You are currently viewing सामाजिक बांधिलकी जोपासणारा कार्यकर्ता… रवी दांडगे

सामाजिक बांधिलकी जोपासणारा कार्यकर्ता… रवी दांडगे

या माझ्या आतापर्यंतच्या 71 वर्षाच्या आयुष्यामध्ये खूप लोक येऊन गेलेत. खूप विद्यार्थ्यांनी माझ्याकडे उमेदवारी केली. त्यामध्ये आजचे प्रा. डॉ.किशोर फुले,प्रा. डॉ. कुमार बोबडे, प्रा. डॉ. संजय खडसे,रवी दांडगे, कविवर्य शिवनयन ठाकरे, शिवदास भालेराव, प्राचार्य डाँ.हर्षल खोब्रागडे प्रा. डॉ. मुकेश सरदार क्रांती महाजन व विशाल देवतारे अशी काही नावं लक्षात राहण्यासारखी आहेत. मी अमरावतीच्या राजापेठ विभागातील भारतीय कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्यामुळे आणि साहित्य संगम, बहुजन साहित्य परिषद,मिशन आय ए एस अशा वेगवेगळ्या संस्था माझ्याजवळ असल्यामुळे मला नेहमी सहकारी लागत असत .तेव्हा ही सगळी मुले विद्यार्थी दशेत होती .त्यांच्यावर आम्ही मुलांसारखे प्रेम केलं .म्हणजे ते आमचे परिवारातील सदस्य होऊन गेले. रवी दांडगे हा दीर्घकाळ लक्षात राहणारा कार्यकर्ता. तो त्याच्या विद्यार्थी जीवनात माझ्याकडे सहाय्यक म्हणून आला. तेव्हा मी तपोवनमध्ये राहत होतो .सौ.विद्या तपोवनात शिक्षिका होती.त्यामुळे आमचा मुक्काम तपोवनातच होता.जाण्यायेण्याची कुठल्याही प्रकारची सोय त्यावेळी तपोवनात नव्हती.मी देखील प्राध्यापक असून सायकलने ये जा करीत होतो .त्या काळात रवी दांडगे नियमितपणे सायकलने माझ्याकडे तपोवनला यायचा .मी सांगितलेली कामे करायचा. हे सर्व त्याने निष्ठेने केले. आजही तो त्याच निष्ठेने माझे काम करतो .मी आता अधिकारी झालो आहे .मोठ्या संस्थेमध्ये नोकरीला आहे. माझी बायको कावेरी नोकरीला आहे. चांगला लठ्ठपगार आहे .या अहंकाराचा स्पर्श त्याला अद्यापही झाला नाही आणि तो पुढे भविष्यात होईल असे वाटते नाही. त्याचे राहणे बायपासवरील यशोदा नगरला आणि माझे घर तपोवनला .त्या काळात ही अमरावती शहराची दोन टोकेच मानावी लागत होती.पण त्याने प्रामाणिकपणे बातम्या लिहिणे,वर्तमानपत्रांना पोहोचवणे,पत्र लिहिणे, लेख तयार करणे हे कामे हृदयापासून केली आणि त्याचे फळ त्याला मिळाले देखील. मा. राज्यपाल श्री रा.सू.गवई यांच्या परिवारात त्याला स्वीय सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.रवीने माझ्याकडे नोकरीं केली ती पैशासाठी नाही केली. सरांच्या सहवासात राहून मी काहीतरी शिकू शकेल. त्याचा माझा जीवनामध्ये उपयोग होईल आणि त्यातून मी जीवनामध्ये स्थिरस्थावर होऊ शकेल ही भावना त्याच्या मनात असेल .
सुरेश भट आमच्याकडे तपोवनला महिना महिनाभर राहायचे. त्यांचा आट काढणे ही फारच अवघड व मोठी गोष्ट होती. रवी दांडगे, शिवनयन ठाकरे, शिवदास भालेराव आम्ही सगळे सुरेश भटांच्या दिमतीला असायचो .माझी पत्नी विद्या आमच्या मुली पल्लवी, प्राची हया देखील भट साहेबांनी सांगितलेले कामे प्रामाणिकपणे करीत होत्या.तपोवनला तेव्हा दुकान नव्हते. काही लागलं तर एकदम कॅम्पवर यावं लागत होतं .सुरेश भटांना कोणत्या वेळेस काय लागेल याचा काहीच नेम नव्हता ? पण रवी दांडगे, शिवनयन ठाकरे आणि शिवदास भालेराव यांनी सुरेश भटांना माझी उणीव भासू दिली नाही .मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर तर कॉलेजमधून येईपर्यंत भट साहेबांची प्रामाणिकपणे सेवा ज्या तिघांनी केली .त्यामध्ये रवीचा खारीचा वाटा आहे.
मी साहित्य क्षेत्रात असल्यामुळे सुरेश भटांबरोबरच सर्वश्री बाबा आढाव,नरेंद्र दाभोळकर,निळू फुले, आ.ह.साळुंखे, प्रा.विठ्ठल वाघ, मिर्झा रफी अहमद बेग, शंकर बडे,यांच्यासारखे मान्यवर माझ्याकडे मुक्कामी असायचे. त्या सर्वांचे आदरतिथ्य करण्यासाठी रवी व त्यांचे सहकारी दिमतीला असायचे. एक वेळ बाबा आढाव माझ्याकडे मुक्कामी असताना मी रवीला त्यांची मुलाखत घ्यायला सांगितली .त्याने त्या उमेदीच्या वयात जी मुलाखत घेतली त्यामुळे बाबा आढाव देखील भारावून गेले. ते म्हणाले.काठोळे तुम्ही चांगले चेले तयार केले आहेत .पुढे एका कार्यक्रमाला सुप्रसिद्ध सिने अभिनेता श्री निळू फुले व डॉ. श्रीराम लागू अमरावतीला येणार होते. पण कार्यक्रम संपला तरी ते येऊ शकले नाहीत .ते आले रात्री तीन वाजता. तेव्हा राजकमल चौकातील सिटी पॅलेस या हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था केली होती .रवी रात्री तीन वाजेपर्यंत त्यांची वाट पाहत तिथे थांबला होता. निळू फुले व डॉ. लागू आल्यानंतरच व त्यांची व्यवस्था झाल्यानंतरच तो घराकडे वळला होता .मी रवीला जे न्याहाळले त्यामध्ये मला जाणवले की या मुलांमध्ये स्वतःचे व्यक्तिमत्व तयार करण्याची व ते लोकाभिमुख करण्याची आणि सामाजिक बांधिलकी जपण्याची वृत्ती आहे .त्याचबरोबर विनयशीलता हा एक अतिरिक्त गुण देखील त्याच्याकडे आहे.

