नवी दिल्ली :
शेतकरी विधेयकांवरील चर्चेवेळी राज्यसभेत नियमांचे उल्लंघन करणे आणि गोंधळ घातल्याप्रकरणी काँग्रेस सह इतर पक्षाचे मिळून एकून आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून रविवारी राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयके मांडण्यात आली होती. विरोधी पक्षांकडून या विधेयकांना कडाडून विरोध करण्यात आला. त्यावेळी काही खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येऊन गोंधळ घातला होता.
खासदारांच्या या वर्तनावर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपसभापतींशी शारीरिक झटापट करण्यात आली. त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला. हा राज्यसभेच्या इतिहासातील वाईट दिवस होता. ही गोष्ट दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे खडे बोल व्यंकय्या नायडू यांनी खासदारांना सुनावले. यानंतर व्यंकय्या नायडू यांनी डेरेक ओब्रायन, राजीव सातव, के.के. रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नाझीर हुसेन आणि एलामरन करीम या आठ खासदारांना एक आठवड्यासाठी निलंबित केले.
