मुंबई गुरुदत्त वाकदेकर) :
समाजाभिमुख नवोपक्रम आणि ग्रासरूट इनोव्हेशनसाठी ओळखले जाणारे प्रो. डॉ. अनिल कुमार गुप्ता यांना २०२५ साठी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. चव्हाण सेंटर दरवर्षी हा पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी देते. प्रो. गुप्ता हे हनी बी नेटवर्कचे संस्थापक आहेत.
पुरस्कार स्वीकारताना प्रो. गुप्ता म्हणाले, “परिस्थितीने गरीब असलेली माणसे ज्ञानाने गरीब नसतात. समाज समांतर असायला हवा, अन्यथा संधींचा अभाव प्रगतीला खुणावतो. लोकांसाठी केलेले संशोधन त्यांच्या भाषेत असल्यासच प्रभावी ठरते. चव्हाण सेंटरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ४२ हजार गावांना जोडण्यासाठी प्रत्येक गावाची स्वतंत्र वेबसाईट असावी.” त्यांनी आपल्या सन्मानाची खरी किंमत गावोगाव फिरणाऱ्या सामान्य माणसांबरोबरच्या शोधयात्रेत असल्याचे सांगितले.
पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर असून समितीत डॉ. रूपा शाह, डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रा. सुहास पेडणेकर, डॉ. नरेंद्र जाधव, श्री. विवेक सावंत, आय.एम. काद्री आणि डॉ. अंकुशराव कदम हे सदस्य आहेत. पुरस्काराची रक्कम रु. ५ लाख, सन्मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता बाळसराफ यांनी केले. त्यांनी चव्हाण सेंटरच्या स्थापनेमागील भूमिका आणि गेल्या चार दशकांतील समाजाभिमुख उपक्रमांचा आढावा उपस्थितांना दिला. दिलीप वळसे-पाटील, चव्हाण सेंटरचे विश्वस्त, म्हणाले, “डॉ. गुप्ता यांनी गावोगावी सर्व गाव वस्ती वेबसाईटने जोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे विकासाभिमुख योजनांचा फायदा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल. चव्हाण साहेबांचे प्रागतिक विचार समाजात रुजतील.”
समारंभाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले. सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी चव्हाण सेंटरचे पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, निवड समिती सदस्य, माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार प्रा. गुप्ता यांच्या नावावरून नवोपक्रम आणि समाजाभिमुख कामांची प्रेरणा भविष्यातही समाजात रुजू राहील.