माझे मित्र आणि मोर्शी वरूड मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे साहेब जेव्हा कृषिमंत्री झाले तेव्हा मी बोंडे साहेबांना सांगून त्याला जनसंपर्क अधिकारी म्हणून डेपुटेशनवर बोलावून घेतले. तेव्हा तो अमरावतीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निदेशक म्हणून कार्यरत होता आणि सध्याही आहे .मला आठवते काही आंदोलन कर्ते विभागीय आयुक्त कार्यालयात सभागृहाच्या बाहेर ठिय्या देऊन बसले होते .आतमध्ये कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी साहेबांची मिटिंग सुरू होती. काही कारणास्तव रवी बाहेर आला आणि त्याला हे सगळे आक्रमक आंदोलन कर्ते दिसून आले. रवीने आपले डोके लढविले. त्या सगळ्या आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली .त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि साहेबांच्या वतीने त्यांना आश्वासनही दिले की तुमच्या कामासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन.रवीने इतक्या शिताफीने जे समुपदेशन केले की सगळे आक्रमक कार्यकर्ते नरम झाले आणि रवीच्या शब्दावर विश्वास ठेवून विभागीय आयुक्त कार्यालयातून निघून गेले. रवीची शब्दांवर पकड आहे. त्या शब्दांनीच त्याने आतापर्यंत माणसे जिंकलेली आहेत. आजही तो शासकीय सेवेत असला तरी प्रामाणिकपणे मिशन आयएएसची सगळी कामे करायला मागेपुढे पाहत नाही. आम्ही काल-परवा विदर्भ महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला .रवीला ते कळले .त्याचा मला फोन आला. सर मी विदर्भ महाविद्यालयाचा विद्यार्थी नाही. पण मला या सगळ्या उपक्रमासाठी काम करणे आवडेल .स्वतःची शासकीय नोकरी,पत्नी मुले त्याची गृहनिर्माण संस्था या सगळ्या मधूनही त्याने एका सामाजिक उपक्रमासाठी वेळ काढावा हे खरोखरच नोंदणीय आहे. रवीचे वडील तहसीलदार होते .एक चांगले तहसीलदार म्हणून त्यांचा नावलौकिक होता. आणि जाताना त्यांनी रवीला नकळतपणे संस्काराची शिदोरी प्रदान केली .त्या अनामतीवर रवीची वाटचाल सुरू आहे. रवीचे वागणे बोलणे लिहिणे हे सगळे हृदयस्पर्शी आहे आणि कोणाच्याही मदतीला धावून जाण्याची त्याची प्रवृत्ती आहे .अशी माणसे समाजात फार कमी असतात. मी माझी पत्नी आणि माझी मुलं मुली या चौकटीत अनेक जण वागतात .नव्हे आम्हालाही क्षणोक्षणी दिसतात .पण रवीने ही चौकट केव्हाच झुगारून दिली आहे .आणि म्हणूनच त्याच्या मित्र परिवारात,पत्रकार मित्रांमध्ये, अधिकारी वर्गामध्ये त्याच्या सहकारी मित्रामध्ये रवीचे नाव प्रेमाने काढले जाते .अशी गुणवंत माणसे समाजामध्ये असली पाहिजेत आणि अशा गुणीजणांच्या पाठीशी आमच्यासारख्या वरिष्ठ मंडळींनी ज्येष्ठ मंडळींनी खंबीरपणे उभे राहून आमचा वारसा चालवणा-या या तरुणांना दिलासा दिला पाहिजे. दि.२३ मार्चला रवीचा वाढदिवस आहे .तो गेल्या ४० वर्षापासून सतत माझ्या संपर्कात आहे. इतके वर्ष माझ्या सातत्याने संपर्कात राहणारा हा माझा एकमेव सहाय्यक आहे .आज तो स्थिरस्थावर झालेला आहे .पैशाची अपेक्षा तेव्हाही नव्हती . आजही नाही आहे. पण सर एक चांगले काम करताहेत त्या कामातील मी खारीचा वाटा उचलला पाहिजे असे त्याला प्रामाणिकपणे वाटते आणि म्हणून तो कालही माझ्याबरोबर होता,आजही माझ्याबरोबर आहे, आणि उद्याही माझ्याबरोबर राहणार आहे . त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुयश चिंतीतो.

==============

प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती

9890967003

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 7 =