You are currently viewing विकसित भारत घडविण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची – राज्यपाल रमेश बैस

विकसित भारत घडविण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची – राज्यपाल रमेश बैस

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची होती. या राज्याने स्वातंत्र्यलढ्याला नेतृत्व दिले. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्वाची राहील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे समारोप पर्व, ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आज सायंकाळी राजभवनातील दरबार हॉल येथे ‘साद सह्याद्रीची, भूमी महाराष्ट्राची’ आणि ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त शहाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेवर आधारित पोस्ट तिकिटाचा अनावरण समारंभ आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, टपाल विभागाचे पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दर्शनिका विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या मराठी भाषेतील महाराष्ट्र ‘समाज सुधारक व विचारवंत आणि हिंदी भाषेतील ‘स्वतंत्रता संग्राम मे महाराष्ट्र का योगदान’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कलावंतांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केला.

राज्यपाल म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘माझी माती, माझा देश’ अभियान राबविण्यात आले. तसेच यंदाचे वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष साजरे केले जात आहेत. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

सन २०४७ पर्यंत देशाला विकसित देश बनवण्याची प्रतिज्ञा आपण घेतली आहे. विकसित भारतासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्वाची राहणार आहे. देशातील गरिबी, भूकबळी संपविण्यासाठी तरुण आणि महिलांचे सक्षमीकरण केले पाहिजे. कौशल्याला वाव दिला पाहिजे. त्यासाठी राज्यात कौशल्य विद्यापीठाचे बळकटीकरण केले पाहिजे. त्यातून महाराष्ट्र ही स्टार्टअपची राजधानी होईल. त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. विकसित भारतासाठी प्रत्येक विभागाने आपले उद्दिष्ट निश्चित केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. स्वातंत्र्याचे अमृत मिळविण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. त्यांना अभिवादन करण्यासाठी माझी माती, माझा देश हा उपक्रम राबविण्यात आला.

महाराष्ट्रातूनच स्वातंत्र्याचा हुंकार उठला. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्य निर्माण केले. त्यांनी सर्वसामान्यांच्या कल्याणाचा वस्तूपाठ घालून दिला आहे. त्याच मार्गावरून राज्य शासनाची वाटचाल सुरू आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवायची आहे. त्यातूनच छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकार होईल. शहाजीराजे यांच्यावरील टपाल तिकिटाच्या अनावरणाचा क्षण राज्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताची विकासाकडे वाटचाल सुरू असून जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावली आहे. हा देशवासियांचा सन्मान आहे, असेही त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘माझी माती माझा देश’ हा उपक्रम राबविण्यात आला. भारत देश सुजलाम् आणि सुफलाम् होता. या देशाचे आकर्षण जगाला होते. त्यातूनच भारतावर आक्रमणे झाली. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला सुजलाम् सुफलाम् करायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव श्री. खारगे यांनी प्रास्ताविकात ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. पोस्ट मास्तर जनरल. श्री. सिंह यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा