You are currently viewing कणकवली विधानसभा मतदार संघातील जनतेला पालकमंत्री न्याय देणार का?

कणकवली विधानसभा मतदार संघातील जनतेला पालकमंत्री न्याय देणार का?

*सेनानेते अतुल रावराणे यांचा सवाल*

 

वैभववाडी :

पालकमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना समज दिली, त्यांना त्यांच्या कामाची जाणीव करून दिली याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदनच करतो. पण कणकवली विधानसभेमध्ये तीनही तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पुरती खिळखिळी झालेली आहे. याबाबत सातत्याने मागणी करूनही कोणतीही कार्यवाही होत नाही. पालकमंत्र्यांनी हे तीन तालुके आपल्या पालकमंत्री पदाच्या कार्य कक्षेतून वगळले आहेत का? असा सवाल शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केला आहे.

कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नाबाबत गेल्या तीन महिन्यापासून आपण पालकमंत्र्यांकडे मागणी करत आहे. पण भाजपामध्ये घेतलेल्या बांडगुळांचे अर्थात टिल्लूचे लाड पुरविण्यासाठी पालकमंत्री हे तीन तालुके दुर्लक्षित करत आहेत का? पालकमंत्र्यांनी आपल्या कार्यकक्षेतून हे तालुके वगळले आहेत का ? असा सवाल करत श्री. रावराणे यांनी म्हटले आहे की वैभववाडी पंचायत समितीची इमारत गेल्या पाच वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत दोन पालकमंत्री होऊन गेले. आता तिसरे पालकमंत्री आले तरीही एका आमदाराच्या लाडापायी या इमारतीचे उद्घाटन होत नाही ही जनतेशी केलेली प्रतारणा नाही का? म्हणूनच आरोग्य यंत्रणा सुधारण्याबरोबरच पालकमंत्र्यांनी हे प्रशासकीय आरोग्यही कधी सुधारणार याकडेही लक्ष द्यायला हवे.

सद्यस्थितीचा विचार केला तर कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्ती ढेपाळली आहे. येथे सुद्धा माणसेच राहतात. त्यामुळे पालकमंत्री म्हणून आपण या लोकांची सुद्धा काळजी घेणार नाही का! कासारडे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तयार होऊन दीड वर्ष झाले, तरी पण ती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेल्या या इमारती केवळ निष्क्रिय आमदाराच्या हट्टा पायी किती काळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ठेवणार ? असा सवाल श्री.रावराणे यांनी केला आहे.

या भागाच्या आमदाराने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडून 200 कोटी रुपयांचा निधी आणला असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. हा निधी वाटत त्या निधीची टक्केवारी घेण्यासाठी, रस्त्याची उद्घाटन करून टक्केवारी घेऊन जाण्यासाठी हे आमदार जिल्ह्यात येतात आणि जातात. मग जनतेच्या अडचणी कोण सोडविणार? एका आमदाराचे लाड पुरवण्यासाठी त्यांच्या हट्टापाई आपण जनतेशी प्रतारणा करणार का? आपण जनतेला न्याय द्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पालकमंत्री आम्हाला न्याय देतील असे श्री. रावराणे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 14 =