ई-पीक नोंदणीस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी
रब्बी हंगाम २०२५-२०२६ अंतर्गत ई-पीक पाहणी (Digital Crop Survey – DCS) अंतर्गत मोबाईल ॲपव्दारे पीक नोंदणीस शासनाकडून दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन डी.डी.ई.तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय दि.१४.१०.२०२४ अन्वये संपूर्ण राज्यामध्ये ई-पीक पाहणी Digital Crop Survey (DCS) अंतर्गत मोबाईल अॅपद्वारे पीक नोंदणी करण्यात येते. राज्यात रब्बी हंगाम २०२५-२०२६ हा दि. १० डिसेंबर, २०२५ पासून सुरु असून त्या अंतर्गत दि. १० डिसेंबर, २०२५ ते २४ जानेवारी, २०२६ या कालावधीत शेतकरी स्तरावरून ई-पीक नोंदणी झाली होती. तसेच दि. २५ जानेवारी, २०२६ पासून सहाय्यक स्तरावरून ई-पीक पाहणी नोंदणी करण्यात आली असून त्याची अंतिम मुदत दि.१० मार्च, २०२६ अशी होती.
आज अखेर रब्बी हंगाम २०२५-२०२६ साठी एकूण पीक पाहणी क्षेत्रापैकी ५५.६९ टक्के इतक्या क्षेत्राची पीक नोंदणी करण्यात आली आहे. पीक नोंदणी न झाल्याने नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज, धान खरेदी इ. लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, याकरीता सहायक स्तरावरून करावयाच्या पीक नोंदणीला (DCS) शासनाकडून दिनांक ३१ मार्च, २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार रब्बी हंगाम २०२५- २०२६ ची ई-पीक पाहणी नोंदणी १०० टक्के पूर्ण करावयाची आहे.
ज्या शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी अद्याप केलेली नाही त्यांनी आपल्या गावात पीक पाहणीसाठी नेमलेल्या सहाय्यकांमार्फत तात्काळ आपली ७/१२ वर पीक पाहणी करून घ्यावी. मुदत वाढीचे सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
