*घारपी शाळेत पुस्तकांच्या ज्ञानाची गुढी उभारून नववर्षाचे स्वागत*
*बांदा*
मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे वाचन संस्कृती लोप पावत असल्याची खंत व्यक्त केली जात असताना, घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने एक प्रेरणादायी आणि दिशादर्शक उपक्रम राबवत मराठी नववर्षाचे स्वागत ‘ज्ञानाच्या गुढी’द्वारे केले.
शाळेच्या प्रांगणात विविध पुस्तकांनी आकर्षक पद्धतीने सजवून उभारण्यात आलेली ही ‘ज्ञानाची गुढी’ पारंपरिक गुढीचे प्रतीक ठरण्याबरोबरच ज्ञान, संस्कार आणि उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेली प्रेरणादायी पताका ठरली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पुस्तकांप्रती आपुलकी आणि वाचनाची गोडी व्यक्त केली.
“ग्रंथ हेच खरे गुरु” या विचाराचा प्रत्यय देत विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करण्याचा संकल्प यावेळी केला. वाचन ही केवळ सवय नसून ती व्यक्तिमत्त्व विकास, विचारप्रगल्भता आणि जीवन समृद्ध करण्याचे प्रभावी साधन आहे, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
यावेळी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे महत्त्व पटवून देत, दररोज वाचनासाठी वेळ देण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. जे. डी. पाटील म्हणाले, “आजच्या वेगवान डिजिटल युगात विद्यार्थ्यांना पुस्तकांकडे वळवणे ही काळाची गरज आहे. वाचनामुळे विचारांना दिशा मिळते, ज्ञानाची कक्षा विस्तारते आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधतो. ‘ज्ञानाची ही गुढी’ म्हणजे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेली आशेची पताका आहे.”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाचनाची बीजे रुजली असून, त्यांच्यात ज्ञानार्जनाची प्रेरणा निर्माण झाली आहे. घारपी शाळेचा हा उपक्रम सण साजरा करण्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक भान जपणारा ठरला असून, वाचन संस्कृतीच्या जतनासाठी एक आदर्श उदाहरण म्हणून पुढे येत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक जे.डी.पाटील यांच्या बरोबर सहकारी शिक्षक मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे ,आशिष तांदुळे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर ,संचिता सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.
