*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित आशयावरून काव्यरचना*
ती शब्दांच्या काठाने
अर्थाला टाळत गेली
मी मौनाच्या रागाची
मग उदास गाणी केली
कवी – सलील कुळकर्णी
________________________
अर्थ-साकव
मम शब्दसरीतेच्या काठी
मी प्रतिक्षेत तियेच्या
ती दृष्टीस पडली…पण
तीरावर पलीकडच्या
मी बांधला अर्थ-साकव
ती आली नचओलांडून
झुळूकेचा मंदशा भास
पुतळ्यासम गेलो गोठून
दोन ओळींच्या मधला
ती अर्थ समजली होती
तरीही टाळुनच गेली
अगतिक ती का होती
लेखणीशी थबकले शब्द
अर्थही हरवत गेला
तो मौन रागही मग मी
‘कण’ स्वरांनी सजविला
या उदास गाण्यांची मी
आनंदगाणी बनविणच
अर्थ-साकवावरून मग
ती ‘कविता’ येईल, येईलच
@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
©® या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.
