग्रह प्रकाशित झाले आहेत. तर जयराम धोंगडे हे नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी व गझलकार आहेत. आजवर त्यांचे ४ कविता संग्रह व एक गझलसंग्रह प्रकाशित झाले असून अनेक पुस्तके प्रकाशनाचे मार्गावर आहेत. त्यांनी विविध विषयांवर विपुल साहित्य लेखन केलेले आहे. अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. या दोन दिग्गज साहित्यिकांना नाट्यश्रीच्या स्पर्धेत एकाच वेळी पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.

या विसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने गणेश रामदास निकम, वंदना सोरते, रेखा दिक्षित, मुर्लीधर खोटेले, जयराम धोंगडे, प्रभाकर दुर्गे, सुजाता अवचट, सुरज गोरंतवार, तुळशीराम उंदीरवाडे, नरेंद्र गुंडेली, पी.डी.काटकर, विलास जेंगठे, गजानन गेडाम, संतोष कपाले, सत्तू भांडेकर, प्रेमिला अलोने, चरणदास वैरागडे, पुरुषोत्तम दहिकर, डॉ. मंदा पडवेकर, भिमानंद मेश्राम, पुरुषोत्तम ठाकरे, पुरुषोत्तम लेनगुरे, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, मंदाकिनी चरडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

या पुरस्कारांचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे .

– *चुडाराम बल्हारपुरे* (नाटककार)

प्रतिक्रिया व्यक्त करा